आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सत्तेच्या कार्यपध्दतीला विरोध करुन ठामपणे आपली बाजु मांडायची म्हणजे बंडच. अशा वेळी पत्रकारीता हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. पण काही सरकारे या वैचारिक स्वातंत्र्य असलेल्या माध्यमालाही बेड्यांमधे जखडुन ठेवण्याचा प्रयत्न करतात. असंच काहिसं केलं गेलं ते १९७५ च्या इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात.
आणीबाणीच्या २१ महिन्याच्या कालावधीत सरकारी यंत्रणेच्या विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, वर्तमानपत्राला बंद करण्यात आले. नागरिकांचे मुलभुत अधिकार काढून घेण्यात आले.
माध्यमं बंद झाली म्हणुन विचार बंद करता येत नाहीत. मनात धुमसत असलेल्या वैचारिक अग्नीला कोणत्याही बेड्या जखडुन ठेवू शकत नाही. आणि हे सिध्द केलं कुलदीप नायर या एका पत्रकाराने.
इंदिरा गांधी सरकारच्या भितीला न जुमानता त्यांनी आपलं परखड मत मांडलं आणि भारताला भेटलेल्या मोजक्याच निर्भीड आणि हुशार पत्रकारांमध्ये आपलं नाव कमावलं. आज आपण याच पत्रकारा विषयी जाणुन घेणार आहोत.
कुलदीप नायर यांचा जन्म १४ ऑगस्ट, १९२३ ला सियालकोट (आता पाकिस्तान ) इथे झाला. जसजसे मोठे होत गेले तसच भारतीय स्वातंत्र्यलढा अजुन तीव्र होत गेला. तरुणपणात त्यांच्यावर भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी पुढे जाऊन भगतसिंगांची जीवनी लिहिली असावी.
१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुढे भारत- पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात परत आले. फाळणीचा मानसिक तणाव त्यांच्या मनावर कायमचा प्रभाव पाडून गेला. म्हणुनच आयुष्यभर भारत-पाकिस्तान मध्ये मैत्री संबंध व्हावेत यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले.
भारतात आल्यानंतर त्यांनी उर्दू वर्तमानपत्रामध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता मोठं नाव कमावलं.
जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी त्यांची खास ओळख होती. लालबहादूर शास्त्री यांच्यासाठी त्यांनी पत्रकारीता सचिव म्हणून काम केले. मृत्यूच्या वेळी ताशकंदमध्ये शास्त्रींबरोबर असणारया मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होता.
आपले केस कापल्यानंतर आपण कसे दिसतोय असा प्रश्न त्यांना इंदिरा गांधी यांनी विचारला होता, यावरुन त्यांचे इंदिरा गांधी यांच्याशी पण घनिष्ट संबंध होते असं लक्षात येतं. पण याच इंदिरा गांधीनी त्यांना तुरुंगातही पाठवलं ही बाब सुध्दा तेवढीच महत्वाची आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना मागच्या निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवुन पंतप्रधान पदासाठी अयोग्य घोषित केले होते. यामुळे इंदिरा गांधी यांच्यावर पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. हा दबाव हटवण्यासाठी त्यांनी आणीबाणी घोषित केली. कुलदीप नायर त्यावेळी ‘इंडियन एक्सप्रेस’ या वर्तमानपत्रात संपादक म्हणून काम करत होते. पुढे जाऊन त्यांनी आणीबाणीच्या काळास ‘जंगलराज’ अशी उपमा दिली .
सरकारने २५ जून, १९७५ ला देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी सुरु होताच सरकार विरोधात आंदोलने चालू झाली. जनसंघ यामध्ये अग्रेसर होता. कम्युनिस्ट पक्ष यामध्ये सरकार बरोबर होता तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सरकारच्या भितीने गप्प होता. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेलाही सरकार समोर नमतं घ्यावं लागत होतं.
