आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सर्वात जास्त जागा निवडून आलेल्या भाजपने आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अडीच अडीच वर्षे विभागून मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्यानंतर राज्यात कुणाची सत्ता स्थापन होणार, कोण कुणाबरोबर जाणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.
राष्ट्रवादी- काँग्रेस-शिवसेना की भाजप-शिवसेना या दोन शक्यतांची चर्चा चालू होती. यापैकी पहिली शक्यता जवळजवळ अशक्य वाटत असतानाच एक दिवस सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास एक बातमी येऊन धडकली.
अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या ३५ आमदारांना सोबत घेऊन पक्ष नेतृत्वाची परवानगी न घेता भल्या पहाटे राजभवनावर शपथग्रहण केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार!
अचानक आलेल्या या बातमीने राज्यातल्या भल्या भल्या राजकीय पंडितांना बुचकळ्यात टाकलं होतं. विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचा प्रतोद अजितदादांच्या हाती असल्याने त्यांनी ३५ आमदार सोबत असल्याचा केलेला दावा अगदीच आधारहीन नव्हता.
दुसऱ्या बाजूला कायम राष्ट्रवादीविरुद्ध भूमिका घेत आलेले, आणि राष्ट्रवादीशी युतीबाबत प्रश्न विचारला असता ‘एकवेळ ब्रह्मचारी राहीन पण लग्न करणार नाही’ अशा वल्गना करत असलेले देवेंद्र फडणवीस अजितदादांना सत्तास्थापनेत सोबत घेतातच कसे, या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नव्हती.
पण अजितदादा बंड करून राष्ट्रवादीत जातील ही बातमी एका ट्विटर हँडलने तीन दिवस आधीच प्रकाशित केली होती. त्या हँडलचं नाव होतं ‘कट्टा न्यूज’.
१८ नोव्हेंबर रोजी हे ट्विटर हँडल सुरू झालं आणि त्यानंतर दोनच दिवसांनी या हँडलवर ती बातमी झळकली. अजित पवारांचं बंड थांबवण्यास असमर्थ असलेल्या शरद पवारांनी पंतप्रधान मोदींशी मिटिंग करून अजित पवारांना सत्तेत स्थान न देण्याची विनंती केली आहे असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
Serious & breaking: @AjitPawarSpeaks is ready split the party with 35 MLAs & may joint hand with @BJP4Maharashtra & form the government. @PawarSpeaks having tough time to convince his nephew @AjitPawarSpeaks so meeting Modi to not to entertain @AjitPawarSpeaks
— KattaNews (@katta_news) November 20, 2019
त्यानंतर तीनच दिवसांनी अजितदादांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याची बातमी आली. हे ट्विटर हँडल अगदीच नवीन असल्याने या बातमीकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही हे खरं, पण काही पत्रकार आणि माध्यमांवर लक्ष ठेवून असलेल्या व्यक्तींच्या नजरेत ही बातमी आल्याशिवाय राहिली नाही.
Congrats @ss_suryawanshi. You hit a bull’s eye! https://t.co/3GGpnG2UVo
— nikhil wagle (@waglenikhil) November 23, 2019
My compliments to @katta_news for this newsbreak of the day.
This is what journalism must do: bringing to light something that someone in power would like to keep in dark. https://t.co/jLrZlkP5JZ
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) November 25, 2019
‘कट्टा न्यूज’ कुणाचं?
हे कट्टा न्यूज नावाचं ट्विटर हँडल चालवणारं नक्की आहे तरी कोण? याचा शोध घेतला असता मुंबईतील सुधीर सूर्यवंशी नावाची एक व्यक्ती हे हँडल चालवत असल्याचं लक्षात आलं.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात डीएनए समूहाचं छापील दैनिक आर्थिक परिस्थितीचं कारण देत बंद झालं होतं. या दैनिकात सुधीर सूर्यवंशी काम करत होते. दैनिक बंद झाल्यानंतर आता छापील माध्यमात फारसा राम उरलेला नाही हा विचार करून सुधीर सूर्यवंशी यांनी डिजिटल माध्यम सुरू करण्याचा विचार केला.
Alt news या वेबसाईटने त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला. मुलाखतीत ते म्हणतात,
‘अजित पवार भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणार ही बातमी पहिल्यांदा आम्ही दिली. बातमीची पूर्ण शहानिशा केल्यावरच ती बातमी ट्विट करण्यात आली होती. ज्यांच्या पाहण्यात ती बातमी आली त्यापैकी अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी दुर्लक्ष केलं. राष्ट्रवादीच्याही काही नेत्यांनी आम्हाला संपर्क करून ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं, पण आम्हाला आमच्या स्रोतांवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे आम्ही माघार घेतली नाही.’
सुधीर सूर्यवंशी यांना १५ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. शेती, रिअल इस्टेट, राजकारण अशा विषयात त्यांनी पत्रकारिता केली आहे. सध्या ते एकटेच कट्टा न्यूजचे काम पाहत आहेत.
मुख्यप्रवाही माध्यमे स्वतःची विश्वासार्हता गमावत असताना डिजिटल माध्यमांची पत्रकारितेतली भूमिका महत्त्वाची आहे असं सुधीर म्हणतात. कट्टा न्यूज सध्या एक छोटं व्यासपीठ असलं तरी येत्या काळात ते मोठं करण्याचा विचारही त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवला.
अजितदादा उपमुख्यमंत्री असलेलं ते सरकार एका दिवसातच पडलं, राष्ट्रवादी-काँग्रेस -शिवसेना यांनी युती केली आणि राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. पण त्या एका दिवसाच्या सरकारबद्दलचं गूढ आजही कायम आहे.
न्यूज चॅनेलवर आपण जे पाहतो त्याच्या पलीकडेही पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असतात ज्यांचा आपल्याला थांगपत्ता नसतो. या घडामोडी समोर आणण्याची आणि अचूक बातमी देण्याची हातोटी असलेली माध्यमे ही पत्रकारितेची गरज आहे.
अजितदादांच्या त्या बंडावर बराच खल केला जाईल, अनेक पुस्तके लिहिली जातील, पण ते घडण्याच्या आधीच तीन दिवस त्याची बातमी एका व्यक्तीने केली होती ती व्यक्ती म्हणजे सुधीर सूर्यवंशी.
येत्या काळात ते पत्रकारितेत काय काय समोर आणतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.