आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
लेखक- अंबरीश फडणवीस
आधुनिक काळातला सर्वोत्कृष्ट भारतीय नेता म्हणजे पी. व्ही. नरसिंह राव. हा माणूस इतका उपेक्षित आहे की विचारू नका. पण हा नसता तर भारत आतापर्यंत तुटला असता.
१. नरसिंह राव.
२. अटलबिहारी वाजपेयी.
३. इंदिरा गांधी (आणीबाणीमुळे नंबर खाली, अन्यथा दोन नंबरवर असत्या).
कुणाचा भाग्योदय कधी आणि कसा होईल सांगणे कठीण असते. ज्योतिषात एक विपरीत राजयोग म्हणून प्रकार ऐकून आहे. याचा ज्योतिषीय अर्थ आणि संदर्भ नक्की काय ते माहिती नाही, पण ज्यांचा विपदा कोसळल्यावर विपरीत परिस्थितीत दुसऱ्याच्या नुकसानामुळे काही लोकांचा भाग्योदय ज्या योगामुळे होतो त्याला विपरीत राजयोग असे म्हणतात. नरसिंहराव हे खरे विपरीत राजयोगी. हे खरे आहे कि ते मंत्री म्हणून चमकले नाही. जागतिक बँकेचा रेटा होता हे खरंय, पण ज्या तऱ्हेने हे त्यांनी काम केले ते अप्रतिम होते.
पण पंतप्रधान झाल्यानंतर ३-४ वर्षात ते एक खूप मोठे आणि प्रचंड चक्र फिरवून गेले जे आजतागायत फिरतंय. भारताला पहिल्यांदा एक खरा बुद्धीजीवी आणि संपूर्णपणे तटस्थ माणूस पंतप्रधान म्हणून मिळाला. अर्थव्यवहार, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण क्षेत्रातले लोक यांना खूप दुवा देतात.
सोवियत युनियनच्या पतनानंतर कुठल्याही युनोमध्ये सांभाळून घेणाऱ्या मायबापाशिवाय या नवीन जगात चालायला सुरुवात यांनी करून दिली.
कश्मीरच्या समस्येने अजस्त्र रूप धारण केलं होतं, पंजाबमध्ये धार्मिक दहशतवाद धुमसत होता, घटत जाणाऱ्या फॉरेक्स रिजर्वमुळे सोने गहाण टाकावे लागले होते, पूर्वेत नक्षली लोकांनी उच्छाद मांडला होता, श्रीलंकेत आणि तामिळनाडूमध्ये एलटीटीइच्या फुटीरतावाद्यांनी नुकतेच राजीव गांधींना मारले होते. समस्त शेजार शत्रू होता, आणि एकमेव मित्र अफगाणिस्तानमध्ये हारून, निराश होऊन मायदेशी परतत होता, भारतात हिंदू-मुस्लीम समस्या टोकाला जाऊ लागल्या होत्या, पाकिस्तानने अ*णुबॉ*म्बची निर्मिती कार्यान्वित झाली होती. (१९८९).
हे सगळे आधीच्या पंतप्रधानांच्या पुण्याईमुळे घडले. यात जनता पार्टीचे मोरारजी देसाई देखील आले, त्यांनी झिया-उल-हक यांच्याशी गप्पा मारतामारता सांगितले की, भारताला पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाबद्दल माहिती आहे. पंतप्रधान साहेबांनी आपल्याच एका विभागाची कित्येक वर्षांची मेहनत काही सेकंदांत वाया घालवली. त्यामुळे ८० च्या दशकात पाकिस्तानने युरोपियन बाजारपेठेत चोऱ्यामाऱ्या करून अ*णुबॉ*म्ब बनवला. अशा परिस्थितीत आतून आणि बाहेरून सर्वत्र भारत मार खात असताना ५ वर्षे राज्य करणे, आणि बाजी पालटणे हे खूप मोठे काम आहे.
अशा परिस्थितीत कुणीच भारतात राज्य केले नाही. नेहरूंवर इंग्रजांचा आणि रशियाचा वरदहस्त होता. इंदिरांवर देखील सोवियत रशियाचा पूर्ण वरदहस्त होता. नरसिंहराव आणि कारगीलपर्यंतचे वाजपेयी, हे दोनच “स्वतंत्र” पंतप्रधान होते. क्लिंटन यांच्या भेटीनंतर, वाजपेयीदेखील ढेपाळले.
नरसिंह रावांमुळे खालील गोष्टी झाल्या.
- अर्थव्यवस्था खुली झाली.
- इस्राईल, विएतनामसोबत मैत्री संबंध प्रस्थापित.
- कश्मीरसंबंधी प्रस्ताव लोकसभेत व राज्यसभेत पारित करून घेतला. आता काश्मीर भारताचा अभिन्न अंग आहे व ते देऊन टाकायला लोकसभेत मंजुरी घ्यावी लागेल.
