आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीला उत्तमोत्तम कलाकारांचा फार मोठा वारसा लाभला आहे. इथे अनेक कलाकार होऊन गेले. या कलाकारांपैकी काहींना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं तर काही काळाच्या ओघात मागे पडले. असाच एक गाजलेला दिग्दर्शक म्हणजे गुरु दत्त. गुरुदत्तच्या कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीने सुवर्णयुग बघितलं असं म्हटलं जातं. त्यांच्या चित्रपटांची बातच न्यारी होती. त्यांच्या कामात जादू असायची असं सांगितलं जातं.
‘फुल और कांटे’ हा एक चित्रपट सोडला तर त्यांचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले होते. आजही जेव्हा त्यांचे चित्रपट फ्रान्स, जपान, जर्मनी यांसारख्या देशात पुन्हा रिलीज केले जातात, त्यावरून आपल्याला लोकांचा त्यांच्या कलेवर असणाऱ्या प्रेमाचा अंदाज येतो.
त्यांचे काही चित्रपट किती हिट असावेत याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्यांच्या ‘प्यासा‘ या चित्रपटाचा समावेश टाईम मासिकाच्या 100 चित्रपटांच्या ‘बेस्ट फिल्म्स ऑफ ऑल टाईम‘ च्या यादीमध्ये झाला होता.
अशा या थोर कलाकाराचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील मुख्याध्यापक होते, तर आई लेखिका होत्या. साहजिकच त्यांना कला आणि शिक्षण विषयात त्यांना विशेष रुची होती. ज्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या पालकांकडूनच मिळाली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्ता येथे झाले. त्यांना कलेमध्ये रस असल्यामुळेच त्यांनी उदय शंकर इंडिया कल्चर सेंटरमधून नृत्य करण्याची कला शिकली.
त्याच्या आयुष्यात लहानपणी एक दुर्घटना घडली ज्यानंतर वसंतकुमार शिवशंकर पदुकोण यांचे नाव बदलून गुरु दत्त असे ठेवण्यात आले. नंतर जेव्हा ते मुंबईत गेले तेव्हा त्यांनी आपले जुने नाव सोडले आणि गुरु दत्त हेच नवीन नाव कायमचे लावण्यास सुरुवात केली.
मुंबईत आल्यावर काही वर्ष त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केले. परंतु त्यांची कलेविषयीची ओढ त्यांना काही स्वस्थ बसू देईना. ते कायमच त्या एका संधीच्या शोधात होते १९४४ मध्ये ती त्यांना मिळाली आणि गुरु दत्त यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
सर्वात पहिल्यांदा प्रभात स्टुडिओमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून कामाला लागले. इथे असतानाच त्यांची आणि देव आनंदची भेट झाली. या भेटीनंतर त्यांचे संबंध एवढे घनिष्ट झाले की ते दोघे एकमेकांचे जवळचे मित्र झाले.
१९५० ते १९६० च्या दशकात गुरु दत्तने क्लासिक चित्रपट दिले. कागज के फूल, प्यासा, साहिब बीबी और गुलाम आणि चौदवी का चांद हे त्यातलेच काही उदाहरणं.
गुरु दत्त यांना कोठ्यावर आधारित कथेवर ‘प्यासा’ हा चित्रपट काढायचा होता, पण त्यांना हवी तशी कहाणी मिळत नव्हती किंबहुना ते कोठ्यावर कधी गेलेच नव्हते. मग एकदा त्यांनी अशीच हिम्मत गोळा केली आणि खिशात पैश्यांची गड्डी घेऊन कोठा गाठला.
त्यांना तिथे असं दिसलं की, एक ७ महिन्यांची गर्भवती महिला तिथे पैसे मिळण्यासाठी नृत्य करतेय. आणि तिथे उपस्थित लोकंसुद्धा ते पाहत होते. तिला नाचणं अवघड झालं होतं पण पोटासाठी तिला करावं लागत होतं. हे दृश्य बघून गुरुदत्त यांना खूप वाईट वाटलं आणि ते नोटांची गड्डी आपल्या जागेवर ठेऊन उठून आले. या घटनेनंतर त्यांचा तो चित्रपट कोठ्यावर आधारित कथेवर तर नाही आला पण त्यातलं ‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहां हैं’ हे गाणं मात्र त्यांनी याच प्रसंगावरून घेतलं.
