आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राजीव दीक्षित हे भारतातील प्रसिद्ध संशोधक, वक्ते व आजादी बचाओ आंदोलन नामक चळवळीचे प्रणेते होते. राजीव दीक्षित यांचा जन्म अलिगढ येथील मध्यमवर्गीय दीक्षित दाम्पत्यांच्या घरी झाला.
राजीव दीक्षित यांनी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान अनुसंधान अर्थात आय.आय.टी मधून एम.टेक ची पदवी प्राप्त केली. यादरम्यानच त्यांना आयुष्याचे उद्दिष्ट मिळाले होते.
त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोबत येऊन स्वदेशीसाठी एक आंदोलन उभे केले. प्रत्येक वस्तू ही अधिकाधिक प्रमाणात स्वदेशी असावी. ज्यातून देशातील पैसा देशात राहील व भारतातील युवकांना रोजगारही उपलब्ध होईल.
आपल्या देशातील व्यवस्था ही पूर्णपणे पाश्चिमात्य पद्धतींवर आधारलेली आहे. ती बदलल्याशिवाय आपल्याला प्रगतीचे मार्ग उघडणार नाहीत, असे त्यांचे मत होते.
देशातील शिक्षणव्यवस्था, न्यायव्यवस्था यांच्यात बदल होणे ही काळाची गरज आहे असे ते नेहमी आपल्या व्याख्यानातून सांगायचे.
भारतातील ७०-८० टक्के महसूल हा काही लोकांच्या अखत्यारित जात आहे. प्रत्येक बाबींमध्ये असणारे खासगीकरण, एकाधिकारशाही देशाला घातक आहे.
भारतातील समाजसुधारक, विचारवंतानी कृषीक्षेत्रात आपले योगदान देऊन निर्णायक काम करणे गरजेचे होते, पण ते हवे त्या प्रमाणात झाले नाही. त्यामुळे आज भारतात शेतकरी आत्मह*त्या करतोय हे त्यांनी सांगितले होते.
राजीव दीक्षित यांच्या मते देशातील मेडिकल पद्धती बदलून ती पूर्णपणे आयुर्वेदावर आधारित असायला हवी. केमिकल मिश्रित औषधी आरोग्याला घातक आहेत.
त्याचा आर्थिक तोटाही देशाला सहन करावा लागतोय. विदेशातील कंपन्या बनावट केमिकल्स मिसळून औषधी बनवत असून ते भारतात विक्रीस आणत आहेत. यातून भारतीय व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. असे त्यांचे मत आहे.
राजीव दीक्षित त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विषयावर आभ्यास केला. फ्रान्सच्या टेलीकम्युनिकेशन विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यांचा आभ्यास प्रगल्भ होता.
अशाच एका निमित्ताने त्यांची भारताचे माजी राष्ट्रपती, भारतीय संशोधक, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी त्यांचा संपर्क आला.
या ओळखीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळाली. त्यांच्यात असलेल्या प्रतिभेमुळे त्यांना सी.एस.आई.आर. मध्ये अनेक प्रबंध व विदेशी योजनांची माहितीपर पुस्तके वाचण्यास मदत झाली.
थोर भारतीय क्रांतिकारक भगत सिंह, उधमसिंह, चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव राजीव दीक्षित यांच्या आयुष्यावर राहिला आहे. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या विषयीही बरेच वाचन केले.
राजीव दीक्षित हे एक उत्तम वक्ते होते, आपल्या व्याख्यानामधून त्यांनी मांडलेले मुद्दे भारतीय मानावर सकारात्मक प्रभाव करू लागले होते. त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड मागणी येऊ लागली होती. सुरुवातीला काही लोकांचा असणारा सहभाग आता हजारोंचा होत होता. त्यांनी भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी २० वर्षांत १२००० हून अधिक व्याख्यानं दिली.
ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व व विचार भारतभर पसरले. त्यांनी भारतात कार्यरत असणाऱ्या ५००० हून अधिक विदेशी कंपन्यांच्या विरोधात आंदोलन छेडले व राष्ट्रीय पातळीवर स्वदेशीचा मुद्दा उपस्थित करून स्वदेशी आंदोलन छेडले.
