आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेटच्या खेळात काही विशिष्ट संघांतील सामन्यांकडे खूपच गांभीर्याने पाहिले जाते. जसे की, भारत-पाकिस्तान आणि इंग्लंड-ऑस्ट्रेलिया. भारत-पाकिस्तान या दोन देशाच्या संघात सामना होणार असेल तर दोन्हीकडील क्रीडा-रसिक भलतेच जोशात दिसतात. खेळाडू देखील हा सामना जिंकणे म्हणजे इभ्रतीचा प्रश्न बनवतात. भारत-पाक सीमेवरील तणाव त्या दिवशी खेळपट्टीवर जाणवतो. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या सामन्यादरम्यानही अगदी अशीच परिस्थिती असते. आता अशीच परिस्थिती भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांदरम्यान होते की काय असे वाटत आहे.
क्रिकेटचा जन्मच इंग्लंडमध्ये झाला. साहजिकच सुरुवातीच्या इंग्लंडचे खेळाडू या खेळात पूर्णत: माहीर होते. त्यांच्याविरुद्ध खेळताना आपण सामना जिंकू असा विश्वास प्रतिस्पर्धी संघातील कुठल्याच खेळाडूला वाटत नसे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातही पूर्वी जेव्हा सामने होत तेव्हा इंग्लंडचाच विजय होणार हे समीकरण जणू पक्के रुजले होते.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यानही खूप काळापासून सामने होत आलेले आहेत. परंतु यांच्यातील ॲशेस सिरीज खूपच मानाची समजली जाते. ॲशेस सिरीजला हे नाव का पडलं आणि हा सामना इतका प्रतिष्ठेचा का समजला जातो हे तुम्हाला माहित आहे का? माहिती नसेल तर मग हा लेख नक्की वाचा.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजेच १८६१ पासून सामने खेळले जात आहेत. सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध जिंकणे कुणालाही सहज शक्य नव्हते.
त्यातही एकवेळ इंग्लंड परकीय मैदानावर हरण्याची शक्यता होती. पण, त्यांच्या स्वतःच्या मैदानावर शक्यच नाही. त्यांच्याच मैदानावर त्यांनाच हरवण्याचे स्वप्न बघणे म्हणजे मूर्खपणाचेच लक्षण. याच गोष्टीचा इंग्लंडला खूप गर्व होता.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान २९ ऑगस्ट १८८२ रोजी झालेल्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दाखवून दिले की, गर्वाचे घर नेहमी खालीच असते.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान त्या दिवशी ओव्हलच्या मैदानावर सामना होणार होता. घरच्याच मैदानावरील सामना असल्याने इंग्लंडचा संघ निश्चिंत होता. आपलाच विजय होणार याच भ्रमात हा संघ होता. परंतु त्यादिवशी सामन्याचा जो निकाल लागला तो इंग्लंडसाठी एक कायमचा धडा देणारा ठरला. स्वतःच्या मैदानावर कधीही पराभवाचे तोंड न पाहिलेल्या इंग्लंडला त्यादिवशी समजले की पराभव काय असतो, इंग्लंडला हरवून ऑस्ट्रेलियाने इतिहास घडवला होता.
अर्थातच आपल्या संघाचा आपल्याच मैदानात पराभव व्हावा ही गोष्ट कुठल्याही क्रिकेट रसिकाला दुख देणारीच ठरली असती. त्यादिवशी इंग्लंडचे पत्रकार देखील आपल्याच संघावर कमालीचे नाराज होते. अशाच एका नाराज पत्रकाराने आपल्या पेपरमध्ये बातमी छापली, ’२९ ऑगस्ट रोजी इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाला, तोही ओवलच्या आपल्याच मैदानावर.. आता याचे अंत्यसंस्कार केल्यावर ऑस्ट्रेलिया ही राख (ॲशेस) आपल्या सोबत घेऊन जाईल!’
इंग्लंडच्या क्रिकेटची राख आता ऑस्ट्रेलियाला गेली अशीच चर्चा जिकडे तिकडे होऊ लागली. इंगलंड क्रिकेट संघातील खेळाडूंना हा अपमान सारखाच बोचत राहिला. पुढच्या वेळी या पराभवाचा वचपा काढायचाच असे या खेळाडूंनी ठरवले. त्याच वर्षी काही महिन्यांच्या कालावधीनंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार होता. इंग्लंडच्या प्रत्येक खेळाडूला आपण कधी एकदा ऑस्ट्रेलियाला धूळ चारतोय असं झालं होतं.
शेवटी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील लढतीचा तो दिवस उगवलाच ज्या दिवशी इंग्लंडने आपला पराभवाचे रूपांतर विजयात केले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन टेस्ट मॅचेस होत्या. तीन सामन्यांपैकी इंग्लंडने दोन सामन्यांनी मालिका जिंकली. त्यांनी पराभवाचा वचपा काढला होता. त्यावेळी इंग्लंडच्या संघाचे कॅप्टन होते इवो ब्लीग. असे म्हटले जाते की इवो ब्लीगने जहाजात पाऊल ठेवण्याआधीच, विजयी होऊनच परतायचं, अशी शपथ घेतली होती.
इंग्लंडचा विजय झाला. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटप्रेमी नाराज झाले.
ऑस्ट्रेलियातील एक समाजसेविका लेडी जेनेट हिने इंग्लंडच्या संघाची थट्टा करण्यासाठी कॅप्टन इवो ब्लीग याच्याकडे एक छोटासा कलश दिला ज्यात, २९ ऑगस्ट १९८२ रोजी झालेल्या सामन्यातील एका विकेट बेलची राख होती.
ऑस्ट्रेलियासाठी ही फक्त एक चेष्टा होती मात्र इंग्लंडच्या खेळाडूंच्या जिव्हारी लागले. राखेने भरलेला कलश जरी त्यांनी घरी आणला आणि याच नावाने ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात ‘ॲशेस सिरीज’ सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे.
पण जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतात तेव्हा त्यांच्यातील लढत ही चुरशीची ठरते. एकमेकांना हरवण्यासाठी हे खेळाडू अगदी जीव तोडून खेळतात. खेळता खेळता कधी कधी शाब्दिक चकमकीवरही घसरतात. एकमेकांच्या खेळाडूंची फिरकी घेणे, त्यांना चिडवणे, उगीचच उचकावणे असेही प्रकार होत राहतात. कधीकधी तर ही शाब्दिक चकमक इतकी टोकाला जाते की मैदानातील वातावरणच बिघडून जाते. क्रिकेटच्या भाषेत अशा प्रकाराला स्लेजिंग म्हटले जाते. ॲशेस मालिकेत हे स्लेजिंगचे प्रकार वारंवार होत राहतात.
१९७९ सालचा असाच एक किस्सा आहे.
१९७९ सालच्या ॲशेस मालिकेच्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेनिस लिली मैदानावर आला. त्याच्या हातातील बॅट त्यादिवशी खूपच चमकत होती. सुरुवातीला यामागचे कारण कुणाच्याच लक्षात आले नाही पण जेव्हा त्याने पहिला चेंडू खेळला तेव्हा लक्षात आले की बॅट लाकडाची नाही तर ॲल्युमिनियमची आहे. संपूर्ण मैदानात आणि प्रेक्षकांमधेही गदारोळ सुरू झाला. इंग्लंडचे खेळाडू, पंच इतकेच काय खुद्द त्याच्याच संघातील खेळाडूंनीही त्याला बॅट बदलण्याचा आग्रह केला पण, डेनिस कुणाचेच ऐकायला तयार नव्हता.
शेवटी त्याच्यावरील दबाव वाढल्यावर त्याने हातातील बॅट चक्क फेकून दिली. त्याचा तो अवतार पाहून सर्वचजण चकित झाले होते. पण, खेळाडूंच्या अशा वागण्याने खेळ खेळ न राहता एक स्पर्धा होऊन जाते जी ईर्षेला जन्म देते. खेळातील खिलाडूवृत्ती नाहीशी होते. जिंकण्याची जिद्द असणे वेगळे आणि फक्त जिंकण्यासाठी म्हणून खेळातील नियमांनाही धाब्यावर बसवणे वेगळे. पण क्रिकेटमधे या गोष्टी तर आपण अनेकदा अनुभवल्या आहेत.
आजपर्यंत ॲशेसच्या अनेक मालिका झाल्या आहेत ऑस्ट्रेलियानेही अनेकदा ही मालिका जिंकली आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्यालेडी जेनेट क्लर्कने राख घालून दिलेला तो कलश मात्र इंग्लंडच्याच ताब्यात आहे. विशेष म्हणजे एखाद्या दुर्मिळ वस्तूप्रमाणे या कलशाचे जतन केलेले आहे. हा कलश जास्त हाताळल्याने कदाचित फुटेल म्हणून तिला लॉर्डसच्या मैदानातच बंदिस्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. ॲशेस मालिकेत विजयी होणाऱ्या या संघाला या ॲशेस कलशाची प्रतिकृती भेट दिली जाते.
खरा कलश मात्र इंग्लडसाठी जणू काही खूपच मौल्यवान वस्तू आहे. कदाचित या खरोखरच्या राख भरलेल्या कलशाकडे पाहून इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण होत असेल. त्यातून त्यांना जास्तीची स्फूर्ती मिळत असेल. तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या मालिकेची सुरुवात अशा पद्धतीने झाली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.