आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सुभाष गुप्तेपासून अनिल कुंबळेपर्यंत, विनू मांकडपासून रवींद्र जडेजापर्यंत आणि ईएएस प्रसन्नापासून आर अश्विनपर्यंत अशा अपवादात्मक कौशल्यांच्या अनेक फिरकीपटूंनी भारतीय क्रिकेटला अनेकदा संकटांमधून तारून नेलं आहे. आपल्या कौशल्यांच्या बळावर त्यांना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. स्थानिक क्रिकेटमध्ये देथील असा एक खेळाडू होता जो या खेळाडूंच्या तोडीस तोड होता. अनेक रणजी सामन्यांमध्ये अतुलनीय कामगिरी करूनही त्याला भारताच्या मुख्य संघासाठी खेळण्याचा कॉल कधीच मिळाला नाही. आजही कित्येक क्रिकेट शौकिन या खेळाडूच्या नावापासून अनभिज्ञचं आहेत… असा हा खेळाडू होता तरी कोण?
या खेळाडूबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला १९७३पर्यंत मागे जावे लागेल. चेपॉक स्टेडियमवर रणजी करंडकाचा अंतिम सामना सुरू होता. गेल्या १४ वर्षांपासून मुंबईचा संघ रणजी करंडक आपल्या खिशात घालत होता. त्यावर्षी देखील पुन्हा एकदा करंडक आपल्याकडे आणण्यासाठी मुंबईचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. यावेळी त्यांच्या समोर तामिळनाडूचा संघ होता. मुंबईला धावांची लालूच दाखवून फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तामिळनाडूची योजना होती. यासाठी तामिळनाडूकडे श्रीनिवासराघवन वेंकटराघवन आणि वामन विश्वनाथ कुमार हे त्यावेळचे दोन जादूगार होते.
मुंबईचा सगळा संघ अवघ्या १५१ धावांवर गारद झाला होता. वेंकटराघवन व वामनच्या जोडगोळीनं प्रत्येकी ५ बळी घेत आपलं काम चोख पार पाडलं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तामिळनाडूच्या संघानं २ बळींच्या बदल्यात ६२ धावा केल्या. दुसरा दिवशी आपली योजना आपल्यावरच उलटेल असा विचार देखील तामिळनाडूनं केला नव्हता.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि पहिल्या अर्ध्या तासानंतर चेंडू फिरकीपटू पद्माकर शिवलकरच्या हातात देण्यात आला. पहिलाच चेंडू भयानक टर्नसह बाउंस झाला. संपूर्ण सामन्यात त्याक्षणापर्यंतचा तो सर्वोच्च टर्न होता. क्रिजवर तामिळनाडूचे ३ आणि ४ क्रमांकाचे फलंदाज खेळत होते. शिवलकरनी पहिला चेंडू टाकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसलेले आणि १० क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारे कालायसुंदरम् व वामन कुमारनी एकमेकांकडं सूचकपणं पाहिलं. बॉल किती भयानकपणे टर्न होऊन बाउंस होत आहे, हे दोघांनीही पाहिलं होतं.
वामन स्वतः उठले आणि त्यांनी कालायसुंदरमला देखील किट घालण्यास सांगितलं. पुढच्या तासाभरातच आपल्याला क्रीजवर उतरावं लागेल, हे वामन कुमार यांना स्पष्टपणे दिसलं होतं. वामन कुमारची ही ‘भविष्यवाणी’ अक्षरश: खरी ठरली. पुढच्या केवळ १८ धावांमध्ये तामिळनाडूच्या संघाचे ८ खेळाडू बाद होऊन माघारी आले आणि त्यांना माघारी धाडणारा खेळाडू होता, पद्माकर शिवलकर ! दुसऱ्या दिवशी पद्माकर यांनी एकट्यानं ७ बळी घेतले होते. कहर म्हणजे १७.५ षटकांपैकी १० षटकं त्यांनी मेडन(निर्धाव) टाकली होती.
