आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश विसाव्या शतकात स्वतःला महासत्ता म्हणवून घेत होते. शस्त्रास्त्र आणि सैन्याच्या बाबतीत तर ते महासत्ता होतेच पण महासत्ता असण्याचा केवळ इतकाच मापदंड आहे का? किंबहुना मानव संस्कृतीसारख्या प्रगल्भ आणि ‘जंगला’तून बाहेर पडलेल्या संस्कृतीत तरी महासत्ता किंवा महाशक्तीचा असा मापदंड असावा का? जंगलातून बाहेर पडलेला मानव म्हणजे इतर प्राण्यांच्या जीवनापेक्षा माणसाचे जीवन काही प्रमाणात वेगळे आहे. काम, क्रोध, निद्रा आणि भय हे गुण तर कोणत्याही वन्य प्राण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. पण मानवाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रखर बुद्धी आणि सहकाराची, सहकार्याची भावना.
एखाद्या प्रदेशावर सत्ता गाजवण्याची इच्छा तर वन्य प्राण्यांमध्येही आहे. ते सतत आपला प्रदेश वाढवण्याच्या प्रयत्नात असतात, पण कितीही मोठ्या प्रदेशावर सत्ता मिळाली तरी मानवाची तहान भागत नाही. पण जगातील काही संतांनी आणि विचारवंतांनी शांततेचे महत्व सांगत त्याशिवाय सर्वश्रेष्ठ असं काही नाही हे सांगितलं आहे.
भारताच्या मुळातच ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामय: ।’ हे वचन आहे. अगदी गौतम बुद्धांपासून ते संतांपर्यन्त आपल्या संस्कृतीने ‘विश्वबंधुत्वाची’ भावना जपली आहे. संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात, ‘शांतीपरते नाही सुख । येर अवघेची दुःख ।। म्हणवूनि शांती धरा । उतराल पैलतीरा ।।’. ज्ञानेश्वरांचे पसायदान तर सर्वांना तोंडपाठ असेलच. ‘दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ।।’ हे म्हणत विश्वाला ज्ञानाचा आणि विवेकाचा सूर्य दाखवू इच्छिणाऱ्या ज्ञानेश्वरांचा सतत अपेक्षाभंग या विश्वात झाला आहे.
शांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन स्वरक्षणासाठी युद्ध करू नये असं संत कुठेही सांगत नाहीत. ज्या ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं ते सुद्धा अर्जुनाच्या युद्ध न करण्याच्या विचाराविरोधात आहेत. दुसऱ्या अध्यायात “सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामी हे कवण । कारुण्य तुझे? ।।” ही ओवी सांगत ते अर्जुनासमोर प्रश्न उपस्थित करतात.
तर संत रामदास “देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा। मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे।
देशद्रोही तितुके कुत्ते । मारोन घालावे परते। देवदास पावती फत्ते। यदर्थी संशयो नाही।
धर्मासाठी झुंजावे। झुंझोनी अवघ्यासी मारावे॥ मारिता मारिता घ्यावे।राज्य आपुले।” असं म्हणत स्वदेश आणि स्वधर्म रक्षणाचा संदेश देतात.
म्हणजेच संत आणि विचारवंत ‘स्व’त्वाच्या रक्षणासाठी लढलेल्या यु*द्धाला विरोध करत नाहीत तर विस्तारासाठी आणि अहंकाराच्या पूर्ततेसाठी केलेल्या यु*द्धांचा ते विरोध करतात. ह*त्याकांड आणि अत्या*चाराला तर जगातील कोणताही महात्मा, धर्म अथवा विचारवंत पाठिंबा देत नाही. मानवाच्या बुद्धीची दिवसेंदिवस वाढ होते, बुद्धी दिवसेंदिवस प्रगल्भ होते, मग ह*त्याकांडांसारखे प्रकार मानवाच्या अधोगतीचे दर्शन घडवून आणतात हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आजपर्यंत जगात अनेक यु*द्धं झाली, अनेक सत्तांनी सामान्य प्रजेवर अत्याचार केले. भारतातील मुघलांनी आणि पोर्तुगीजांनी केलेले ह*त्याकांड आणि अ*त्याचार तर इतिहासात प्रसिद्ध आहेत. मग यांचं ‘मानव’पण कोणत्या निकषांवर सिद्ध होतं? तसेच दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात जपानच्या सैन्याने नानकिंग शहरात चीनच्या नागरिकांवर केलेले अत्या*चार आणि १९७१ साली पाकिस्तानी सैन्याने केलेले पूर्व बंगालमधील अत्याचार या सर्व घटनांमुळे मानवाचं मोठ्या प्रमाणात वैचारिक अधःपतन झाल्याचं दिसून येत आहे. असाच नर*संहार स्वतःला महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेने व्हिएतनाम यु*द्धादरम्यान व्हिएतनामच्या नागरिकांवर केला.