त्यांनी सर्वप्रथम कोक व पेप्सी या विदेशी उत्पादनांना तीव्र विरोध केला. त्यांनी ८ जानेवारी १९९२ मध्ये महाराष्ट्रातील वर्ध्यात स्वदेशी आंदोलनाची सुरुवात केली.
यापूर्वी बनवारीलाल शर्मा व राजीव दीक्षित हे भोपाळ येथील गॅस कंपनी संबंधात अमेरिकन कंपनी युनियन कार्बाईडच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं.
त्यांनी काही प्रमुख भारतीय व्यावसायिकांना भेटून, भारतातील युवकांना, महिलांना स्वदेशी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी काही शिबिरांचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला.
ज्यातून भारतीय युवकांत स्वदेशी माल व उत्पादन या विषयी जागृती निर्माण झाली, शिवाय त्यांना रोजगार ही मिळाला.
यातून त्यांनी उभारलेल्या आंदोलनात लोकांचा थेट सहभाग वाढला व लोकांनी राजीवजींचे विचार अंमलात आणले. देशातील ३०० हुन अधिक जिल्ह्यातील १५०० गावात स्वदेशीच्या माध्यमातून शाश्वत शेती केली जातेय.
केमिकल मिश्रित औषधी या शेतीला व उत्पादनाला घातक आहेत, हे भारतीय शेतकऱ्यांनी ओळखले असून सेंद्रिय शेती करत आहे. राजीव दीक्षित यांनी आयुष्य ज्या मुद्द्यांच्या जागृतीसाठी खर्ची केले ते प्रयत्न आता सत्यात उतरत आहेत.
केवळ शेतीच नव्हे तर रोजच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना भारतातील लोक स्वदेशी व जैविक (ऑरगॅनिक) वस्तू वापरताना आज दिसतात.
विविध आजारांवर आता भारतीय लोक आयुर्वेदिक उपचाराला अधिक महत्व देत आहेत. शेतीमध्ये शेण व वनस्पतीचा पाला टाकल्याने शेतीची उत्पादन क्षमता वाढते, ती टिकून राहते असा विचार राजीव यांनी मांडला होता.
त्यांनी स्वदेशीचे पाहिलेले स्वप्न आत्ता पूर्णत्वास येत आहे.
योगगुरू असलेले बाबा रामदेव यांनी राजीव दीक्षित यांची प्रेरणा घेऊनच पतंजली योगपीठ उभारल्याची चर्चा भारतभर रंगत असते.
राजीव दीक्षित हे भारत स्वाभिमान ट्रस्टचे महासचिव म्हणून देखील राहिले. त्यांनी भारत स्वाभिमानमध्ये असताना काही तत्व पाळली होती. ज्यात ते नेहमी सांगायचे की आम्ही एक प्रामाणिक भारतीय आहोत जे देशाच्या सार्वांगिण विकासासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही देशसाठी एक बहुआयामी व दूरदर्शी विचार करत आहोत. कुशल भारतीय व्यक्तित्व घडवून देशाला उन्नत करण्याचा आमचा संकल्प आहे. देशातील युवक, प्रत्येक भारतीयला एकत्र करून आपल्या भारताला लवकरच महासत्ता बनवण्यात आम्ही योगदान देणार आहोत, असे ते नेहमी सांगत.
राजीव दीक्षित स्वदेशीसाठी सदैव आग्रही राहिले. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये व अनुयायांमध्ये मतभेद झाले. ज्यामुळे त्यांचे हे आंदोलन काही प्रमाणात शांत झाले.
२०१० मध्ये हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला व सारा देश हळहळला.
पण राजीव यांचा मृत्यू झाला नसून त्यांचा जाणीवपूर्वक खू*न करण्यात आला आहे, असा आरोप राजीव यांच्या कुटुंबीयांनी केला होता. ज्याची तपासणी आजवर चालू आहे असे अनेकजण खासगीत म्हणतात. काय झाले हे कोणी ठामपणे सांगू शकत नसले तरी राजीव दीक्षितांचे कार्य देशाला एक प्रेरणा देऊन गेले, हे मात्र नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.