मुंबईच्या रणजी इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून पद्माकर शिवलकरांची ओळख आहे. इतकी अप्रतिम गोलंदाजी असूनही त्यांना एकदाही भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. तसं पाहिलं तर पद्माकर आणि क्रिकेटचा काहीही संबंध नव्हता. हातात काम नसणाऱ्या मात्र, ‘मैत्रीच्या दुनियेतील राजा’माणसाप्रमाणं त्यांची अवस्था होती. मित्र दत्तू सातळकरसोबक एक दिवस ते हिंदू जिमखान्यात गेले. तिथे खेळाडूंच्या चाचण्यांचं शिबिर सुरू होतं. गंमत म्हणून पद्माकर यांनी देखील कुणाची तरी किट घातली आणि चेंडू फेकण्याचा विचार केला. यापूर्वी, त्यांनी कधीही हार्ड लेदर बॉलला हात लावलेला नव्हता. अचानक कुणीतरी त्यांना सांगितलं की, चाचणी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव विनू मांकड आहे! हे ऐकताच पद्माकर बाहेर पडण्याच्या तयारीत होते मात्र, मित्रांच्या आग्रहास्तव ते जिमखान्यात थांबले.
पद्माकर जेव्हा चाचणीसाठी पुढे आले तेव्हा पहिला चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात पडला आणि दुसरा चेंडू उजव्या कोपऱ्यात. यामुळं दत्तू सातळकरांनी त्यांना अस्सल दोन मराठी शिव्या देखील ऐकवल्या.
त्यानंतर विनू मंकड यांनी स्वत: येऊन पद्माकरला काहीतरी समजावलं आणि काय आश्चर्य पुढचा चेंडू एकदम सरळ गेला. चेंडू सरळ गेला हे पाहताच विनू मांकड यांनी त्याला आपल्या कॅम्पमध्ये सामिल करून घेतलं. पद्माकरचे मित्र खूश झाले तर पद्माकर शॉकमध्येच गेले. आपल्याला विनू मांकडसारख्या व्यक्तीनं घेतलंच कसं हा प्रश्न त्यांना पडला.
१४ एप्रिल १९४० रोजी जन्मलेल्या पद्माकर यांनी दादर युनियनकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९६१-६२ मध्ये त्याने सीसीआयसह ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ३ सामन्यांमध्ये १५ बळी मिळवले. परिणामी, त्या हंगामापासून त्यांचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. त्यांनी मुंबईसाठी ७४ वेळा रणजी करंडक खेळून ३६१ विकेट्स घेतल्या आहेत. इराणी करंडकमध्ये १० सामन्यांत ५१ विकेट्स घेतल्या होत्या. एकूणच त्यांनी मुंबईच्या संघासाठी ४१९ विकेट्स आहेत.
दुलिप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागासाठी त्यांनी १५ सामन्यांमध्ये ७५ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय ते डरहॅमसाठी मायनर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये देखील खेळले आहेत. तिथे ५ सामन्यांमध्ये त्यांनी १३ बळी मिळवले. १९८०-८१मध्ये त्यांनी रणजीमधून आपली कारकीर्द संपवली होती मात्र, १९८७-८८मध्ये आश्चर्यकारकरित्या त्यांना पुन्हा खेळण्याचं समन्स मिळालं. ते दोन हंगाम खेळले देखील मात्र, त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. गंमत म्हणजे त्यावेळी मुंबईच्या चमूमध्ये सचिन तेंडुलकरचा देखील समावेश होता मात्र, त्याला खेळवण्यात आलं नव्हतं.
क्रिकेट व्यतिरिक्त पद्माकर शिवलकर गाणं देखील गायचे. त्यांनी क्रिकेटवर काही गाणी रचली आणि गायली आहेत. असे म्हटलं जातं की, त्याच्या गाण्यांनी अनेकांना रडवलं आहे. क्षमता असूनही एखाद्या व्यक्तीला संधी मिळत नाही तेव्हा त्याला होणारा त्रास त्यांनी या गाण्यांतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईतील क्रिकेटपटूंसाठी ती राष्ट्रगीतासारखी होती. बीसीसीआयनं त्यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं आहे. मात्र, शेवटी पुरस्कार देण्याऐवजी त्यांना मुख्य संघात खेळण्याची संधी दिली असती तर त्यांना जास्त आनंद झाला असता, नाही का?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved