आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
१९७१ सालच्या यु*द्धानंतर भारतात आनंदाने फटाके वाजवले जात होते आणि पाकिस्तानात दुःख आणि आत्मसंशयाची लाट आली होती. १९६५ नंतर भारतीय सैन्याने तिसऱ्यांदा पाकिस्तानी सैन्याला धुळ चारली होती. पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांग्लादेश अस्तिवात आला होता. पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली होती. पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते.
एखाद्या देशाच्या सैन्याने आत्मसमर्पण करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती. या ऐतिहासिक घटनेच्या ८ महिन्यांनी १९७२ मध्ये भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान शिमला करार झाला.
यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या कथांचे पेव फुटले. काही कथांना तेव्हाच तिलांजली देण्यात आली तर काही आज देखील प्रचलित आहेत. अशीच एक कथा आहे, पाकिस्तानी कोडची. हा कोड होता, “मुबारक हो बेटा हुआ है”. ही कथा लोकांना ऐकवली होती, माजी पाकिस्तानी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांनी. त्यांनी त्यांच्या डॉटर ऑफ द ईस्ट या पुस्तकात ही गोष्ट सांगितली आहे.
शिमला कराराच्या वेळी बेनझीर पहिल्यांदा आपले वडील जुल्फिकार अली भुट्टो यांच्यासोबत भारतात आल्या होत्या. यावेळी भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान होत्या. १९७१ च्या पराभवाने जुल्फिकार अली भुट्टो यांना भारताशी वैर घेण्याची किंमत कळाली होती.
बेनजीर यांच्या मते जुल्फिकार भुट्टोला या करारात काश्मीर प्रश्नावर तोडगा अपेक्षित होता. त्याची इच्छा होती की काश्मीर भारताला परत करावे पण त्याच्यावर पाकिस्तानी सेना, आयएसआय तसेच लाहोर लॉबीचा मोठा दबाव होता.
जर जुल्फिकार यांनी भारताच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या परिवाराला ताब्यात घेण्याची तयारी केली होती. यामुळे गप्प बसण्यावाचून जुल्फिकार यांच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.
जुल्फिकार जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांच्यासोबत बेनझीर भुट्टो आणि ८४ सदस्यांचे शिष्टमंडळ देखील आले होते. या शिष्टमंडळात पाकिस्तानच्या विविध राजकिय पक्षांचे सदस्य देखील उपस्थित होते.
जुल्फिकार यांनी स्वतः त्यांचे शिष्टमंडळ निवडले होते. जुल्फिकार यांच्या मते जर ह्या शिष्टमंडळासमोर करार झाला, तर पाकिस्तानात त्यांच्यावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. परंतु कुठल्या नेत्याने सोबत इतक्या लोकांना घेऊन येणे ही मोठ्या शरमेची बाब होती. जुल्फिकार यांनी यासाठी इंदिरा गांधींची नंतर माफी मागितली होती.
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडून बोलणी करायला आयएसआय आणि पाकिस्तानी सेनेचा प्यादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजीज अहमद या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. भारताकडून काश्मीरचे मुत्सद्दी दुर्गा प्रसाद धार यांची नियुक्ती करण्यात आली. दुर्गा प्रसाद अर्थात डी पी धार हे १९७१ च्या यु*द्धाच्या विजयाचे शिल्पकार होते.
दोन्ही अधिकारी एकमेकांना भेटण्या अगोदरच धार यांची तब्येत बिघडली. मग भारताकडून परमेश्वर नारायण हकसर यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले. हकसर हे ६ वर्ष इंदिरा गांधींचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. त्यांच्या कामाचा प्रकार वेगळा होता. जेव्हा हकसर शिमला कराराची तयारी करत होते तेव्हा त्यांच्या मनात दुसऱ्या महायु*द्धानंतरच्या व्हॉइसरॉयच्या तहाच्या वेळीचा घटनाक्रम घुटमळत होता.
शिमला करारावर चर्चा सुरू झाल्या. पण दोन्ही देशात एकमत झाले नाही. भारताची इच्छा होती की जम्मू काश्मीरची विभागणी करणाऱ्या रेषेला सीजफायर रेखा नाही तर ‘नियंत्रण रेखा’ म्हणून ओळखले जावे. परंतु यामुळे अर्थच बदलतो असे म्हणत पाकिस्तानी तयार नव्हते.
जुल्फिकार आणि इंदिरा गांधी यांची भेट १ जुलै १९७२ रोजी झाली. जुल्फिकारसोबत अजीज पण होते . २ जुलै १९७२ रोजी जुल्फिकार आणि अजीज पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या भेटीला गेले. अजीज अहमद यांनी काश्मीर सोडून भारताच्या प्रत्येक अटीला आमची मान्यता असल्याचे कबूल केले. इंदिरा गांधी यांचा हे ऐकून संताप झाला. पण त्या काही बोलणार इतक्यात जुल्फिकार म्हणाले की अदृश्य सीमा तयार करू लोकांना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येण्याची परवानगी देऊ व दोन्ही देशातील भांडण थांबवू.
परंतु अजीज यांना हे मान्य नव्हते. त्यांना कोणत्याही प्रकारे नियंत्रण रेखा नको होती. त्यांची वागणूक बघून भारताने देखील कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली. बैठकीत वातावरण तापायला सुरुवात झाली. एक वेळ अशी होती की करार होणे असंभव होऊन बसले होते. इंदिरा गांधींनी भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानी लोकांना ३ जुलैला मायदेशी परत जाण्याची सूचना करायला सांगितले.
जुल्फिकार अजूनही कराराच्या बाजूने होते. पण करार होत नसल्याने ते निराश होत होते. परंतु परत जाण्या अगोदर त्यांनी इंदिरा गांधींना शेवटचं भेटायची इच्छा व्यक्त केली.
इंदिरा गांधी शिमल्याच्या प्रसिद्ध रिट्रीट बिल्डिंगमध्ये थांबल्या होत्या. या बैठकीत जुल्फिकार यांच्यासोबत कोणीच नव्हते. दोन्ही नेत्यांमध्ये शिमल्यात बंद दाराआड चर्चा झाली. बैठकीत चर्चेतून समाधान मिळालं आणि दोघांनी करार करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा जुल्फिकारही बैठकीतून परत गेले तेव्हा ‘सिजफायर लाईन’ ऐवजी ‘नियंत्रण रेखा’ अर्थात एलओसी असे नामकरण करण्यात आले. अजीज नाराज होते तरी त्यांनी अधिकारी वर्गाकडून यावर ड्राफ्ट बनवून घेतला.
जुल्फिकार आणि इंदिरा गांधी यांच्यात काय चर्चा झाली हे कोणालाच माहिती नव्हते. परंतु सगळ्यांना एक गोष्ट माहिती होती की करार होऊन, समस्येवर पडदा पडेल. जे शिष्टमंडळ ३ जुलैला परत जाणार होते थांबले. चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली.
टेबलच्या एका बाजूला ८४ पाकिस्तानी लोकांचे शिष्टमंडळ, तर दुसऱ्या बाजूला भारतीय अधिकारी बसले होते. बंद दाराआड काय चर्चा सुरू आहे यापासून सर्वच अनभिज्ञ होते. बाहेर बसलेले लोक फक्त अंदाज लावत होते.
सर्व अधिकारी त्या खोलीच्या बाहेर उभे राहून या चर्चेतून काय समोर येतं याची वाट बघत होते. तेव्हा पाकिस्तानी अधिकारी वर्गाला एक उपाय सुचला आणि त्यांनी एक सिक्रेट कोड तयार करायचा निर्णय घेतला जेणेकरून चर्चेचा परिणाम भारताच्या पक्षात लागला की पाकिस्तानच्या हे आपल्या लोकांपर्यंत पोहचू शकेल.
दोन सिक्रेट कोड तयार करण्यात आले. जर करार भारताच्या बाजूने लागला तर अधिकारी बाहेर येऊन सर्वाना सांगणार ‘बेटी हुई है’ अर्थात मुलगी झाली आहे. जर हा करार पाकिस्तानच्या पक्षात असेल तर म्हणायचे की बेटा हुआ है.
हे सिक्रेट कोड ठरवून झाल्यानंतर सर्वत्र बेचैनी पसरली. प्रत्येकजण आपल्या बाजूने निकाल लागावा अशी अपेक्षा करत होता आणि इतक्यात हॉलचा दरवाजा उघडला एक अधिकारी बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते.
तो सरळ दुसऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्याकडे गेला आणि त्याने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. मग तो अधिकारी जोरात म्हणाला मुबारक हो बेटा हुआ है आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यु*द्धातील मानहानीकारक पराभवानंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या हाती काही लागलं होतं. भारताने त्यांच्या ९३००० सैनिकांना सोडले.
खरंतर पाकिस्तानला तेव्हा जो ‘बेटा’ झाला, त्याचे कौतुक आजवर चालू आहे. जुल्फिकार भुट्टो यांचा तो एक विजयच होता.पण प्रश्न पडतो की भारताच्या सशक्त पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या मागण्या मान्य का केल्या? याचे रहस्य हे बंद दरवाज्या आडच्या चर्चेतच विरून गेले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.