- कम्युनिस्ट लोकांना पूर्वेत रोखले.
- रामजन्मभूमी आंदोलनात त्रयस्थ राहिले.
- लायसन्स राज संपवला.
- शरद पवार व इतर प्रभृती यांना रोखले.
- काश्मीरमध्ये आर्मी घातली. सियाचीनवर सदैव सेना ठेवायचा निर्णय यांचा. चीनशी परत व्यापारी संबंध प्रस्थापित केले. (आज तो व्यापार ६० अब्ज डॉलर इतका आहे.)
थोडक्यात जे जे काही नेहरूंनी करून भारताला ३% ग्रोथ रेटवर सीमित ठेवत होते, ते सर्व काढून आजचा ७-८% इतक्याने वाढणारा भारत बनवला. आजचा भारत (सर्व गुणदोषांसकट) नरसिंहरावांचा भारत आहे.
१९२१ साली तेलंगणामध्ये रावांचा जन्म झाला. हे नक्की कुणाचे पुत्र हे माहिती नाही पण तेलंगणामधल्या एका सधन ब्राह्मण कुटुंबाने या अज्ञात मुलाला दत्तक घेतले. नरसिंहराव आधीपासूनच स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होतेच. याशिवाय हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. अभिनव भारत संघटनेने तयार केलेली अनेक बॉ*म्ब बनवायची पुस्तके त्यांनी तेलगुमध्ये भाषांतरित केली.
मुक्ती संग्रामानंतर ते तिथल्या विधिमंडळात निवडून आले. तिथे त्यांनी कुळ कायदा राबवायला सुरुवात केली. यामुळे अनेक जमीनदार जातींना त्यांनी दुखावले पण सामान्यांचा दुवा घेतला. वंशाधिकाराने आलेली सर्व जमीन यांनी दान करून स्वतः उदाहरण प्रस्थापित करून दिले.
चांगले निर्णय कसे त्रासदायक ठरतात हे त्यांना १९७३ साली समजले कारण इंदिरा गांधींनी त्यांचे सरकार बरखास्त करून टाकले (कारण रेड्डी, नायुडू आणि कम्मा जातीचे तेलुगु जमीनदार भडकले होते आणि राव ब्राह्मण असल्यामुळे यांच्यामागे एक वोट करणारी लॉबी नव्हती). त्यांच्या या कामाचे क्रेडीट दुसरा कुणीतरी घेऊन गेला. पण त्यांची क्षमता हेरून इंदिरा गांधींनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले.
१९७३ च्या या हृदयभंगानंतर यांनी एक धडा घेतला. वयाची पन्नाशी आली होती. तो धडा म्हणजे कॉंग्रेसमध्ये टिकायचे असल्यास कधीही आपली अक्कल लावू नये. या घटनेनंतर त्यांचे १९९० पर्यंतचे करीयर म्हणजे गांधीघराणे भक्तीचा आदर्श परिपाठ होता.
आणीबाणीमध्ये त्यांनी इंदिरांना समर्थन दिले. त्या बदल्यात इंदिरा गांधींनी त्यांना महत्वाचे खाते देणे सुरु केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर,
“१२ भाषा उत्कृष्टपणे लिहिता-बोलता-वाचता येणाऱ्या या ज्ञानमार्तंड माणसाचे मन कधीच कुणालाच समजले नाही. कुणासमोर याने आपले मन उघडे केले नाही”.
इंदिरा गांधींच्या ह*त्येनंतर यांनी आपली निष्ठा राजीव गांधींच्या चरणी वाहिली. पण रावांचे वय झाले होते. १९९० मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. पण त्यांच्या आयुष्यातला राजयोग तर सुरु होणार होता. राजीव गांधींची ह*त्या झाली आणि सर्वत्र घालमेल उडाली.
हे नंतर समजले कि नरसिंहरावांनी छद्मनाम धारण करीत राजीव गांधींवर कडाक्याची टीका केली होती (१९८८-८७ मध्ये). इंडियन एक्सप्रेसमधला एक अग्रलेख खूप गाजला होता जो कॉंग्रेसच्या खूप आतल्या माणसाने लिहिला होता पण नाव दिले नव्हते. त्यांच्या मृत्युनंतर हे एक्सप्रेसने उघड केले की ते लेखक राव होते. १९९० मध्ये रावांनी उघडपणे कुठलेही मतप्रदर्शन केले नाही.
अर्जुन सिंह, शरद पवार, आणि नारायणदत्त तिवारी या तिघांच्या पंतप्रधान पदासाठी मारामाऱ्या सुरु झाल्या होत्या. कुणीच जिंकेना आणि कॉंग्रेस तीन तुकड्यात जाणार अशी चिन्हे दिसू लागली. तेव्हा एक तडजोड म्हणून रावांना तिघांनी मान्यता दिली. असे म्हणतात कि जेव्हा हा निर्णय त्यांना समजला तेव्हा राव आपल्या सामानाची बांधाबांध करीत होते, कायमचे हैदराबादेत सेटल व्हायला. ते नुकतेच राजकारणातून निवृत्त झाले होते पण त्यांची निवृत्ती कॉंग्रेस कमिटीने जाहीर केली नव्हती.
