आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तिरुनेलवेली. तामिळनाडूमधील एक महत्त्वाचं शहर. या शहराजवळ वाहते तामराबरणी नदी. फक्त एप्रिल आणि मे महिन्यात कोरडी असणारी आणि इतर वेळेस दुथडी भरून वाहणारी ही नदी दक्षिण भारताची जान आहे. या नदीच्या आजूबाजूचा परिसरही साहजिकच अतिशय सुपीक आहे. इतका की पूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळात ‘मद्रास प्रांता’चा सगळ्यात जास्त महसूल याच भागातून गोळा व्हायचा.
तिरुनेलवेली आणि पालयामकोट्टाई या दोन जुळ्या शहरांमधून ही नदी वाहते. दोन शहरांना जोडणारा एक पूल मोठ्या दिमाखात या नदीवर उभा असलेला आज पाहायला मिळतो. लंडनच्या थेम्स नदीच्या पुलावरील “लंडन ब्रिज”शी साधर्म्य असणारा हा पूल तिथल्या नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण या पूलाची गोष्ट मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. कारण जरी ब्रिटिशांनी त्यांच्या काळात हा पूल बांधला असला तरीही त्या मागे एका भारतीय माणसाचा हात आहे, ज्याला आज सगळेच विसरलेत.
तर, पूर्वीच्या काळी, जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा, नदी ओलांडून जाण्यासाठी होडीचा वापर व्हायचा. आजूबाजूला विराण वस्ती त्यामुळं खून, चोऱ्यामाऱ्या आणि इतर प्रकार सर्रास चालायचे. साधारण १८३६ दरम्यान एक दिवस असाच काही प्रकार त्या ठिकाणी घडला. झालं! तिथला कलेक्टर, एडन, साहेबानं ठरवलं की ते काही नाही! या नदीवर पूल बांधायचाच! तोही तंतोतंत ‘लंडन ब्रिज’सारखा!
हा निर्णय झाला आणि लगेच एक टीम तयार करण्यात आली. याच टीममध्ये एक माणूस होता ज्याचं नाव पुढं या पुलाला देण्यात आलं. त्याचं नाव होतं सुलोचना मुदलियार!
हा सुलोचना चेंगलपट्टूच्या एका प्रचंड श्रीमंत घरात जन्माला आला. त्याचे वडील तर ब्रिटिशांसाठी दुभाषी म्हणून काम करायचे, म्हणजे बक्कळ पैसे कमावलेले. सुलोचनाला पण कलेक्टर ऑफिसमध्ये चांगल्या पदाची नोकरी होती, शिवाय दस्तुरखुद्द कलेक्टर साहेबासोबत त्याचे चांगले संबंध होते.
तर असा हा सुलोचना जर या पूलाच्या बांधकामाच्या टीममध्ये नसता तर नवलंच! टीम तयार झाली. इंजिनिअर लोकांनी नकाशा वगैरे बनवला आणि बांधकामाचा खर्च सांगितला तब्बल ५० हजार रुपये! तेही त्या काळचे! एडननं काय ठरवलं की आता एवढे पैसे तर ब्रिटिश सरकार देणं शक्य नाही मग आपण इथल्या रहिवाशांकडूनच वर्गणी पद्धतीनं पैसे गोळा करूयात. कारण शेवटी हा पूल बांधतो तर त्यांच्या भल्यासाठीच ना!
आता आधीच ब्रिटिशांनी लुटून आपल्या लोकांना गरीब केलं होतं. त्यात हे एवढे पैसे त्या लोकांकडून गोळा करायचे म्हणजे कठीणच! इतक्यात सुलोचनानं विचार केला की आपल्या वडिलांनी दुभाषी म्हणून आणि आपण या कलेक्टर कचेरीत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर, बक्कळ पैसे कमावलाय. हा सगळा पैसा शेवटी आला तर आपल्या लोकांकडून गोळा केलेल्या करातूनच ना! मग आपण हाच पैसा त्यांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या या पूलासाठी द्यायला काय हरकत आहे?
झालं! ठरलं तर मग! त्यानं लगेच घरी हा विषय बोलून दाखवला आणि घरचेही तयार झाले. दुसऱ्याच दिवशी आपला पठ्ठ्या कलेक्टर साहेबांकडे काही दागिने घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की या पुलाच्या बांधकामासाठी लागणारा सगळा खर्च तो उचलणार आहे आणि हे दागिने म्हणजे त्याचं टोकन आहे.
इतका सुंदर पूल बांधायला तब्बल तीन वर्ष लागले. सुलोचनाला त्याची जवळपास सगळीच इस्टेट विकावी लागली, पण पुलाच्या बांधकामात त्यानं कुठलीच कसर ठेवली नाही. म्हणूनच की काय ब्रिटिशांनी या पुलाला सुलोचना मुदलियार पूल असं नाव दिलं आणि त्यालाच या पुलावरून पहिल्यांदा चालण्याचा मान दिला.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी, साधारण १९७०च्या दरम्यान, हा जुना पूल पाडून त्या जागी नवीन बांधण्याचा प्रस्ताव होता पण, हा पूल इतका पक्का होता की त्याला पाडणं शक्यच नव्हतं! त्यामुळे शेवटी याच पूलाला लागून दुसरा पूल उभारण्यात आला. इतके पूर येऊन, इतक्या वर्षांनीही हा पूल असाच उभा आहे! तुम्ही कधी तामिळनाडूला गेलात तर इथं नक्की भेट द्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.