आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानवाला सगळ्यात पहिला लागलेला शोध म्हणजे दगडांचे उपयोग. ह*त्यार बनवणे असो वा आग पेटवणे, माणूस दगडांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करु लागला. हळूहळू प्रगतीपथावर चालत असतानाच त्याला धातूंची ओळख झाली. सोने, चांदी, पितळ, तांबे यांचा उपयोग शिकल्यानंतर मानवाच्या उत्क्रांतीची गती वाढत गेली.
या धातुंची किंमत त्याला कळू लागल्यावर व्यवहार होण्यास सुरुवात झाली. घरातील भांड्यांपासून, नाण्यांपर्यंत, दागिने, खेळणी, ह*त्यार, दारं- खिडक्या, चिलखत, इत्यादी बनविण्यासाठी धातुंचा वापर केला जात असे.
पण जर आपण थोडं फास्ट-फॉरवर्ड करून बघितलं तर एकविसाव्या शतकात धातुंची जागा प्लास्टिकने घेतली आहे. खाण्याचे डबे असो वा बादल्या, पाण्याच्या बाटल्या, ताट- वाट्या, पेले हे प्लास्टिकचे बनविण्यात येऊ लागले व धातुंच्या उपयोगात घट होत गेली.
पण या प्लास्टिकच्या युगातही कोणीतरी धातुंवर जिवापाड प्रेम करीत होते आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जसुबेन शिल्पी’.
स्वातंत्र्यानंतर वर्षभरात जन्मलेल्या जसुबेन, बालपणापासूनच बंडखोर वृत्तीची आणि धीट होत्या. त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या इतर सवंगड्यांपेक्षा निराळ्याच होत्या. ‘टॉमबॉय’ असलेल्या जसुबेन आपल्या बॉय कट, व टी- शर्ट आणि डंग्री या वेशामुळे चार चौघात उठून दिसत.
जसुबेनला आधीपासूनच फाईन आर्ट्स (कला) व ॲस्थेटिक्स (सौंदर्य शास्त्र) या क्षेत्रात विशेष रुचि होती. कोणतेही चित्र, शिल्प दिसले की जसुबेन ती कलाकृती लगेच अभ्यासायला लागत.
जसुबेनची नजर कोणत्याही मूर्ती, चित्र किंवा शिल्पाकडे आपोआपच वळत असे.
त्यांच्या याच कलाप्रेमामुळे व त्यांच्यात असलेल्या ध्येयवेडामुळे त्यांनी ‘सी.एन. कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स’ येथे प्रवेश घेतला. त्यांना धरून त्या वर्गात केवळ पाच मुली होत्या. अभ्यासक्रमातील प्रत्येकच विषयात त्या तरबेज होत्या, पण करियर म्हणून त्यांनी शिल्पकला निवडली. विशेषत: तांबे व दगड ही माध्यमे त्यांना प्रिय होती.
त्यांचेच सहकारी मनहार शिल्पी यांच्याबरोबर त्यांनी संसार थाटला. विवाहापश्चात त्या ‘जसुबेन शिल्पी किंवा जसु शिल्पी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हा विवाह त्यांच्या आयुष्यातील त्यांनी उचलेले एक बंडखोर पाउलच होते. कारण, मनहार हे अनाथ असून त्यांची आर्थिक बाजू दुर्बळ होती व जसुबेन एका सधन कुटुंबातून होत्या.
घरच्यांचा विरोध पत्कारुन त्यांनी मनहारांशी लग्न केले होते. लग्नानंतर संसार सक्षमपणे उभा करण्यासाठी जसुबेन व मनहार यांनी कष्टांची पराकाष्ठा केली. त्यांना आपल्या व्यवसायाबरोबरच एका खाजगी शाळेत कला शिक्षिका म्हणून नोकरी करावी लागली.
पहिल्या अपत्यप्राप्तीनंतर, जसुबेन यांनी कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या हेतूने, थोडी जमीन खरेदी केली. ज्यासाठी त्यांनी कर्ज काढले व आता घर चालवण्याबरोबरच कर्जाच्या हफ्त्याचा भारही आता त्यांच्यावर येऊन पडला.
मनहार आपल्या घरीच सुरू केलेल्या ‘स्टुडिओतून’ व जसुबेन आपल्या स्कूटर वरून ठिकठिकाणच्या ऑर्डर घेऊन ते काम पूर्ण करीत. याचसोबत मनहारांच्या स्टुडिओचे व्यवहारसुद्धा त्या समर्थपणे संभाळत.
८० च्या दशकाच्या सुरुवातीस जसुबेन यांना थोड़ी प्रसिद्धी मिळतच होती की काळाने घाव घातला. १९८४ साली मनहार शिल्पी यांना कॅन्सरने ग्रासले व जसुबेन यांच्यावर सर्व भार येऊन पडला. आपल्या पतीची काळजी घेण्यापासून, मुलांचे संगोपन, व्यवसाय सांभाळुन घर चालवणे, अशा सगळ्याच भूमिका त्या एकट्याच पार पाडू लागल्या.
१९८९ साली पाच वर्ष कॅन्सरला झुंज देत शेवटी मनहार शिल्पीनी जगाचा निरोप घेतला. जसुबेनच्या सगळ्यात जवळची व्यक्ती त्यांना कायमची सोडून गेली होती. नवऱ्याच्या मृत्यूमुळे जसुबेनच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. हे एकटेपण घालविण्यासाठी त्यांनी स्वतःला आपल्या व्यवसायात पूर्णपणे बुडवून घेतले.
जसुबेननी कैक अजरामर कलाकृती घडवल्या. त्यांपैकीच एक म्हणजे २८ फूट उंचीचा हनुमानाचा तांब्याचा पुतळा. एका महिलेने घडवलेला जगातील पहिलाच सगळ्यात उंच तांब्याचा पुतळा म्हणुन त्याची नोंद करण्यात आली. तो पुतळा राजस्थानच्या ‘सूमेरपूर’ येथे स्थापित करण्यात आला.
‘झाशीची राणी लक्ष्मीबाईं’चे भारतातील चार पुतळे, कर्नाटकातील ‘राणी चेन्नमा’चा पुतळा, स्वामी विवेकानंद व महात्मा गांधींचे पुतळे या त्यांच्या उल्लेखनीय कलाकृती आहेत. याचसोबत त्यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल व मार्टिन लुथर किंग’ यांचे शिल्प देखील त्यांनी साकारले.
जसुबेनच्या ‘महाराणी लक्ष्मीबाई’ घोड्यावर स्वार असलेल्या पुतळ्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मधे नोंद करण्यात आली. या त्यांच्या शिल्पामुळे भारताची ‘ताम्रसाम्राज्ञी’ असल्याचा मान त्यांनी मिळवला.
या विक्रमाव्यतिरिक्त त्यांना अनेक पारितोषिकांनी गौरवांकीत करण्यात आले. ‘द लिंकन सेंटर ऑफ यू. एस. ए. नी’ त्यांना ‘अब्राहम लिंकन आर्टिस्ट अवॉर्ड’ प्रदान केले. ‘इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस’ या मासिकाने त्यांना ‘बेस्ट सिटिज़न ऑफ इंडिया’ या पुरस्कारासाठी निवडले. अशाप्रकारे आपल्या निराळ्या कामामुळे त्यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण केली.
तांब्याच्या मूर्तींचे एक संग्रहालय असावे असे त्यांचे स्वप्न होते. २०१३ साली आपल्या स्वप्नावर काम करत असतांना त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होऊन, दवाखान्यात भर्ती करण्यात आले व डॉक्टरांच्या सहा तासांच्या प्रयत्नांनंतर जसुबेन यांना देवाज्ञा झाली.
त्यांच्यापाठी त्यांचा हा अलौकिक वारसा त्यांची मुले धृव शिल्पी व धरा शिल्पी यांनी कायम ठेवला आहे.
पुरुषीवर्चस्व असलेल्या क्षेत्रात आपल्या जिद्दीने वर्चस्व गाजवून व अजरामर कलाकृती समाजाला अर्पण करुन आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे ही ताम्रसाम्राज्ञी नेहमीच आपल्या मनात राहील यात शंकाच नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.