आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्ती भोवतीचे वलय संपुष्टात आले की, नंतर त्या व्यक्तींचे काय होते याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. चित्रपट आणि क्रिकेटमधील ग्लॅमर टिकवून ठेवणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आणि म्हणूनच ती सर्वांनाच जमते असेही नाही.
२०११ सालच्या वर्ल्ड कपचा किस्सा तुम्हाला आठवतो का? या वर्ल्डकपचे नाव घेताच तुम्हाला कदाचित सचिन, युवी आणि हरभजनच्या खेळाची आणि त्यांनी आनंदाने केलेल्या जल्लोषाची आठवण होत असेल. सर्वांच्याच डोळ्यातून आनंद अश्रू ओघळत होते. भारतीय क्रिकेट रसिकांच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. १९८३ नंतर भारताने २०११ मधे पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे भारतासाठी हा विजय खासच होता. या विजयाला आकार देणाऱ्या खेळाडूची आज क्रीडा आणि क्रिकेट जगाताला विसर पडला आहे.
२०११ सालच्या वर्ल्डकपसाठी निवडलेल्या संघात मुनाफ पटेल नावाचा एक फास्ट बॉलरही होता हे आज कुणाला फारसे आठवणार नाही. कारण, फक्त झगमगाटाला महत्त्व असणाऱ्या या जगात ग्रामीण भागातून आणि गरीब स्तरातून आलेल्या लोकांना फार काळ टिकून राहता येत नाही. कदाचित मुनाफच्या बाबतीतही हेच घडले असावे.
मुनाफबद्दल बोलायचे तर त्याला क्रिकेटशिवाय दुसरे काहीच येत नाही असे म्हटले जाई.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनाही गुंगारा देणारा हा गोलंदाज तरीही आज मुनाफ या झगमगाटात कुठेच दिसत नाही. एका सामान्य गरीब कुटुंबातून येऊनही मुनाफने भारतीय क्रिकेट संघात जे स्थान मिळवले ते पाहून थक्क व्हायला होते.
कारण, हा प्रवास वाटतो तितका सोपा अजिबात नव्हता. ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे पण घरची परिस्थिती साथ देत नाही अशा सर्व क्रिकेटपटूंसाठी मुनाफचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
१२ जुलै १९८३ रोजी त्याचा जन्म झाला. अठरा विश्व दारिद्र्य जणू पाचवीलाच पुजलेले. मोठा होईल तसा मुनाफ त्याच्या धावगतीसाठी ओळखला जाऊ लागला. घरातील दारिद्र्याने मात्र त्याच्या या धावण्याला खीळ घातली. इच्छा असूनही मुनाफला शाळा आणि धावणे सोडून कामावर जावे लागायचे. दिवसाला मिळणाऱ्या ३५ रुपये पगारासाठी त्याला आठ तास काम करावे लागत होते. कोवळ्या वयातच जबाबदारीच्या ओझ्याने त्याचे खांदे वाकून गेले होते.
ते दिवस आठवून मुनाफ म्हणतो, “दु:ख सहन करण्याची जणू सवयच लागली होती. वडील एकटे शेतात काम करतात आणि आपण शाळेत बसतोय आशा विचाराने वैफल्य येत असे.”
मुनाफ शाळेत न येत कामगार म्हणून कामावर जातो हे जेव्हा त्याच्या शिक्षकांना कळले तेव्हा त्यांनी त्याचे काम बंद केले. मुनाफला खेळत किती गती आहे हे त्या शिक्षकांनाही माहिती होते. ते स्वतः मुनाफला खेळाचे प्रशिक्षण देऊ लागले. त्यांनी मुनाफला समजावून सांगितले की त्याने जर खेळावरच लक्ष्य केंद्रित केले तर तो आतापेक्षाही पुढे जास्त कमवू शकतो. या वयात त्याने फक्त खेळावर लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांच्या या धीराच्या शब्दाने मुनाफ काम सोडून शाळेत येऊ लागला. नियमित सराव करू लागला. पण काम सोडणे तर शक्य नव्हते. काम करत करत त्याने खेळाची प्रॅक्टीस सुरूच ठेवली.
त्याचा गावातील युसुफ भाई विदेशात काम करत होते. ते सुट्टीवर गावात आले असताना त्यांना मुनाफबद्दल कळले. तेंव्हा त्यांनी मुनाफला बडोद्यातील क्रिकेट क्लबमधे प्रवेश मिळवून दिला आणि त्याची राहण्याची सोयही करून दिली.
