आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण चालू होते, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करत होते. तेव्हा एक अंध वयोवृद्ध महिला राष्ट्रपतींच्या समोर उभी राहिली, त्या महिलेला राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
ती महिला राष्ट्रपतींना म्हणाली की, “मी माझ्या मुलींच्या पाठीशी उभी राहणार नाही तर कोण राहणार? त्यासाठी मला पुरस्काराची काय गरज?” तिच्या या वाक्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ती महिला आपल्या जागी येऊन बसली.
त्या महिलेचं नाव आहे मुक्ताबेन दंगली.
पद्मश्री हा त्यांना मिळालेला दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे, ह्या आधी त्यांना २००१ साली नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुजरातमधील अंध महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केल्यामुळे हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला होता. १९९५ साली दंगली यांनी आपल्या पतीसोबत प्रज्ञाचक्षु महिला सेवा कुंजची स्थापना केली होती.
ही गुजरातमधील सुरेंद्र नगर येथील एक ना नफा तत्त्वावर काम करणारी संस्था असून अंध मुलींना अन्न, निवास आणि शिक्षण देण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं.
आतापर्यंत या ५८ वर्षीय महिलेने २०० च्या आसपास अंध मुलींना नवीन आयुष्य प्रदान केलं आहे. इतकंच नाही तर संस्थेच्या माध्यमातून मुक्ताबेन ३० निराधार वयोवृद्धांची आणि २५ च्या आसपास विकलांग लोकांची सेवा सुश्रुषा देखील करत आहेत.
वयाच्या ७व्या वर्षी मुक्ताबेन यांना मज्जातंतूच्या विकाराने पछाडलं. यात त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली होती. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील अंकाडिया नाना नामक एका गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आई वडील हे गरीब परिस्थिती असल्यामुळे मुक्ताबेन यांना शिकवण्याचा बाबतीत फार उदासीन होते.
परंतु मुक्ताबेन यांच्या मनात शिकण्याची प्रचंड इच्छा होती. त्यांना कळून चुकलं होतं की शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाच उन्नतिचा मार्ग नाही. त्यांनी आपल्या पालकांना विनंती करुन भावनगरच्या अंध मुलांच्या उद्योग शाळेत प्रवेश घेऊन देण्याची मागणी केली.
शाळेत शिक्षण घेत असतांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. त्यावेळी त्यांचं वय १४ वर्षे होतं. सुट्टी करून त्या पुन्हा शाळेत परतल्या होत्या पण तिथे त्यांना लक्षात आलं की त्यांची एक प्रिय मैत्रीण अजूनही परतली नव्हती. जेव्हा शाळेने तपास केला तेव्हा समोर आलं की त्यांच्या मैत्रिणीला जाळून मारून टाकण्यात आलं होतं.
या घटनेचा खूप मोठा आघात त्यांच्या मनावर झाला होता. त्यांची मैत्रीण घरी होत असलेल्या अन्यायाची नेहमी तक्रार करायची. त्यांच्या मैत्रिणीला घरी जनावरासारखी वागणूक दिली जात होती. बऱ्याचदा त्या मैत्रिणीला खुराड्यात झोपावं लागत असे.
त्या मैत्रिणीच्या अशा जाण्याने मुक्ताबेन स्वतःला सावरू शकल्या नाहीत. पण त्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय त्या क्षणी गवसलं होतं. त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं की निराधार अंध मुलींचा आधार बनायचं. त्या स्वतःला भाग्यशाली समजत की त्यांच्यावर इतके प्रेम करणारे आई वडील आणि मित्रपरिवार मिळाला होता. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना एक ओझं असल्यासारखी वागणूक दिली नाही म्हणून त्या त्यांच्या आई वडिलांचे आभार मानतात.
अंध मुलींच्या आयुष्याला उभारी देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. एक निवासी विद्यालय उभारून त्या अंध मुलींचा आधार बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली होती.
सुदैवाने त्यांच्या नशिबाची गाठ देखील अशाच व्यक्तीशी बांधली गेली होती ज्याला त्यांच्या प्रमाणेच समाजहिताचा ध्यास होता.
८० च्या दशकात जेव्हा लग्न हे मुलीच्या आयुष्यातील सर्वस्व समजलं जायचं तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यात पंकज आले आणि ते विवाहबद्ध झाले. १९९५ साली या जोडप्याने अंध मुलांची शाळा उघडली. त्या अगोदर हे जोडपे अंध मुलांच्या शाळेत १२ वर्ष शिकवण्याचं काम करत होते. आपल्या शाळेसाठी त्यांनी चार अंध मुलींना दत्तक देखील घेतले. सुरेंद्रनगरमधील आपली शाळा चालवत असताना ते आपले मित्र, नातेवाईक आणि आप्तस्वकीय यांच्या कडून शाळेसाठी निधी देखील गोळा करत होते.
१३ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी अखेरीस पाच एकरच्या जमिनीवर पहिली निवासी शाळा सुरु केली. यासाठी त्यांना विविध संस्था, संघटना, कॉर्पोरेट कंपन्या यांच्याकडून अर्थसहाय्य घ्यावं लागलं.
आज या शाळेच्या प्रशस्त परिसरात एक पहिलीपासून बारावी पर्यंतचं शिक्षण देणारी शाळा असून एक विश्रामगृह, एक संगीत शाळा, एक संगणक शाळा, वसतिगृह, सभागृह, मैदान, शिवाय निराधार जेष्ठ नागरिकांसाठी घरं देखील आहेत.
महाविद्यालयीन अंध विद्यार्थिनीसाठी देखील या परिसरात वसतिगृह उभारण्यात आले आहे. यातील राहण्याची आणि खाण्याची सर्व जबाबदारी मुक्ताबेन दंगली बघतात. या ठिकाणी विद्यार्थिनीना गृह-विज्ञान, शिलाई आणि कॉम्प्युटर वापराचे प्रशिक्षण दिले जाते. याबरोबरच स्वयंपाक तयार करणे, संवाद कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य यांचे देखील प्रशिक्षण या शाळेत दिले जाते.
वयाच्या दुसऱ्या वर्षी या शाळेत प्रवेश घेतलेल्या अनेक मुली आज स्वयंरोजगारासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यातील कौशल्य विकासाचे श्रेय त्या या शाळेला देतात. ज्या विद्यार्थिनींचे शिक्षण संपले, त्यांच्या पालकांची परिस्थिती चांगली नसेल तर त्यांच्या विवाहाची देखील सोय देखील मुक्ताबेन करतात. मुलाची परिस्थिती बघून मुलीचं आपल्या स्वतःच्या पाल्या प्रमाणे लग्न मुक्ताबेन लावून देतात. बऱ्याच मुलींसाठी जोडीदार शोधण्याचं काम देखील या संस्थेमार्फत केलं जातं.
या शाळेत विद्यार्थिनींना स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याची पुरेपूर संधी मुक्ताबेन उपलब्ध करून देतात. या ठिकाणी पाक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. राज्यस्तरावर यश प्राप्त केलेली महिला क्रिकेट टीम यांच्या शाळेची आहे.
दहा वर्षांपूर्वी या शाळेचं उद्घाटन केल्यानंतर मुक्ताबेन आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अनेक अंध मुलींच्या आयुष्यातील अंध:कार त्यांनी दूर सारला आहे. त्यांच्या सारख्या कर्मयोगी स्त्रीला आमचा सलाम!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.