आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतीय इतिहासात असे अनेक शूरवीर योद्धे होऊन गेले आहेत, ज्यांनी परकीय आक्रमण रोखत देश व धर्मासाठी प्राणाची बाजी लाऊन आपले साम्राज्य अभेद्य ठेवले. त्यापैकीच एक साम्राज्य होते मेवाड.
मेवाडची ओळख करून देतांना अनेक इतिहासकार वा लेखक तिचा शूरांची जन्मभूमी असा उल्लेख करतात. मेवाडच्या मातीत राजा रावल सिंह, राजा संग्रामसिंग उपाख्य राणा सांगा, हिंदुवीर महाराणा प्रतापसिंह, राणा उदयसिंह अशा राजपूत वीरांचा जन्म झाला आहे.
मेवाडचा अजरामर इतिहास ज्या माळेत गुंफला गेला त्यातील एक अनमोल हिरा होता, राणा सांगा.
राणा सांगा अत्यंत शूर योद्धे होते, मेवाडवर येणारा प्रत्येक शत्रू हा राणा सांगाच्या नावाला घाबरायचा. आपल्याला मिळालेलं राजपूत घराण्यातील “हे जीवन साम्राज्याच्या रक्षणासाठीच आहे, त्यासाठी प्राण द्यायला मागे हटलो तर मी राजपूत कसला?” हे त्याचं प्रमाण मत असायचं.
मेवाड राज्याचे राजे राणा रायमल सिंह यांच्यानंतर राणा सांगा मेवाडचे राजे बनले. आपल्या कार्यकाळात त्यांनी मेवाडसाठी जे जे काही शक्य असेल ते सर्व काही करत मेवाड ला संपन्न बनवण्याच काम करत आदर्श राजा ही ओळख निर्माण केली.
राणा सांगा जेवढे उत्तम प्रशासक होते तेवढेच वीर योद्धेसुद्धा होते. त्यांची तलवार तर चक्क २० किलो वजनाची होती असा उल्लेख ही इतिहासात सापडतो.
राणा सांगा यांचा एक डोळा निकामी होता अर्थात तो कुठल्या युद्धामुळे नाही तर तारुण्यात आपल्या भावंडा समवेत खेळत असतांना इजा झाल्याने तो निकामी झाला होता, पण युद्ध व रणनीतीच्या बाबतीत मात्र त्यांची नजर अत्यंत तेजतर्रार होती.
राजा राणा सांगा आपल्या साम्राज्य व धर्माच्या च्या बाबतीत अत्यंत कठोर व प्रामाणिक होते. इस्लामी राजवटी या अन्यायकारक असून त्या आपल्या साम्राज्यावर चाली करतील याची कल्पना राणा सांगा यांना होतीच.
त्यासाठी त्यांनी नियोजनपूर्ण आखणी व विभागणी करत योजना तयार केली. इस्लामी शासकांकडे मोठे सैन्य असून त्यांचा थेट सामना आपण करू पण त्यासाठी पाठबळ मिळाले तर अधिक उत्तम या आशयाचा विचार करून त्यांनी अनेक हिंदू राजांना सहकार्य करत एकत्र येण्याचेही आवाहन केले होते.
याची सुरुवात स्वतःपासून करत मांडूचा मुस्लीम सरदार मोहम्मद सुलतान १५७६ मध्ये जेव्हा गागरोनच्या राजावर चाल करून गेला त्यावेळी राणा सांगा हे आपली ५० हजाराची फौज घेऊन त्याच्या मदतीसाठी गेले होते. या युद्धात त्यांच्या सैन्याने पराक्रम गाजवत मोहम्मदला जबर जखमी करत पराभूत केले होते.
मोहम्मदवर ८० वार झाले अजून तो मृत्यूशय्येवर आहे. हे समजल्यावर राणा सांगा यांनी आपले सहकारी पाठवून मोहम्मदवर उपचार केले होते, असा संदर्भही काही लेखात सापडतो.
राणा सांगा यांनी यांनी अनेक मोहिमा फत्ते करत आपली वीरता व युद्ध कौशल्य सिद्ध केले. युद्धा दरम्यान जिंकलेले अनेक प्रदेश त्यांनी स्थानिक हिंदू राजांना भेट म्हणून सादर केले. यातून शेजारील राज्याबरोबर मैत्रीचे संबंध बनवून युद्धकाळात सहकार्याची त्यांची भावना होती.
राणा सांगाबद्दल त्यांच्या राज्याबरोबरच शेजारील राज्यातील राजे-महाराजे यांच्यातही आदर वाढत होता.
राणा आहे तोपर्यंत आपल्या सीमा सुरक्षित आहेत हा विश्वासच जणू अनेक राजांना वाटू लागला. राणाला आपल्या प्रजेप्रती अतीव प्रेम होते, तर शत्रु पक्षाचे अनेक सरदार राणाच्या तलवारीला भ्यायचे. राणा सांगा हा प्रमुख असून तो युद्ध कौशल्यातही निपुण आहे, त्याचा पाडाव केला तर इतर राजे भिऊन आपले राज्य घेऊन शरण येतील, असे असा एक कट मुस्लीम शासकांमार्फत रचला जात होता.
यातच बाबर हा मोठ्या शिताफीने भारतभरावर आक्रमण करून आपली “सल्तनत” वाढवण्याचा पण करत चालून येत होता. तर इकडे रण संगाच्या विजयाची घोडदौड सुरूच होती.
राणा सांगा यांच्याबद्दल सांगायचे झालेच तर त्यांचे राज्य दिल्ली, गुजरात आणि माळवा च्या मुघल सरदारांकरवी घेरले गेले होते.
दिल्लीचा सिकंदर लोदी, गुजरातचा बेगडा शाह ,आणि माळव्याचा नसिरुद्दीन एकत्र येऊन मेवाड जिंकण्याचा प्रयत्न करू लागले. पण आपल्या युद्ध कौशल्याने राजकीय पराक्रम गाजवून त्यांच्या सैन्याने या तीनही मुस्लीम राजांना पाणी पाजत मेवाड राखले होते.
१५७६ मध्ये दिल्लीचा सरदार इब्राहीम लोदीसह झालेल्या युद्धात देखील मेवाड सैन्याने मोठा विजय मिळवला होता. दुर्दैवाने या युद्धादरम्यान शत्रूचा वार राणाच्या हातावर झाल्याने त्यांना आपला एक हात गमवला लागला होता, आणि पायालाही जन्मभराची इजा झाली होती. पण यामुळे खचून न जाता ते पुन्हा त्याच उत्साहाने आपल्या कर्तव्यात उतरले होते.
राणा सांगा यांच्या पराक्रमाची खरी गाथा सांगितली जाते ती खानवाच्या युद्धात दाखवलेल्या वीरतेसाठी.
बाबरला भारताचा सम्राट व्हायचे होते तर राणा सांगा यांना भारतावरील इस्लामी आक्रमण रोखायचे होते.यातुनच खानवाचे युद्ध लढले गेले. राणा व बाबरचे सैन्य युद्ध भूमीवर येण्यापूर्वीच राणाच्या सैन्याचे पराक्रम ऐकून बाबरच्या सेनेच मनोबल खचले होते.
त्यामुळे बाबरचे सेनेतील लोक मोठ्या प्रमाणावर दारू पिऊ लागले, याचा परिणाम युद्धावर होऊ नये म्हणून बाबराने दारू पिण्यावर बंदी घालून त्यासाठी नियम केला होता असाची उल्लेख काहीं पुस्तकात सापडतो.
यानंतर राणा आणि बाबराचे सैन्य रणांगणात जोरदार भिडले. एखादा वाघ शिकारीवर तुटून पडावा तसा मेवाडचा प्रत्येक शिलेदार साम्राज्याच्या रक्षणासाठी बाबरच्या क्रूर सेनेवर बेभान होऊन तुटून पडला.
राणाच्या सैन्याकडे निर्धार होता पण बाबराकडे असणारे सैन्य व राणांनी मदत केलेल्या अनेक हिंदू राजांकडून ऐनवेळी न मिळालेले सहकार्य यामुळे राणा संगांच्या सैन्याचा पाडाव झाला,मोठ्या प्रमाणावर सैनिक मारले गेले.
या युद्धाच्या दरम्यान एक बाण राणांच्या चेहऱ्यावर लागून ते घायाळ झाले होते, त्यांच्या काही खास शिलेदारांनी त्यांना जखमी अवस्थेत दूर नेऊन त्यांचा पोशाख परिधान करून पुढील युद्ध लढवले होते.
या युद्धात हे शिलेदारही मारले गेले. मेवाड सैन्याची मोठी हानी झाली, लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या राजपूत सैन्याची शीर एकावर एक ठेवून बाबराने एक ढीग रचला व राजपूतांच्या पराक्रमाला डाग लावला. हि बाब ज्यावेळी राणा यांना समजली तेव्हा त्यांना प्रचंड राग आला.
“बाबराचा पराभव केल्याशिवाय मी चित्तोड ला परतणार नाही” अशी शपथ त्यांनी घेतली.
ते होती नव्हती तेवढी सेना घेऊन पुन्हा बाबरवर चाल करण्याचा बेत आखत होते, एवढ्यातच त्यांच्या एका विश्वासूने त्यांच्यावर विष प्रयोग केला. आणि यातच राणांचा मृत्यू झाला.
अखंड भारतावर इस्लामी राजवटीचा काळोख पसरला जाऊ नये यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राणा सांगा झुंझत राहिले. भारत मातेच्या वीर सुपूत्रांपैकी एक असलेले राणा हे प्रेरणेचा एक स्रोत आहेत हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.