आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारतातील १९९० चा काळ म्हणजे आर्थिक क्रांतीची सुरुवात. जागतिकीकरण, उदारीकरण या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला आणि मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली. यावेळी भारताचे अर्थमंत्री असलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव भरपूर गाजले.
परंतु मनमोहन सिंग यांना आपल्या मंत्रीमंडळात सामील करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेणारे तत्कालीन पंतप्रधान होते- पी व्ही नरसिंह राव.
असे म्हणतात की, कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठ नेत्यांशी पटत नसल्याने पी व्ही नरसिंह राव यांना कधी प्रसिद्धीच्या झोतात येऊच दिले नाही.
कॉंग्रेस पक्षाच्या १९९६ च्या निवडणुकीतील अपयशांसाठी मात्र त्यांना जबाबदार धरले गेले होते. काही दिवसांपुर्वी सोनिया गांधी आणि कॉंग्रेसच्या काही वरिष्ट नेत्यांनी त्यांची तोंड भरुन स्तुती केली.
आज आपण याच अनुषंगाने पी. व्ही. नरसिंह राव यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द आणि त्यांच्या वाट्याला आलेली दुर्लक्षीतता याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
९०च्या दशकाच्या सुरुवातीला भारत आर्थिक मंदीच्या छायेत असताना भारताला या मंदीतुन बाहेर काढण्यात पी. व्ही. नरसिंह राव यांचा मोठा हात होता. परंतु कॉंग्रेस पक्षाने कधीही त्यांना त्याचे श्रेय दिले नाही.
राजीव गांधींची हत्या तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव यांचे चंद्रस्वामींशी अतिशय जवळचे संबंध होते. राजीव गांधी यांच्या हत्येत चंद्रस्वामी यांचा हात होता असे सोनिया गांधीना वाटत होते. त्यात राजीव गांधींच्या हत्येच्या तपासात हलगर्जीपणा केला जात आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर केला होता.
खरंतर, राव यांना पंतप्रधान बनवण्यामागे त्यांची गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हे एक महत्वाचे कारण होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक सुधारणा करणारे निर्णय घेतले. संस्थात्मक निवडणुकांना सांविधानिक दर्जा देण्यात त्यांच मोठा हात होता.
पण, असे काही महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांनी सोनिया गांधी यांचा सल्ला घेतला नाही. अशा वेळी राव यांच्यावर नेहरुंच्या सामाजिक अर्थशास्त्राला मुठमाती देणे, आरएसएस आणि भाजपच्या हिताचे निर्णय घेणे असे आरोप केले जाऊ लागले. आधीच बिघडलेल्या सोनिया गांधी- राव यांच्या संबंधांना या बातम्यांनी खतपाणी मिळत गेले.
सोनियांच्या मनात असलेल्या या रागाचा भडका १९९५ मध्ये भर सभेत उडाला. अमेठी मधील एका सभेत त्यांनी सांगितले, “साडे चार वर्षे उलटली, तरीही माझ्या पतीच्या हत्येच्या खुनाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरु आहे. फुट पाडणाऱ्या काही अंतर्गत शक्तींची ताकद वाढत चालली आहे.”
या भाषणानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांचे राजकीय दिवस भरले असेच म्हणावे लागेल.
मे १९९६ मध्ये पंतप्रधानपद गेल्यानंतर राव यांच्या अडचणींमध्ये भरच पडत गेली. सेंट किट्टी घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप करण्यात आले, लखूभाई पाठक लाच प्रकरणात चंद्रस्वामी बरोबरच त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्यांना दोन्ही प्रकरणातुन निर्दोष सोडण्यात आले. पुढे त्यांच्या मुलाला १३३ करोडच्या युरिया घोटाळ्यात तुरुंगात टाकण्यात आले.
आर्थिक सुधारणांचे पुर्ण श्रेय मनमोहन सिंग यांना देण्यात आले. राव यांना कॉंग्रेसच्या कार्यकारीणी समितीतसुद्धा स्थान देण्यात आले नाही (जे प्रत्येक माजी पंतप्रधानास देणे अनिवार्य होते).
सगळ्या जगाप्रमाणेच शीतयुध्दाचे परिणाम भोगणाऱ्या भारताला त्यातुन बाहेर काढण्याचे श्रेय त्यांना कधीच दिले गेले नाही.
पी. व्ही. नरसिंह राव यांची अवहेलना फक्त जिवंत असतानाच नाही तर मृत्युच्या वेळीही चालूच राहिली. त्यांच्या मृतदेहाला दर्शनासाठी कॉंग्रेसच्या मुख्यालयात नाही तर बाहेर ठेवण्यात आले. तसेच बाकी कॉंग्रेसच्या पंतप्रधानांसारखे त्यांचे अंत्यविधी आणि स्मारकही दिल्लीमध्ये करु दिले नाहीत.
नेहमी राव यांचा अपमान करत असणारा कॉंग्रेस पक्ष अचानक त्यांच्या स्तुतीचे गोडवे का गातोय या प्रश्नाचे उत्तर राजकीय हेतू असल्याचा दावा आज केला जातोय. राव यांच्याबद्दल बोलताना सोनिया गांधी म्हणतात,
“राव यांच्या काळात देशाने अनेक मोठमोठ्या संकटांचा सामना केला. ते एक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवलेले व्यक्ती होते आणि त्यांच्या कार्याचा कॉंग्रेसला अभिमान आहे. पी. व्ही. नरसिंह राव यांचे जन्म शताब्दी वर्ष त्यांच्या कार्याला आठवण्याची एक संधी आहे.”
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीसुद्धा राव यांची स्तुती केली. १९९१ च्या बजेटमध्ये त्यांचे असलेले योगदान आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेत त्यांचे असलेले योगदान यासाठी त्यांनी राव यांची स्तुती केली. तसेच विदेशनिती आणि चीनशी असलेल्या संबंधांत केलेल्या सुधारणांसाठी त्यांनी राव यांना श्रेय दिले.
या स्तुतीमागे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये आपली पकड घट्ट करण्याचा राजकीय हेतू असल्याचा दावा तज्ञ करत आहेत. राव यांचे जन्मस्थळ आंध्रप्रदेश मध्ये असुन तेथील लोकांच्या मनात असलेला राव यांच्यासाठीचा आदर याचे रुपांतर मतदानात करण्याचा कॉंग्रेसचा हा डाव असल्याचा आरोप राव यांचे नातू असलेले एन. वी. सुभाष यांनी केला आहे.
कॉंग्रेसने जरी राव यांचा अपमान केला असला तरी भाजपने मात्र नेहमीच राव यांचा सन्मान केला आहे. ज्या गोष्टींसाठी कॉंग्रेसने राव यांचा राग आणि अपमान केला अगदी त्याच कारणांमुळे भाजपने राव यांना सन्मान दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांना भारतरत्न देण्याची मागणीसुद्धा भाजपमध्ये आता जोर धरत आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर जवळ जवळ दुप्पट करण्यात मोलाची भूमिका बजावणारया या नेत्याच्या वाट्याला अशी अवहेलना यावी हे भारतीय राजकारणाचे एक विदारक सत्य आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणुन भारतरत्न मिळाले तर त्यांच्या वाट्याला आलेल्या या अवहेलनेची थोडीफार तरी भरपाई होइल एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.