आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे दीडशे वर्षांहून अधिककाळ या देशावर ब्रिटीशांची मक्तेदारी होती. त्या काळात फक्त भारतच नाही तर जगातील अनेक देश या वसाहतवादी, साम्राज्यशाही सत्तेचे गुलाम होते. म्हणूनच ब्रिटीश राजवटीत सूर्य कधीच मावळत नाही, असे म्हटले जायचे.
वसाहतवादी साम्राज्यशाहीने त्याकाळी अर्धे अधिक जग व्यापले होते. भारतात ज्याप्रमाणे स्वातंत्र्यासाठी लढाई सुरु होती, त्याच पद्धतीने अनेक देशांत साम्राज्यशाही, दडपशाही आणि हुकुमशाहीविरोधात लढाया सुरु होत्या.
याच काळात घडलेल्या महायु*द्धांमध्ये निष्पाप नागरिक भरडले जात होते. एकूणच जागतिक पटलावरील हा काळ प्रचंड अंधाधुंदी आणि अशांततेचा होता.
अशा काळात फक्त स्वदेशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवमुक्तीची मशाल पेटवणारे काही भारतीय होते, ज्यांना आपल्या मुक्तीत इतरांच्याही मुक्तीची बीजे रोवली असल्याचा साक्षात्कार झाला.
म्हणून तर, नेताजी सुभाषचंद्र बोस देखील भारताच्या स्वातंत्र्यासाठी आधी रशियाची मदत घेण्यासाठी मॉस्कोत आणि नंतर थेट जर्मनीत पोचले.
याच विचारांनी प्रेरित झालेल्या काही भारतीय तरुणांनी स्पेन मधील फॅसिझमविरोधातील लढाईतही आपले योगदान दिले. स्पेनमध्ये त्याकाळी फ्रान्सिस्को फ्रँकोच्या फॅसिस्टवादी सत्ता होती. त्याला जर्मनच्या हि*टल*र आणि इटलीच्या मुसोलिनीचा पाठींबा होता.
फ्रँकोच्या जुलमी राजवटीपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी आणि स्पेनमध्ये गणराज्य स्थापन व्हावे या हेतूने जगभरातील तरुण विशेषत: ब्रिटनमधील तरुण देखील काही धडपड करत होते. त्याच काळात गोपाल मुकुंद हुद्दार इंग्लंडमध्ये पत्रकारितेतील उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी अनेक जागतिक नेते हे स्पॅनिश रिपब्लिकनच्या लढाईत जगभरातील नागरिकांनी जमेल ते सहकार्य करावे यासाठी आवाहन करत होते. या आवाहनाचा मोठा प्रभाव हुद्दार यांच्यावर पडला आणि त्यांनी स्वतः स्पेनसाठी लढण्याची तयारी दाखवली.
भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फक्त भारतातूनच ब्रिटीशांना हद्दपार करणे पुरेसे नसून जगभरातील वसाहतवादी साम्राज्यांना परत पाठवणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून भारतीय वंशाची ओळख लपवण्यासाठी हुद्दार ऐवजी जॉन स्मिथ या नावाने ते इंटरनॅशनल ब्रिगेडमध्ये सामील झाले.
१७ ओक्टोंबर १९३७ रोजी अब्राहम लिंकन ब्रिगेड या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौदाव्या ब्रिगेडमध्ये ते रुजू झाले.
११ फेब्रुवारी १९३८ रोजी हुद्दार यांना उत्तर स्पेनमधील टार्झोना शहरात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. काही महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना गांदेसा शहराच्या रक्षणासाठी चौदाव्या ब्रिगेडमार्फत लढाईवर पाठवण्यात आले. या दरम्यान फ्रँकोच्या सैनिकांनी त्यांना कैद करून तुरुंगात डांबले. फ्रँकोच्या कैदेत असणारे ते एकमेव भारतीय होते.
१९३८ च्या शेवटच्या काही महिन्यात फ्रँकोने कैद केलेल्या ब्रिटीश सैनिकांना सोडवून मायदेशी परत आणावे यासाठी ब्रिटीश सरकारवर देशातील नागरिकांचा दबाव वाढत गेला. या तरुणांना सोडवून आणण्यासाठी एक ब्रिटीश टीम स्पेनला पाठवण्यात आली ज्यामध्ये एका निवृत्त कर्नलचा समावेश होता ज्याने पूर्वी नागपूर परिसरात सेवा बाजवली होती.