माय लाई हा दक्षिण व्हिएतनामच्या उत्तर किनाऱ्याजवळील क्वांग नगाई प्रांतातील लहान गावांचा समूह आहे. व्हिएतनाम यु*द्धादरम्यान १६ मार्च १९६८ रोजी अमेरिकन सैनिकांनी याठिकाणी अनेक निःशस्त्र आणि सामान्य लोकांची ह*त्या केली. सकाळी साडेसात वाजता सोन माई गावात अचानक हल्ला सुरु झाला. अमेरिकन हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले सैनिक गावांमध्ये उतरवायला सुरुवात केली.
अमेरिकी सैन्यातील ११ व्या इंन्फट्री ब्रिगेडच्या चार्ली बटालियनला ‘व्हिएट कॉंग’ किंवा ‘कम्युनिस्ट नॅशनल लिबरेशन फ्रंट’च्या (एनएलएफ) सेनानींनी सोन माईतील क्वांग नगाई हे गाव ताब्यात घेतल्याचा संदेश मिळाला. सैनिकांना शोधमोहीम राबवून एनएलएफच्या लढाऊंना संपवण्याचे कडक आदेश देण्यात आले. त्यानुसार सैनिकांची एक तुकडी गावात आली.पण, गावात मात्र धूर्त सैनिकांऐवजी त्यांना नि:शस्त्र ग्रामस्थ आढळले. ग्रामस्थांमध्ये बहुतेक महिला, लहान मुले आणि वृद्ध लोक होते.
या लोकांनी व्हिएट कॉंगच्या सैनिकांशी सहानुभूती बाळगली असेल किंवा त्यांना मदत केली असेल म्हणून संपूर्ण गाव नष्ट करा आणि आग लावा असे आदेश लष्करी कमांडर अर्नेस्ट मदिनाने आपल्या सैनिकांना दिले. लेफ्टनंट विल्यम केली हे सैन्याचे नेतृत्व करत होते. आदेश मिळताच सैनिकांनी गावकऱ्यांना गटांमध्ये विभागून त्यांच्या झोपड्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांना काहीच घरांमध्ये शस्त्रे सापडली असतील, तरीही लेफ्टनंट केली यांनी सगळ्या गावकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. यासाठी त्यांनी अत्याधुनिक एम-१६ या रायफल्सचा वापर केल्यामुळे प्रेतांचा ढीग लागला.
या क्रू*र आदेशाचे पालन करीत आणि यु*द्धमर्यादा ओलांडत सैनिकांनीही अंधाधुंद गोळीबार सुरु केला. गोळीबार करण्यावरच हे सैन्य थांबलं नाही तर या सैनिकांनी अनेक महिलांवर बलात्कार केले. काही ठिकाणी एखाद्या आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तिच्या मागे लपवले, पण अमेरिकेच्या सैनिकांनी तिच्यावरही गोळीबार केला आणि आईच्या मृत्यूनंतर पळून जाणाऱ्या लहान मुलांच्या पाठीवरही त्यांनी गोळ्या झाडल्या.
काही ठिकाणी तर निःशस्त्र नागरिकांवर या सैनिकांनी अगदी ग्रेनेडनेही हल्ला केला. यानंतरही या निर्दयी सैन्याने लहान मुलांना आणि वृद्धांना पकडून दरीच्या दिशेने आणले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. सैनिकांनी संपूर्ण गाव पेटवले.
दरम्यान, वॉरंट ऑफिसर ह्यूग थॉम्पसन, लष्कराचा हेलिकॉप्टर पायलट टोही मोहिमेवर आला होता. त्याने ही घटना पाहिली आणि गोळीबार थांबवण्यासाठी त्याने त्याचे हेलिकॉप्टर गावकरी आणि सैनिक यांच्यामध्ये आणले. तसेच जर गोळीबार थांबला नाही तर तो देखील गोळीबार सुरू करेल अशी धमकी त्याने त्याच्या सैनिकांना दिली आणि अखेर अशा प्रकारे हे रक्त*रंजित ह*त्याकांड संपले.
