आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय साहित्याचे शिरोमणी असलेल्या वेदांमध्ये प्रचंड ज्ञान सामावल्याचं आपल्याला ज्ञात असेलच. चार प्रमुख वेदांचे उपवेद आहेत. या उपवेदांमध्ये महत्वाचा आणि प्रमुख वेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये आधी आणि व्याधी या दोन्ही प्रकारच्या मानवी आरोग्याच्या समस्यांवर उकल आहे. व्याधी म्हणजे अर्थातच मानवी शरीराला होणारा रोग आणि आधी म्हणजे मानवाला होणार मानसिक रोग किंवा आजार. आयुर्वेदामध्ये किंवा इतर संस्कृत साहित्यामध्ये आधी आणि व्याधींसाठी प्रतिबंधात्मक उपायसुद्धा दिलेले आहेत.
व्यायामात् लभते स्वास्थ्य दिर्घायुष्यं बलं सुखं । आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ।।, म्हणजेच व्यायामाने आरोग्य, दीर्घायुष्य, शारीरिक बळ आणि सुख यांची प्राप्ती होते. निरोगी राहणे हेच परम भाग्य आहे आणि आरोग्य असेल तरच सगळी कामं सुरळीत होतात. शारीरिक व्यायामाचे महत्व आपल्या सर्वानांच माहिती आहे, व्यायामाबरोबरच क्रीडाप्रकारांचं महत्व सिद्ध आहेच. म्हणूनच कित्येक वर्षांपासूनच आपल्याकडे विविध क्रीडाप्रकार आहेत.
चिंतायश्च चितायश्च बिंदुमात्रं विशिष्यते । चिता दहती निर्जीवं चिंता दहति जीवनम ।। असे म्हणून आपल्या संस्कृतीने आपल्याला मानसिक आरोग्याचे महत्वही पटवून दिले आहे. पण आजच्या काळात मात्र मानसिक आरोग्याचे महत्व कमी झाल्याचे दिसून येत आहे. मोबाईल फोन्स आणि इंटरनेटचा वापर सद्सद्विवेकबुद्धीने होत नसल्यामुळे नैराश्य, ताण-तणाव, चिडचिड असे प्रकार तरुणांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली तरुणांना फक्त स्वप्नं दाखवली जातात, पण ती प्रत्यक्षात न आल्याने अनेक काही तरुण आत्मह*त्येपर्यंत मजल मारतात.
आजमितीस शहरी भागात तरी मैदानी आणि बैठ्या खेळांचं प्रमाण कमी झालं आहे. मेजर ध्यानचंद, द फ्लायिंग सीख मिल्खा सिंग, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यासारखे असामान्य खेळाडू आताच्या काळात का नाही निर्माण होत? प्रोटिन्स आणि अन्य न्यूट्रिएंट्सचं प्रमाण वाढूनही आणि त्यावर संशोधन होऊनही आपण उत्कृष्ट क्रीडापटू का नाही निर्माण करू शकत हा चिंतनाचा विषय आहे.
बुद्धिबळ हा भारतात सुरु झालेला आणि भारतात राजाश्रय मिळालेला सुप्रसिद्ध क्रीडाप्रकार. बुद्धिबळात जिंकण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्तेबरोबरच मनाच्या प्रचंड एकाग्रतेची आवश्यकता असते. अगदी यु*द्धभूमीवर एखादा सेनानी मनाच्या एकाग्रतेने आणि बुद्धिसामर्थ्याने सैन्याचं मनोबल वाढवण्याबरोबरच ह*ल्ले, प्रतिह*ल्ले, योजना, शस्त्रास्त्र इतकंच काय तर रसद इत्यादींची व्यवस्था करतो, त्याचेच लहानसे स्वरूप म्हणजे बुद्धिबळ असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
आधुनिक बुद्धिबळाचं सर्वांत प्राचीन स्वरूप म्हणजे चतुरंग नावाचा खेळ. चतुरंग हा शब्द सैन्याच्या चार तुकड्या किंवा चार प्रकारांवरून आला आहे. या चार तुकड्या किंवा प्रकार म्हणजेच पायदळ, अश्वदळ, गजदल आणि रथदल. चतुरंग नावाचा खेळ भारतात सहाव्या शतकापर्यंत भरभराटीस आला होता. या खेळातील विजयही एकाच गोष्टीवर अवलंबून असतो, तो म्हणजे राजा.
