आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातही एक नायक स्वराज्याचा सरसेनापती बनून आपले कर्तव्य बजावत होता आणि त्या रणमर्दाचं नाव होतं सरसेनापती हंबीरराव मोहिते.
मोहिते घराणं मुळातच पराक्रमी होते, त्यांच्याकडे तळबीडची पाटीलकी होती. गावाची व परिसराची पाटीलकी असली तरी मोहित्यांनी सामान्य जनतेला उपद्रव होईल अशी कामं कधी केली वा करवली नाहीत, त्यामुळे मोहित्यांबद्दल जनतेत आदर होता.
पुढे मोहिते यांचे घाटगे व घोरपडे घराण्याशी घनिष्ट संबंध आले. नाती वाढली तसा संपर्कही वाढला आणि यातूनच ते लष्करात सहभागी झाले. लष्करात पराक्रम बजावताना आपल्या तलवारीच्या बळावर मोहित्यांनी अनेक लढाया गाजवल्या. पण तेव्हा ते मुघलांच्या सैन्यात होते.
अगदीच सांगायचे तर हंबीररावांचे वडील शहाजीराजांच्या लष्करात हवालदार होते. त्यामुळे भोसले व मोहिते घराण्याचे जवळचे संबंध होते.
मुघल राजवटीत होत असलेले अ*त्याचार व वाढत असलेला त्रास याच्या विरोधात बंड करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता. हंबीरराव लहान होते पण ते मोहित्यांचं रक्त..! त्यांच्यात धग तर असणारच.
हंबीरराव स्वराज्याचा मावळा बनून स्वराज्यात सहभागी झाले. तेव्हा स्वराज्याचं सेनापतीपद प्रतापराव गुजरांकडे होते. सैन्यात काम करताना हंबीररावांनी अनेक पराक्रम गाजवले, स्वराज्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर, पण मागे हटणार नाही हे हंबीररावांचं ब्रीद म्हणावं लागेल.
स्वराज्यावर असलेली निष्ठा व तलवारीची धार यामुळे हंबीरराव स्वराज्याच्या प्रमुख सरदारांमध्ये गणले जाऊ लागले.
स्वराज्याचे सेनापती असलेल्या प्रतापराव गुजरांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने मुघल सरदार बहलोल खानावर चाल केली. बहलोल खान मोठा सैन्यसाठा घेऊन उभा होता खरा, पण मराठा सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही.
यात स्वराज्यासाठी एक बाब अत्यंत वाईट घडली ती म्हणजे सेनापती असणारे प्रतापराव या लढाईत मारले गेले, प्रतापराव कोसळलेत हे ऐकल्यावर हंबीररावांनी खानाच्या सैन्यावर पूर्ण ताकदीनिशी ह*ल्ला चढवला आणि मोठ्या जिकरीने ही लढाई मारली. आणि स्वराज्याला मोठा भाग व महसूल मिळवून दिला.
प्रतापरावांच्या वीरगतीनंतर स्वराज्याला सेनापती हवा म्हणून शिवरायांनी महापराक्रमी असणाऱ्या हंसाजी मोहिते यांना हंबीरराव ही पदवी बहाल करत त्यांच्याकडे स्वराज्याचे सेनापती पद दिले.
हंबीरराव मुळचा पैलवान गडी, रुबाबदार पिळदार मिश्या, डोक्यावर भरजरीचा फेटा, हातात पंच धातूचं जाड कडं, आणि उराशी शिवरायांच्या स्वराज्याचा संकल्प.
स्वराज्याच्या स्थापनेत हंबीररावांनी मोठं योगदान दिलं, अनेक गड किल-किल्ले, परगणे हंबीररावांनी स्वराज्यात मिळवले. स्वराज्याच्या जडणघडणीत सर्वाधिक महसूल हा या बहद्दार मोहित्याने मिळवून दिला.
स्वराज्याच्या स्थापनेनंतर तर हंबीररावांच्या तलवारीची धार अधिकच तेज झाली. मोगल सरदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या सेनेवर सरळ ह*ल्ला करत त्यांना पळवून लावले. अशा अनेक मोहिमा हंबीररावांनी फत्तेह करत स्वराज्याप्रती आपली निष्ठा सिद्ध केली.
शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभुराजे गादिवर बसले, त्यांनीही महाराज साहेबांप्रमाणे स्वराज्याचं सेनापतीपद हंबीररावांकडे कायम ठेवलं.
औरंगजेब ज्यावेळी सात लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला तेव्हा संभाजी राजांच्या नेतृत्वात त्याला आस्मान दाखवण्याचा पराक्रमही हंबीररावांनी करून दाखवला.
हंबीरराव लढाईच्या मैदानातील अजातशत्रू व्यक्तिमत्व होतं, त्यांनी अनेक लढाया मोठ्या शिताफीनं जिंकल्या, स्वराज्याच्यासाठी आपले प्राण कायम तळहातावर ठेवले. १६८७ साली वाईला एक लढाई झाली. मराठा सैन्य जिंकण्याच्या तयारीनंच यात उतरलं होतं, स्वराज्याचे सेनापती हंबीरराव तलवारीनं गनिमाचे तुकडे करत होते.
हंबीरराव राहिला तर आपण वाचणे शक्य नाही या भीतीने मोगल सैन्याने हंबीररावांवर तोफ डागली. धिप्पाड देह असणारा रणमर्द खाली कोसळला व स्वराज्याचं कधीही न भरून निघणार नुकसान झालं.
त्यांच्या जाण्याची खबर ऐकून संभाजी राजांच्याही डोळ्यात पाणी आले होते. स्वराज्यावर येणार संकट स्वतःवर घेणारे हंबीरराव हे स्वराज्याचे अनमोल रत्न होते. “स्वराज्य खंबीर मामा हंबीर” असे मावळे हंबीररावांबद्दल आवर्जून म्हणायचे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.