आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत पदार्पण करताना अनेक बदल ‘ तिच्या ‘ शरीरात घडतात. ऋतूप्राप्ती हा स्त्रियांच्या शारीरिक वाढीतला एक महत्वाचा बदल असतो. या बदलाचा प्रभाव तिच्या सर्वांगीण विकासावर होतो.
शिवाय आयुष्याच्या या टप्प्यासोबत एक भावनिक किनार देखील जोडली असते. या पडावावर तिची सर्वाधिक काळजी घेणं आवश्यक असतं. स्वच्छता, पोषण, होणाऱ्या मानसिक बदलांची विशेष काळजी घ्यावी लागते.
मुलींमधे वयाच्या १२ -१५ व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते व ३५ वर्ष पुढे नियमित सुरू राहते. केवळ चार दिवस चालणारी ही प्रक्रिया नव्हे तर महिनाभर शरीरात चालणाऱ्या एका नियमित चक्राचा फक्त एक भाग आहे. या चार दिवसांत सर्वाधिक काळजी घेणं आवश्यक असतं. आजकाल मुली कपड्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन्सना प्राधान्य देतात. पण याचे दुष्परिणाम देखील त्यांना सहन करावे लागतात.
कधी कधी एकच सॅनिटरी नॅपकिन्स दिवसभर वापरल्यामुळे अनेक आजार स्त्रियांना होतात. हे आजार जीवघेणे ठरू शकतात !
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न एका १८ वर्षीय मुलीने केला आहे.
अरुणाचल मुरुगानथम ज्यांनी सर्वात आधी या प्रश्नाचा विचार केला व अत्यंत कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन्स बनवून विकले आणि कपड्यांच्या ऐवजी सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याबाबत जागरूकता निर्माण केली.
कोइंबतूर येथील या व्यक्तिमत्वाला आपण ‘ पॅडमॅन ‘ म्हणुन ओळखतो ! त्यांच्याच शहरातील १८ वर्षीय इशाना हिने पुढाकार घेवून आणखी एक प्रयोग केला आहे.
ईशानाने बारावी नंतर सहा महिन्यांचा फँशन डिझायनिंगचा कोर्स केला. तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा होती. तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्याने त्रास व्हायचा.
त्यावेळी तिने स्वतः कापडी सॅनिटरी नॅपकिन्स बनवून वापरले. याच कल्पनेला धरुन व्यवसाय सुरू करावा व इतर मुलींना देखील या त्रासातून मुक्त करावं अशी कल्पना तिच्या मनात आली.
सर्वप्रथम तिने हे सॅनिटरी नॅपकिन्स तिच्या मैत्रिणींना दिले. त्यांच्या कडून उत्तम प्रतिसाद आल्यावर तिने हा विचार पुढे नेण्याचं ठरवलं. हें सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्यासाठी ती पुर्णपणे कापूस आणि कापडाचा वापर करते.
कुठल्याही रासायनिक पदार्थांचा वापर ती करत नाही. यामुळे ते सुरक्षतेच्या कसोटीवर अव्वल ठरतात. शिवाय हें सॅनिटरी नॅपकिन्स धुवून पून्हा वापरता येतात. धुण्यासाठी पाण्यात हळद टाकावी व उन्हात वाळवावे असा सल्ला ती देते.
दुसऱ्यांदा वापरताना इस्त्री करून घ्यावी जेणेकरून सॅनिटरी नॅपकिन्स जंतू विरहित होतील. आज जे प्लास्टिकचे, रासायनिक पदार्थांनी युक्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात त्यांचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. त्यांची विल्हेवाट लावण्याचा जटिल प्रश्न समोर आहेच. शिवाय रोगराई सुद्धा पसरू शकते. अनेक वर्ष जमिनीत पडून राहतात व त्यांचं विघटन देखील होत नाही.
कोइंबतूरला बऱ्याच नद्या आहेत. तिच्या असं लक्षात आलं की नद्यांच पाणी या सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्यामुळे दूषित होत आहे. त्यामुळे कापडी सॅनिटरी नॅपकिन्स एक उत्तम पर्याय आहे.
ती असंही सांगते की व्यवस्थित वापरल्यास एक सॅनिटरी नॅपकिन १२ वेळा वापरू शकता. आशा अनेक कारणांसाठी ती कापडी सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा सल्ला देते.
या मुळे स्त्रिया अनेक आजारांपासुन दूर राहतात व पर्यावरणचं देखील संरक्षण होतं. प्लास्टिकचे सॅनिटरी नॅपकिन्स गेल्या ३० वर्षांतच भारतात आले व प्रचलित झाले. त्याआधी सर्व स्त्रिया कापडाचा वापर करीत.
पण आत्ता प्लास्टिकचे सॅनिटरी नॅपकिन्स बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे पर्याय उरत नाहीत. शिवाय दिवसभर बाहेर काम करणाऱ्या महिला व मुलींसाठी कपडा वापरणं सोयीचं नसतं. त्यामुळे, मधला उपाय शोधायला हवा. जो ईशानाने शोधला.
बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन्सच्या आकाराचे पण कापडी सॅनिटरी नॅपकिन्स सोयीचे देखील आहेत व योग्य देखील आहेत.
एका मुलीसाठी इतक्या लहान वयात हा व्यवसाय सुरू करणं अजिबात सोप नव्हतं. पण तिची इच्छाशक्ती प्रचंड होती. आज कोइंबतूर येथे तिच्या घरी स्वतःच दुकान आहेत जिथे जवळपास २० महिला कामगार काम करतात.
या सत्कार्यात आणखी एक जोड म्हणजे तिने रोजगारसुद्धा निर्माण केला. जवळपास ५००० रुपये महिना त्या महिला कमावतात. तिच्या या खास कापडी सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल ऐकून हैदराबाद, केरळ व इतर राज्यातील व्यापाऱ्यांनी तिला संपर्क केला.
सध्या ती एकच प्रकारचे सॅनिटरी नॅपकिन्स बनवते पण यापुढे तिला आजारामुळे पलंग धरलेल्या स्त्रियांसाठी खास सॅनिटरी नॅपकिन्स बनवायचे आहेत. शिवाय लहान बाळांकरीता देखिल डाइपर बनवण्याच्या विचारात ती आहे .
जवळपास सर्वच महिलांना मासिक पाळीच्या ‘त्या’ चार दिवसांत प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रँशेस , जळजळ पोटदुखी , कंबरदुखी अश्या अनेक समस्या स्त्रिया मूक गिळून सहन करत असतात. कुणाला सांगत सुद्धा नाहीत.
संप्रेरकांच्या कमी जास्त होणाऱ्या प्रक्रियेमुळे चिडचिड, मूड स्विंग सुद्धा होतात. अशावेळी तिला आरामा सोबत शिवाय मानसिक आधाराची सुद्धा आवश्यकता असते. समस्या प्रत्येकाला असतात.
कधी कधी एकच समस्या अनेकांना भेडसावत असते. पण आपण त्या समस्येवर उपाय न शोधता त्या समस्येसोबत जगणं शिकून जातो. पण पुढाकार घेऊन समजाला जो उपाय देतो त्याचा समाज कायम ऋणी असतो.
ईशाना सुद्धा अशाच व्यक्तिमत्वापैकी एक आहे. तिच्या एका पाऊलामुळे आज अनेक स्त्रियांना त्या चार दिवसांत सुरक्षिततेचं आश्वासन आहे.
या व्यवसायात तिला ऊत्तरोतर प्रगती मिळो व तीची ही संकल्पना भारतातच नव्हे तर देश विदेशात पोहचावी . या साठी तिला हार्दिक शुभेच्छा …!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.