बुद्धिबळामध्ये कालानुरूप अनेक नवे शोध लागत गेले आहेत. इसवी सन १४७५ साली बुद्धिबळामध्ये राणी किंवा काही ठिकाणी ज्याचा उल्लेख ‘वजीर’ असा होतो ते पहिल्यांदा या खेळात वापरण्यात आले. बुद्धिबळातील ‘राणी’च्या या शोधामागे एका खऱ्याखुऱ्या कर्तृत्ववान स्पेनच्या राणीची प्रेरणा आहे. पुरुषप्रधान संस्कृती असूनही आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ही राणी म्हणजे क्वीन इसाबेला.
क्वीन इसाबेलाने सिंहासनावर हक्क सांगण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अनौपचारिकरित्या अधिकार हातात असतानाच तिने सरकारी यंत्रणेची पुनर्रचना केली, काही वर्षांतच गुन्हेगारीचे प्रमाण कमी केले. आर्थिक धोरणांतही तिने कसर सोडली नाही आपल्या भावाने घेतलेल्या प्रचंड कर्जातून तिने राज्याची सुटका केली.
इसवी सन १४६९ साली तिने राजा फर्डिनांडशी विवाह केला आणि स्पेनचे एकत्रीकरण झाले. इसाबेला आणि फर्डिनांड हे रेकॉन्क्विस्टा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. रेकॉन्क्विस्टा ही ख्रिश्चन राज्यांतून मुस्लिमांना हुसकावून लावण्यासाठी ख्रिश्चन राज्यांनी केलेल्या शतकांपासूनच्या लढाईची मालिका होती. अमेरिकेचा शोध आणि वसाहतीकरण ही आधुनिक इतिहासातील सर्वात महत्वाची घटना आहे.
या उपक्रमाला राणी इसाबेलाने पाठिंबा दिला होता. १४९२ साली याच राज-दाम्पत्याने क्रिस्टोफर कोलंबसला वित्तीय पुरवठा केला. कोलंबसच्या प्रवासानंतर त्याने शोधलेल्या अमेरिकेद्वारे स्पेन आता युरोपची आणि ख्रिश्चन जगाची महासत्ता बनला होता. पोप अलेक्झांडर सिक्सथ याने इसाबेलला तिच्या पतीसह “कॅथलिक मोनार्क” ही पदवी बहाल केली.
आठव्या शतकात अरबांनी स्पेनवर आक्रमण केले तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी स्पेनमध्ये बुद्धिबळ आणले. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात, राणी इसाबेला सर्वार्थाने अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शासक होती, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्धिबळात ‘राणी’ सर्वात महत्वाचा भाग बनली, असे मत काही इतिहासकारांनी मांडले आहे. यापूर्वी अरबांनी आणलेल्या बुद्धिबळात ‘राणी’ला काहीच महत्त्व नव्हते. बहुधा राणी हे पदच त्यावेळी बुद्धिबळात नव्हते. राणीसमान वजीर एकावेळी फक्त दोन घरं पुढे जाऊ शकत.
१४७५ च्या सुमारास इसाबेला ही कॅस्टाईलची अभिषिक्त राणी बनली, त्यावेळी बुद्धिबळात खऱ्या अर्थाने ‘राणी’ आली. परंतु, राजाप्रमाणेच राणीसुद्धा एका वेळी फक्त एक घर पुढे जाऊ शकत. १४९५ पर्यंत इसाबेला युरोपमधील सर्व शक्तिशाली स्त्री होती, याचवेळी बुद्धिबळाचे सध्याचे नियम रूढ झाले. या नियमांमध्ये राणी कोणत्याही दिशेला पुढे किंवा मागे जाऊ शकते.
राणी इसाबेला तिच्या पती फर्डिनांडपेक्षा अधिक शक्तिशाली होती, परंतु त्याच वेळी राज्यव्यवस्थेत राजासुद्धा सर्वात महत्वाचा होता. बुद्धिबळात देखील राजा-राणीच्या संबंधांवर हेच साम्य लागू झाले होते. राजा बुद्धिबळात सर्वात महत्वाचा तर आहे पण राणीपेक्षा शक्तिशाली नाही. बुद्धिबळाच्या पटलावर राणीच राजाचं रक्षण करते.
भविष्यात एखाद्या घटनेने बुद्धिबळाच्या खेळात लक्षणीय बदल घडवून आणल्यास किंवा नियमांमध्ये बदल करण्याच्या इच्छा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.