१९५१ मध्ये बाजी चित्रपटाच्या सेटवर गीता रॉय या प्रसिद्ध गायिकेसोबत त्यांची ओळख झाली आणि पहिल्याच भेटीत गुरु दत्त या गायिकेच्या प्रेमात पडले. हळूहळू त्यांची कहाणी खुलू लागली. या दोघांच्या प्रेमप्रकरणाला खतपाणी देण्यात गुरु दत्तची लहान बहीण ललिता लाजमी यांचा मोठा हात होता. ललिता ही गुरु दत्त यांची प्रेमपत्र गीता यांना देण्याचं काम करायच्या. या दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याचे मान्य केले आणि पुढे जाऊन १९५३ मध्ये त्यांचे लग्न झाले.
१९५७ मध्ये गुरुदत्त चित्रपट प्यासाच्या सेटवर अभिनेत्री वहिदा रहेमान हिच्यावर फिदा झाले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध विणले जाऊ लागले. तसं पाहायला गेलं तर वाहिदा यांच्याशी गुरुदत्त यांची भेट १९४६ मध्येच “हम एक है”च्या सेट वर झाली होती. त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता.
वहिदा रेहमान यांच्याशी जवळीक वाढल्याने गीता आणि गुरु दत्त यांच्यातील अंतर वाढू लागले. शेवटी एक दिवस दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्यांच्यातील संवाद थांबला. त्यानंतर गीता त्यांच्यापासून दूर गेली ती कायमचीच.
१० ऑक्टोबर १९६४ रोजी गुरु दत्त अस्वस्थ होते. पत्नी गीतापासून दूर गेल्यानंतर त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली होती. यादिवशी त्यांनी आपला मित्र अबरार अल्वीबरोबर पेग बनविला. अबरार अनेकदा गुरु दत्तला भेटायला घरी येत असे. या रात्रीही त्याने त्यांच्याशी बहरण फिर भी आयेगी या चित्रपटावर चर्चा केली. रात्री उशिरा गुरु दत्त यांनी गीताला फोन केला. त्यांना आपल्या मुलीशी बोलायचे होते.
खूप दिवसांपासून गुरु दत्त आपल्या मुलीला भेटले नव्हते. त्यांची मुलगी आता अडीच वर्षांची झाली होती. गीताने फोन उचलताच त्यांनी पत्नीकडे मुलीला भेटू देण्याबाबत विनवणी करायला सुरुवात केली. पण गीता अजूनही नाराजच होती. तिनी गुरु दत्त यांना नकार दिला.
यावर गुरु दत्तने गीताला सांगितले की “माझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, नाहीतर तुला माझा मृतदेह दिसेल.”
पण या धमकीनंतरही गीताला काही फरक पडला नाही आणि तिने वडिलांना आपल्या मुलीला भेटू दिलं नाही. त्या रात्री हा फोन त्यांच्यामध्ये रणांगणाच्या रूपात झाला होता. शेवटी गीतावर चिडलेल्या गुरु दत्तने फोन आपटला. गुरू दत्त आधीच नशेत होते, अस्वस्थ होते. गीताच्या नकारामुळे ते अधिक अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा जास्त मद्यपान करण्यास सुरवात केली. त्या रात्री त्यांनी याआधी केले नसेल इतके मद्यपान केले.
गुरु दत्त अनेकदा मरण्याच्या मार्गावर अबरारशी बोलले. त्याला काय माहित होते की ते खरोखर मरण्याचा प्रयत्न करतील. आदल्या दिवशी ज्या मित्राबरोबर मद्यपान केले होते, तोच मित्र दुसर्या दिवशी मृत्यूला जवळ करेल यावर त्याचा विश्वास नव्हता.
गुरु दत्तची धमकी खरी आहे हे गीताला वाटलेसुद्धा नव्हते. त्या रात्री मित्राचे घर सोडल्यानंतर ते एकटेच आपल्या घरी गेले आणि आपल्या मुलीच्या आठवणीत व्याकुळ झाले होते. मुलीला भेटता न येण्याची खंत सहन न झाल्याने त्यांनी खूप जास्त प्रमाणत झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
या हरहुन्नरी कलाकाराला मुलीच्या विरहात केवळ ३९ व्या वर्षी आपले प्राण गमवावे लागले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.