अशा वेळी आपली जबाबदारी पार पाडण्याचा विचार कुलदीप नायर यांनी केला. २५ जूनच्या रात्री नायरजींच्या कार्यालयात एक फोन आला. वर्तमानपत्रात काहीही छापण्यापुर्वी ते नेमणूक केलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडून तपासुन घ्यावं या आशयाचा तो फोन होता. यानंतर नायरजींनी आपल्या वर्तमानपत्रात २ रकाने रिकामे ठेवण्यास सुरुवात केली. तसेच एका लेखात त्यांनी भारतातील परिस्थितीला पाकिस्तानातील अयुब खानच्या हुकुमशाही बरोबर तुलना केली. असं केल्यानंतर त्यांना अटकेची धमकी देणारा अजुन एक फोन आला.
पुढच्या दिवशी त्यांनी प्रेस क्लब येथे १०३ पत्रकारांना एकत्र केले आणि आणीबाणीच्या विरोधात एका घोषणापत्राचं जाहीर वाचन केलं आणि तत्कालीन पंतप्रधानावर टीका केली. त्या घोषणापत्रावर त्यांनी तिथे जमलेल्या सगळ्या पत्रकारांच्या सह्या घेतल्या आणि राष्ट्रपती कार्यालयात जमा करण्यासाठी निघाले.
घरी पोहचताच त्यांना सुचना मंत्री वी. सी. शुक्ला यांचा फोन आला. पत्रकारांच्या सह्या असलेलं ते घोषणापत्र माझ्याकडे जमा करावं असं मंत्र्यांचं म्हणणं होतं. कुलदीपजींनी याला स्पष्ट नकार दिला. त्याचरात्री पोलिसांनी कुलदीपजीना अटक करुन तिहार येथील तुरुंगात पाठवण्यात आले.
आपली सुटका झाल्याची बातमी वर्तमानपत्रात न छापण्याच्या अटीवर त्यांना तुरुंगातुन सोडण्यात आले. वातावरणाचा अहवाल स्वत:च्या नावे छापून त्यांनी जगाला आपली सुटका झालीय आणि आपण खंबीरपणे सरकारच्या विरोधात उभे आहोत हे असे दाखवून दिले.
कुलदीपजीना तुरुंगात टाकुन बाकीच्या पत्रकारांमध्ये भिती निर्माण करण्याची सरकारी योजना मात्र यशस्वी झाली. त्यांच्या बरोबर असलेल्या बाकी पत्रकार मित्रांनी त्यांच्या पासुन दुर राहण्यास सुरुवात केली.
पुढे १९७७ मध्ये आणीबाणी काढण्यात आली. नवीन निवडणुक झाली आणि कांग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी यांचा त्यांच्या हक्काच्या रायबरेली मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.
कुलदीपजींच्या आग्रहानंतर भारतीय संविधानात असलेल्या आणीबाणीच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्यात आला. आज आणीबाणी घोषित करण्यासाठी लोकसभेच्या २/३ बहुमताची आणि अर्ध्या राज्य सरकारांची परवानगी गरजेची आहे. परंतु तरीही अघोषित आणीबाणी लागू केली जाऊ शकते या विचारानेच त्यांनी त्यांची पत्रकारीता पुढे चालु ठेवली.
एका पत्रकाराबरोबरच त्यांनी मानवी हक्क, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सौजन्य या गोष्टिंचा नेहमीच हट्ट धरला. या मुल्यांसाठी लढण्यातच त्यांनी त्यांच्या आयुष्याची धन्यता मानली. अशा या धाडसी आणि लढवय्या पत्रकाराचा मृत्यू २२ ऑगस्ट २०१८ ला झाला.
पत्रकारितेची ताकद आणि स्वत:च्या तत्वांशी एकनिष्ट राहण्याची ही जीवनगाथा येणाऱ्या कित्येक तरुण पत्रकारांना प्रेरित करेल एवढं नक्कीच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.