आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘दिस इज द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स’ हे वाक्य अनेकदा आपण विज्ञान आणि प्रामुख्याने रसायनशास्त्रातील मूलद्रव्यांच्या अभ्यासात ऐकतो. म्हणजेच अणूला आपण अणूच का म्हणतो? त्याला काही वेगळं नाव का नाही? असे प्रश्न बहुतेकदा आपल्याला पडत असतील. प्रत्येक नामकरणाच्या मागे काहीतरी विशिष्ट शास्त्र आहे आणि त्या विषयाचा अभ्यास सुलभ व्हावा म्हणून आपण त्याचे विशिष्ट नामकरण केलेले असते.
मानवाचेही काही प्रमाणात तसेच आहे. पण माणसाच्या नावामागे काही शास्त्रीय अभ्यास असतो असे म्हणायला काही जागा नाही. बाळ जन्मल्यानंतर त्याला त्याची ओळख म्हणून एक नाव दिले जाते आणि तेच नाव जीवनभर त्याला चिकटून असते. माणूस आपल्या नावाप्रमाणेच वर्तन करतो असे कधीही दिसून आले नाही. माणूस वृत्ती, विचार आणि परिस्थितीनुसार आपल्या वर्तनात बदल करतो. जगभरात नाव लिहिण्याचे आणि संपूर्ण नावाचे साधारण एकच स्वरूप असते. पण दक्षिण भारतातील विशेषतः तामिळनाडू राज्यात आपल्याला लोक आडनाव लावताना दिसत नाहीत.
आर. कार्तिक, इ व्ही रामास्वामी, सर्वपल्ली राधाकृष्णन अशी नावे तर तुम्ही ऐकलीच असतील. या नावांमध्ये कुठेच आडनाव असल्याचे दिसत नाही. ही सगळीच दक्षिण भारतीय आणि तामिळ नावे आहेत. तर दक्षिण भारतीय आणि विशेषतः तामिळ नावांमध्ये आडनाव का नाही हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच आला असेल. त्याचाच शोध घेण्याचा हा लहानसा प्रयत्न.
तामिळ नावे सहसा प्रथम गावाचे नाव, वडिलांचे नाव, स्वतःचे अर्थात पहिले नाव आणि जातीचे नाव या स्वरूपात असत. म्हणजेच तामिळ संस्कृतीमध्ये वडिलांच्या नावाचा वापर करण्याची परंपरा रूढ आहे. बऱ्याच ठिकाणी वडिलांचे नाव अद्याक्षर म्हणून वापरलेले दिसते. पण संपूर्ण नाव लिहायचे असल्यास आडनाव म्हणून याच अद्याक्षराचे विस्तृत स्वरूप लिहिले जाते.
उदाहरणार्थ या व्यवस्थेत एखाद्याचे नाव ‘कादम रामचंद्रन अनिरुद्ध -जातीचे नाव-‘ असे असेल. तर हे नाव ‘के.आर. अनिरुद्ध -जातीचे नाव-‘ या प्रकारे संक्षिप्त केले जाईल. ई. व्ही. रामास्वामी यांच्या आंदोलनांनंतर, हेच नाव ‘के. आर. अनिरुद्ध’ इतके संक्षिप्त करावे लागले, कारण त्यांनी नावांमधून जातीचे नाव काढून टाकण्यास सांगितले आणि ते सर्वमान्य होते.
समजा या अनिरुद्धचा जन्म झाला तेव्हा त्याचे नाव ‘आर. अनिरुद्ध’ असे होते. कालांतराने त्याचे नाव ‘अनिरुद्ध आर.’ असे करण्यात आले आणि जेव्हा या अनिरुद्धने पासपोर्टसाठी अर्ज केला तेव्हा आडनाव असणे अनिवार्य असल्याने त्या संक्षिप्त ‘आर’चे ‘रामचंद्रन’ झाले. म्हणूनच पासपोर्टवरील नाव हे ‘के. अनिरुद्ध रामचंद्रन’ असे असेल. त्याच्या वडिलांचे पहिले नाव हेच त्याचे आडनाव असेल. याला आश्रयदात्याच्या नामकरणाची व्यवस्था असे म्हणतात.
तसेच बहुतेक तामिळ महिला पतीचे पहिले नाव त्यांचे आडनाव नाव म्हणून स्वीकारतात, तशी प्रथाच त्याठिकाणी आहे. लग्नानंतर सरवनन सुनिता (सरवननची मुलगी, सुनीता) असे नाव असेल तर तिचे नाव बदलून राम कुमार सुनिता (राम कुमारची पत्नी सुनिता) असे ठेवण्यात येते. तथापि, ही रित कुटुंबा-कुटुंबानुसार बदलत जाते आणि साधारणपणे असे रीतिरिवाज सलग अनेक पिढ्यांपर्यंत चालत नाहीत.
पूर्वीच्या काळी तामिळ लोक त्यांचे आडनाव म्हणून जातीचे नाव किंवा गावाचे नाव वापरत असत, परंतु द्रविड चळवळीच्या प्रभावामुळे सर्व जातींच्या तामिळांनी जातीची आडनावे सोडून दिली आहेत. त्यांच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव त्यांनी आडनाव म्हणून वापरले आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तेच आडनाव बनून राहिले.
प्रत्येक सामान्य उत्तर भारतीय तसेच तेलुगु आणि कन्नड आडनाव हे एखाद्या जातीचे किंवा उप-जातीचे नाव आहे. इतर भाषिक समूहाप्रमाणे, तामिळांनाही त्यांची स्वतःची जातिव्यवस्था आहे. पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांनी तामिळनाडूमध्ये द्रविड स्वाभिमान चळवळ सुरू केली तेव्हा हा बदल घडला.
त्यांनी सर्वप्रथम राज्यभरातील सर्व साइन-बोर्डवरून जातीची नावे काढून टाकायला सांगणारे आंदोलन सुरू केले. यामध्ये इमारती, हॉटेल्स, रस्ते आणि यांसारख्या अनेक नावांचा समावेश होता. एकदा ते काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या जातीवर आधारित आडनावे काढून टाकण्याची सूचना केली. कारण यामुळे एखाद्याचे नाव ऐकताच लोकांना पूर्वग्रहदूषित होण्याचे कारण मिळते. जातीवर आधारित नावे किंवा आडनावे देणे हे तामिळनाडूमध्ये बऱ्याच वर्षांपासून बेकायदेशीर होते.
जर तुम्हाला जातीची नवे आपली आडनावे म्हणून वापरणारे तामिळ लोक आढळत असतील तर या कुटुंबांचे पूर्वज रामस्वामींचे आंदोलन सुरु होण्यापूर्वीच तामिळनाडूबाहेर स्थायिक झाले असावेत. जरी ते आज जातीवाचक आडनावे वापरत असतील तरी त्यांना किंवा ते राहत असलेल्या तमिळ समाजाला त्याचा इतका फरक पडत नाही आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आडनावाबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे दिसून येईल.
आजमितीस तामिळ समाज भारतीय संघराज्य व्यवस्थेत एकरूप होऊन गेला आहे. पण तामिळ जनतेला पासपोर्ट किंवा पॅन कार्डसारख्या अन्य केंद्र सरकारसंबंधी सेवा देताना मात्र नावांची ओळख करण्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.