कर्नलने भारतीय असणाऱ्या हुद्दार यांना आपली खरी ओळख उघड करण्यास भाग पाडले. परंतु, कर्नलने त्यांचे नाव ब्रिटीश कैद्यांच्या यादीतून न वगळता त्यांची देखील कैदेतून सुटका केली.
उच्च शिक्षणासाठी मायदेश सोडून इंग्लंडला जाण्यापूर्वी हुद्दार यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. पण,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फक्त हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करत असल्याने त्यांचे बंडखोर विचार आरएसएसच्या हिंदू राष्ट्रवादाशी जुळत नव्हते.
मग त्यांनी आरएसएसपासून फारकत घेत, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जमवण्याच्या उद्देशाने बालाघाट लुटीची योजना आखली पण, यात ते ब्रिटीश पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९३५ साली त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी एक मराठी साप्ताहिक सुरु करण्याचा देखील प्रयत्न केला.
१९३६ साली ते पत्रकारितेतील उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशाने इंग्लंडला पोचले. तिथे त्यांना स्पॅनिश जनतेच्या संघर्षाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली सहानुभूती जाणवली आणि ते स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यास सज्ज झाले.
भारतीय नागरिक ज्या हुकुमशाहीविरोधात संघर्ष करत होते, त्याचाच हा देखील एक भाग असल्याचे त्यांना जाणवले. ब्रिटीश वसाहतवाद्यांची सत्ता हिसकावून घेण्यासाठी ही लढाई गरजेची होती, असे त्यांना वाटले.
याकाळात त्यांच्या राजकीय विचारात देखील अमुलाग्र बदल झाले. हिंदू राष्ट्रवादाच्या प्रभावातून बाहेर आल्यानंतर ते कम्युनिस्ट विचारांकडे आकर्षित झाले. १९३८ साली ते इंग्लंडहून भारतात परत आले. त्यांच्या सन्मानार्थ बॉम्बे कॉंग्रेस सोशालिस्ट पक्षाने आणि बॉम्बे युनियनने सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, “स्पेनची स्वातंत्र्याची लढाई आणि भारतीय स्वातंत्र्य लढाई या दोहोंमध्ये एक साम्य आहे. स्पेनमधील नागरिक देखील त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत जसे आपण भारतीय आपल्या हक्कांसाठी लढत आहोत. स्पेनमधील आणि इटलीतील फॅसिस्ट सत्तेला खतपाणी घालणारी ब्रिटीश सत्ता आपल्याला देखील चिरडत आहे. म्हणूनच ही लढाई आपली आहे. स्पेनमध्ये ज्याप्रमाणे सामान्य कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्गीय एकत्र येऊन लढा देत आहेत, त्याचप्रमाणे आपण देखील एकत्र यायला हवे.”
१९४० मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील लढाईतील प्रत्यक्ष सहभाग आणि त्याकाळातील अनुभवांनी त्यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा खूप मोठा प्रभाव पडला होता.
शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी त्यांनी आपले योगदान देणे सुरु ठेवले. नागपूर परिसरातील ते अत्यंत लोकप्रिय पुढारी होते.
१९५२ पर्यंत त्यांनी कम्युनिस्ट पक्षात काम केले त्यांनतर आरोग्याच्या कारणाने त्यांनी सक्रीय राजकरणातून निवृत्ती घेतली. परंतु, त्यांना कम्युनिस्ट विचारांबद्दल असलेली आपुलकी आणि कम्युनिस्ट चळवळीशी असलेले ऋणानुबंध कायम जपले.
१९७२ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बर्धन यांचे एक सहकारी बर्लिन भेटीवर गेले होते. तिथे त्यांची भेट एका ज्येष्ठ जर्मन ब्रिगेडीयरशी त्यांची भेट झाली, ज्यांनी इंटरनॅशनल ब्रिगेडमध्ये सेवा बजावली होती. त्या जर्मन ब्रिगेडीयरने हुद्दार यांच्यासाठी आठवणीने थालमन बटालियनचे एक बॅज भेट दिले.
ही भेट देण्यासाठी बर्धन जेंव्हा हुद्दार यांच्या घरी गेले तेंव्हा त्या जर्मन ब्रिगेडीयरने हुद्दार यांची आठवण ठेवल्याबद्दल हुद्दार यांना अतिशय आनंद झाला. तीन दशकानंतर ही त्यांनी आठवणीने दिलेली ही भेट हुद्दार यांच्या साठी आश्चर्याचा एक सुखद धक्का होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.