या क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षकांनी मुनाफचे गुण ओळखले आणि त्याच्यातील या कौशल्याला फुलवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्नही केले. याच दरम्यान त्याची ओळख किरण मोरेशी झाली.
मुनाफची बॉलिंग पाहून किरण मोरे त्याच्यावर प्रभावित झाले होते. त्यांनीही मुनाफला मदत करण्याचे ठरवले. मुनाफ क्रिकेटची प्रॅक्टिस तर करत होता पण, त्याच्याकडे शूज नव्हते तर किरण मोरेंनी त्याला शूजही घेऊन दिले.
हा काल मुनाफसाठी खूपच संघर्षाचा होता तरीही त्याला चांगले लोक भेटत गेले ज्यामुळे त्याला या संघर्षावर मात करण्याची हिंमत मिळाली. चेन्नईच्या एमआरएफ स्कूलमधेही त्याने कायद्यांचा अभ्यास केला.
क्रिकेटमधील त्याची गती आता चांगलीच वाढली होती. भारतीय संघात मुनाफला स्थान मिळावे अशी वकिली खुद्द स्टीव वॉने केली. डेनिस लिलीने तर त्याला भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून जाहीर केले. २००५ मधे मुनाफला भारतीय संघाच्या वतीने खेळण्याची संधी मिळालीच.
त्याचा पहिला सामना होता इंग्लंड विरोधात. पहिल्याच सामन्यात त्याने ९७ धावा आणि सात विकेट घेतल्या होत्या. पहिल्याच सामन्यात मुनाफने क्रिकेट रसिकांची मने जिंकली होती.
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या बॉलर्सपेक्षाही मुनाफच्या बॉलिंगचा वेग जास्त होता. करिअरच्या सुरुवातीच्या वर्षात मुनाफ एकदम फॉर्मात होता. एका वर्षात त्याला अनेकदा दुखापतही झाली. त्यामुळे त्याचा वेग थोडा मंदावला. नाहीतर सुरुवातीला तो १४०च्या स्पीडने बॉलिंग करत असे.
२००७च्या वर्ल्डकपमधेही मुनाफला भारतीय संघात प्रवेश मिळाला. पण, या वर्ल्डकप सामन्यात भारत पहिल्याच टप्प्यात सामन्यातून बाहेर पडला.
त्यानंतर मुनाफच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. शारीरिक असक्षमतेमुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०११ सालच्या वर्ल्डकपमधेही त्याला संघात स्थान देण्यावरून वादावादी सुरू होती. संघात आधीच स्थान दिलेल्या प्रवीण कुमारला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्याऐवजी मुनाफला संधी देण्यात आली. या वर्ल्डकप मालिकेत मुनाफने दमदार कामगिरी केली.
त्याच्या सायलंट बॉलिंगमुळे इतर बॉलर्सना फायदा झाला. त्याचा ओव्हर खाली गेला की फलंदाज पुढच्या बॉलरच्या चेंडूवर जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न करत आणि आउट होत. भारतीय संघाला याचाच फायदा झाला.
त्यानंतर पुन्हा एकदा मुनाफला गंभीर दुखापत झाली आणि तो भारतीय संघातून बाहेर झाला तो परत आलाच नाही. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या वतीने सामना खेळला होता. आयपीएलच्या लिलावात नंतर त्याच्यावरील बोली कमी झाली. हळूहळू क्रिकेटच्या पटलावरून मुनाफ हे नावच गायब झाले.
मुनाफने आपल्या करिअरमधे एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण ३५ विकेट घेतल्या. त्याने ७० एकदिवसीय सामने खेळले ज्यात एकूण ८६ विकेट घेतल्या. आयपीएल मध्येही त्याने एकूण ६३ सामने खेळले आणि सरासरी ७.५२ प्रमाणे यात त्याने एकूण ७४ विकेट घेतल्या.
कधीकाळी भारतीय संघाचा सर्वात वेगवान बॉलर असलेला मुनाफकडे आज सगळ्यांनीच दुर्लक्ष केले आहे. मुनाफचे सध्या काय सुरू आहे याची माहिती कोणालाच नाही. देशाला वर्ल्डकप मिळवून देण्यात अग्रेसर असलेला हा खेळाडू आज क्रिकेटमधूनच अदृश्य झाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.