पवार-सिंह-तिवारी त्रिकुटाची कल्पना होती की निवडणुकीनंतर यांना हाकलून देऊ. पण १९९०-९१ च्या निवडणुकीत तिघांपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि राव पंतप्रधान झाले.
अर्थात, याच काळात ग्रामीण गरिबी ३३% वरून ४८% पर्यंत गेली. अन्नधान्याच्या किमती १९९६ साली ६०% ने वाढल्या होत्या. या नीतीचा बोजा सर्वांत समाजातील आर्थिकदृष्ट्या खालच्या थरावर पडू लागला. सबसिडी कमी केल्यामुळे लहान शेतकरी असणे हळूहळू त्रासदायक होऊ लागले. १९९६ साली कॉंग्रेस निवडणुकीत हरली.
अर्थात हरता हरता रावांनी अडवाणींनी केलेल्या विश्वासघाताचा बदला घेतलाच. त्यांना एका आर्थिक घोटाळ्यात गोवून त्यांची पंतप्रधान बनायच्या आशेवर पाणी फिरवले. वाजपेयी हे भाजपाचे compromise candidate म्हणून पुढे आले. १९९६ साली वाजपेयींनी शपथ घेतली (१३ दिवसांचे सरकार) त्या शपथ विधीनंतर राव वाजपेयींशी हस्तांदोलन करायला आणि अभिनंदन करायला गेले. रावांनी हस्तांदोलन तर केले. पण त्यांच्या हातात एक चिट्ठी होती. ती गुपचूपपणे हस्तांदोलनाच्या निमित्ताने वाजपेयींच्या हातात दिली. त्या चिट्ठीमध्ये लिहिले होते – “Bomb is ready, go ahead”. रावांच्या मृत्यूनंतर ही गोष्ट वाजपेयींनी जाहीर केली.
दीड वर्षांनी भारताने अ*णुबॉ*म्बची चाचणी केल्यानंतर सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष पदावर निवडून आल्या. त्याचदरम्यान कॉंग्रेस अध्यक्षपदाचे इतर उमेदवार राजेश पायलट आणि माधवराव शिंदे यांचा “अचानक अपघाती” मृत्यू झाला आणि सीताराम केसरीदेखील त्याच ६ महिन्याच्या कालावधीत वारले.
रावांनी काळाची पावले ओळखली आणि दिल्ली सोडली. उर्वरित काळ ते हैदराबादेत राहिले आणि २००४ साली त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा फोटोदेखील कुठेही नाही, कुणाही कॉंग्रेसवाल्यांनी त्यांना साधी श्रद्धांजलीदेखील वाहिली नाही. या थोर नेत्याला जाणीवपूर्वक विजनवासात आणि अज्ञातवासात ढकलण्यात आले.
१९९० पूर्व नेहरूंच्या भारताचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते- समाजवाद आणि नॉन-अलाईनमेंट मुव्हमेंट. या दोन्ही आधारस्तंभांना रावांनी कायमचे जमीनदोस्त केले. या सर्वांचे दोषही आता हळूहळू पुढे येत आहेत. पूर्वी सगळेच गरीब होते. आता मध्यमवर्ग-श्रीमंत-गरीब अशी दरी वाढू लागली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आता उघडपणे दिसू लागल्या आहेत.
भांडवलशाहीला पर्याय नाही. पण भांडवल फक्त शहरी भागात केंद्रित होऊ लागले. त्यामुळे गाव-शहर ही दरी वाढली. लोकांचे शहराकडे स्थलांतर सुरु झाले, गावे ओस पडू लागली आणि शहरे बकाल. वास्तविक आता गावागावात भांडवल निर्मिती होणे आवश्यक आहे.
रावांनी एका खूप मोठ्या संकटातून भारताला बाहेर काढले. भारताला जगासमोर खुले केले. जुन्या, गांजलेल्या आणि माजलेल्या लायसन्सशाहीवाल्या व्यवस्थेचा बिमोड केला, आणि सोवियत रशियोत्तर जगात भारताला नवीन आणि जवळचे मित्र मिळवून दिले.
त्यांच्यामुळे आज भारत धनसंपन्न आहे आणि होतोय, अधिकाधिक शक्तीसंपन्न होतोय, कॉन्फिडेंट होतोय.
पी. व्ही. नरसिंहरावांना आज कॉंग्रेसमध्ये काहीही स्थान नाही. जग त्यांना विसरले आहे. भारत त्यांना विसरला आहे. अगदी जाणीवपूर्वक. पण, आधी म्हटल्याप्रमाणे सर्वगुणदोषांसकट ते आजच्या भारताची रचना त्यांनी केली आहे. आजचा भारत रावांचा भारत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.