आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अभिजित बिनायक बॅनर्जी, एस्थर डूल्फो आणि मायकल क्रेमर या अमेरिकन अर्थतज्ञांना २०१९ साली जगप्रसिद्ध अशा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश सोसायटीकडून आल्फ्रेड नोबेल यांच्या सन्मानार्थ दिला जातो.
यांपैकी अभिजित बॅनर्जी हे मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. ते आता अमेरिकेतल्या प्रसिद्ध मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनल द्वारा नियुक्त प्राध्यापक आहेत.
अभिजित बॅनर्जींचा जन्म २१ जानेवारी १९६१ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या आईचं नाव हे निर्मला तर वडिलांचं नाव दीपक बॅनर्जी होतं. त्यांच्या आई निर्मला सेंटर फॉर स्टडिंग सोशल सायन्सेसमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या, तर वडील हे कोलकात्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
अभिजित बॅनर्जी यांचं अर्थशास्त्राचं पदवीपर्यंतचं शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आणि कोलकाता विद्यापीठात झाले. पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेले. पुढे त्यांनी १९८८ साली अमेरिकेतल्या बहुप्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेतले.
पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातच अर्थशास्त्र विषय शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर ते प्रिस्टन विद्यापीठात कार्यरत झाले. आज ते अमेरिकेच्या मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजी येथे फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलचे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. येथेच त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा आभ्यास केला.
त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू हा अर्थशास्त्रातील ‘डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स’ ही शाखा होती. एस्थर डुफ्लो, मायकल क्रेमर, जॉन.ए. लिस्ट. आणि सेंधील मुललीनाथन, या अर्थशास्त्रज्ञांचा सोबतीने त्यांनी फिल्ड एक्सपेरीमेंटस या अर्थशास्त्राच्या महत्त्वपूर्ण कार्यपद्धतीच्या माध्यमातून अर्थशास्त्रीय नियमांचे गुंतागुंतीचे संबंध समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
२००४ साली अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये त्यांची निवड झाली. २००९ साली त्यांना अर्थशास्त्राच्या समाजशास्त्र क्षेत्रातील इन्फोसिस पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
२०१२ साली त्यांना त्यांच्या ‘प्युअर इकॉनॉमिक्स’ या पुस्तकासाठी प्रतिष्ठित असा जेराल्ड लोएब पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी आणि सोबतच नोबेल विजेत्या एस्थर डुफ्लो यांना देखील विभागून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
२०१३ साली त्यांची निवड संयुक्त राष्ट्रांच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सच्या एका पॅनल वर करण्यात आली होती. २०१५ ला ते त्यातून निवृत्त झाले.
‘किल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी’कडून त्यांना २०१४ ला बेरहार्ड हर्म्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९ साली त्यांनी एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाच्या ३४ व्या वार्षिक संमेलनात प्रमुख भाषण केले होते.
भारत आणि विकसनशील देशातील गरिबी हा त्यांचा आभ्यासाचा विषय असून जागतिक गरिबी निर्मूलनासाठीचे अर्थतज्ञ उपाय शोधताय त्यांच्यापैकी अभिजित बॅनर्जी एक आहेत.
अभिजित यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी व नोबेल विजेत्या एस्थर डुफ्लो यादेखील कार्यरत आहेत. त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत पॉव्हर्टि क्रयसिस मॅनेजमेंटच्या प्राध्यापक आहेत. दोघींचे या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारी आहे.
अभिजित यांनी २०११ साली अरुंधती टुली यांच्याशी विवाह केला होता, त्यांना एक मुलगा देखील होता पण २०१३ साली ते विभक्त झाले. २०१५ साली अभिजित यांनी एस्थर डुफ्लो यांच्याशी लग्न केले.
अभिजित हे माजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचे शिष्य असून, वेगवेगळ्या विषयांत त्यांनी एकत्र काम केले आहे. जागतिक गरिबी संपवण्यासाठी महत्वपूर्ण संशोधक म्हणून अभिजित ओळखले जातात.
भारतीय गरिबी निर्मुलनावर अभिजीत यांचा विशेष आभ्यास आहे. भारताच्या गरिबी निर्मुलनासाठी त्यांनी काही महत्त्वपुर्ण उपाय देखील भारत सरकारला सुचवले होते.
अभिजित बॅनर्जी हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांची चिकित्सा करत, त्यावर टीका करत असतात.
अभिजित बॅनर्जी यांच्या मते, भारतीय पंतप्रधान कार्यालयाच्या अवाजवी अडवणुकीच्या धोरणामुळे मनरेगासारख्या असंख्य गरिबांच्या उत्थानासाठी असलेल्या योजना बारगळल्या असून नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयांमुळे व त्यांच्या गैरव्यवहार्यपणे केलेल्या अंमलबजावणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागलं.
अभिजित बॅनर्जी यांच्या मते, पब्लिक सेक्टर बँकिंगचे संचलन करण्याची चूक भारत सरकारने नको करायला. भारतीय राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाचं ते समर्थन करतात. अभिजित यांच्या मते, मनरेगाचं पुनरुत्थान करून आणि जास्तीत जास्त पैसा भारतीय लोकांच्या हातात कसा पडू शकेल, यानुरुप अर्थव्यवस्थेची रचना करण्यात आली तर भारतातील गरीब जनतेचे कल्याण होईल.
सध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेप्रती ते चिंताग्रस्त असून, सध्याची आर्थिक परिस्थिती कायमी राहिल्यास, भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या हितासाठी दूरगामी निर्णय अत्यावश्यक असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. त्यांनी मीडिया व इतर संस्थांनांच्या स्वातंत्र्याचा मुद्द्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अशाप्रकारे अभिजित बॅनर्जी या जागतिक कीर्तीच्या गरिबी निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱ्या अर्थसंशोधकाला अर्थशास्त्राचे नोबेल मिळणे, निश्चितच त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव आहे.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.