पण आतापर्यंत ५०० हून अधिक निष्पाप, नि: शस्त्र लोक मारले गेले होते. मृतांमध्ये १८२ महिलांचा समावेश होता, त्यापैकी १७ गर्भवती होत्या आणि १७३ लहान मुले होती, त्यापैकी ५६ तर शिशु होते. गोळीबार थांबल्यानंतर, थॉम्पसन आणि त्याच्या साथीदारांनी काही जखमी आणि ह*त्याकांडातून वाचलेल्या लहान मुले आणि स्त्रियांना वैद्यकीय मदतीसाठी नेले. पुढे १९९८ साली, ह्यूग थॉम्पसन आणि त्याच्या दोन साथीदारांना अमेरिकन लष्कराचे शौर्य आणि धैर्यासाठी सर्वोच्च लष्करी पदक देण्यात आले.
ह*त्याकांडाची ही बातमी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक वर्ष लपवून ठेवली होती आणि ही घटना गुप्त ठेवण्यात आली होती. परंतु सेमूर हर्ष नावाच्या अमेरिकन संशोधक पत्रकाराने या हत्याकांडाचा पर्दाफाश केला. ह*त्याकांडाच्या सुरुवातीच्या अहवालांनंतर, ११ व्या ब्रिगेडच्या रॉन रिडेनहॉर नावाच्या सैनिकाने ही घटना उघडकीस आणण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन, पेंटागॉन, परराष्ट्र विभाग आणि इतर एजन्सींना अनेक पत्रे लिहिली.
जेव्हा त्याच्या या पत्रांना कोणतीच उत्तरं मिळाली नाहीत तेव्हा रॉन रिडेनहॉरने संशोधक पत्रकार सेमूर हर्षला एक मुलाखत दिली. हर्षने ही मुलाखत १९६९ साली प्रकाशित केली आणि अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला. याशिवाय, अमेरिकेच्या लोकांनी या भीषण घटनेला तीव्र विरोध केला आणि व्हिएतनामच्या लोकांच्या समर्थनार्थ हजारो अमेरिकन रस्त्यावर उतरले. बघता बघता अमेरिकन सैनिकांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांनी रस्त्यावर गर्दी केली.
रॉन रिडेनहॉरच्या मुलाखतीनंतर आणि तीव्र आंदोलनांनंतर अमेरिकन सरकार खडबडून जागे झाले आणि अमेरिकन सैन्याने मार्च १९७० मध्ये लेफ्टनंट जनरल विल्यम पिअर्सच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना केली. तपास पथकाने ह*त्याकांडात सामील असलेल्या किमान २८ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली होती, परंतु लष्कराने फक्त १४ लोकांना दोषी ठरवले. यांमध्ये लेफ्टनंट विल्यम केली, कमांडर अर्नेस्ट मेदिना आणि कर्नल ओरान हेंडरसन यांचा समावेश होता.
लेफ्टनंट विल्यम केलीला गोळीबाराचा आदेश दिल्याबद्दल ह*त्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. मार्च १९७१ मध्ये केलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि सहा सैनिकांचे ‘कोर्ट मार्शल’ करण्यात आले. पण, विल्यम कॅली त्याचा वरिष्ठ मदिनाच्या आदेशाचे पालन करत होता, म्हणूनच कॅलीला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे असे अनेकांचे मत होते. तरीसुद्धा, कॅलीची शिक्षा कमी करून दहा वर्षे करण्यात आली आणि चार वर्षांतच, १९७४ सालीच त्याला सोडण्यात आले.
अफगाणिस्तान युद्धाप्रमाणेच व्हिएतनाम युद्ध अमेरिकेच्या एका भयंकर पराभवासह संपले. या यु*द्धात सुमारे ५० हजार अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. कित्येक लाखो डॉलर्स खर्च झाले, कित्येक कुटुंबं, गावं उध्वस्त झाली आणि कित्येक निष्पाप लोकांचे प्राण गेले. पण निष्पन्न झाली ती फक्त निराशाच!
शिवाय, माय लाईमधील हत्याकांडाचे डाग आजही अमेरिकेच्या ‘महासत्ता’ या प्रतिमेवर आहेतच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.