आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मसान हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याला राष्ट्रपती ॲवार्डही मिळाला. मसानची केलेली प्रभावी मांडणी, जबरदस्त गाणी, सुंदर सिनेमॅटोग्राफी, सक्षमपणे भूमिका पेलणारी पात्रं, हे सगळंच नितांत सुंदर आहे. याहीपेक्षा तो आवडतो तो वास्तववादी ॲप्रोचमुळे.
इथल्या जातव्यवस्थेच्या कानफडीत मारणारा हा चित्रपट ‘निरज घायवाल’ या मराठी माणसाने दिग्दर्शित केला आहे.
मृत्यू, प्रेम, विरह, दु:ख, विद्रोह आणि बरचं काही उलगडून दाखवणारा हा प्रगल्भ आणि आशयघण मांडणी असलेला चित्रपट. कितीदाही हा सिनेमा पहिला तरी दर वेळेस सगळी पात्र तेवढीच अंगावर येतात. शेवट दर वेळेस चटका लावतो आणि दिलासाही देतो.
कमला संजय मिश्राचा त्रिपाठी आणि विनीत कुमारचा चौधरी हे दोन्ही संस्कार आणि परंपरेत गुरफटलेले बाप खूपच अस्वस्थ करतात. दोघांनी आपल्या मुलांसाठीच आतून तुटणं अफलातून दाखवलंय. बाकी दलित आणि अतिमागास जातीला केंद्रस्थानी ठेवून गेल्या काही वर्षांत आलेल्या सिनेमांच्या दर्जाचा विचार केला तर मसानचा विचार सोडून चालत नाही.
स्वानंद किरकिरेचं,
“तू किसी रेलसी गुजरती है!
मै किसी पुलसा थरथराता हू!”
रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केल्याशिवाय राहत नाही. काँन्फिडंट शालू आणि नेहमीच डिप्रेेस्ड असणारी देवी दोन समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ज्यात सामाजिक परिस्थिती माणसावर किती परिणाम करते हे नायिंकेच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सवरून प्रभावीपणे मांडल गेलयं.
कथानकाच्या सुरूवातीला, आपल्या विचारांच्या तंद्रीत हरवलेली ‘ती’ तुमच्या नजरेसमोर येते, जी अचानक काहीतरी आठवल्यासारखं करते. तत्परतेने आपलं रूपडं आरशात न्याहाळते. केसांना घट्ट बांधून, घराला कुलूप घालून पंजाबी ड्रेस आणि बँगसह घराबाहेर पडते.
काही वेळात सार्वजनिक बाथरूम्समध्ये अंगावरचा ड्रेस बदलून साडी नेसून बाहेर रस्त्यावर चालू लागते. तिची ही ड्रेस ते साडीवर.. येण्याची प्रक्रिया आपल्या सामाजिक मानसिकतेला पहिला हादरा देते.
सामाजिक आकलनानुसार ड्रेसवरच्या मुली लग्न झालेल्या नसतात, म्हणून त्यांच्या सोबतं कोणी पुरूष दिसला की समाजाला विकृत वाटत राहतं उगाचच.. म्हणून तिने साडी घातलीय, या सामाजिक समजूतींना जोपासतं विद्रोह करताना हॉटेलमधल्या रूममध्ये गेल्यानंतर आपल्या भावना समजावून घेत देवी आणि पियुषचा चालेलला प्रणय… यादरम्यान मध्येच पोलिसांची झालेली एंट्री… पोलिस इंन्सपेक्टरच्या भूमिकेतील भगवान त्रिपाठीची पोलिस व्यवस्थेचं वास्तव चित्रण करणारी भूमिका.
देवीचा तो पोलिस काढत असलेला व्हीडीओ. सोबतच पियुष अग्रवालला दिल्या जाणाऱ्या धमक्या…. या अनपेक्षीत प्रकाराने घाबरून गेलेल्या, बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतलेल्या त्याने घाबरून केलेली आत्मह*त्या…
त्यानंतर बनारस घाटावर मर्तिकीचं सामान विकून उदरर्निवाह करणाऱ्या रिटायर्ड अध्यापक असणाऱ्या बापाची मुलीच्या सुटकेसाठी चाललेली धडपड… तीन लाख गोळा करताना त्याला करावा लागणारा जीवाचा आटापिटा… पोरीनं लैंगिक इच्छांच्या पुर्ततेसाठी स्वत:च्या वाटेत किती काटे परेलेत, या विचाराने पोखरलेला बाप त्या दिवशी भरलेल्या ताटात, हात धूवून न जेवताचं उठतो…
तेव्हा बाप नावाचा हळवा कोपरा स्पर्शून जायला हा सिन पुरेसा वाटतो. नंतर संतापाने अनावर होत, मुलीच्या कानामागे ओढणारा बाप… आणि नंतर स्वत:च रडत बसणारा हतबल पुरूष…
हा प्रवास उत्तमपणे साकारताना, ‘विद्याधर पाठक ‘ यांनी मसानमधील बापाचा रोल बापपणे साकारलाय. त्यामुळे तो दर्शकांच्या मनाला स्पर्शून जातो.
आपल्या जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू पाहणारे लोक सहसा लवकर सावरत नाहीत. देवीच्या मनातील पियुषच्या मरणाबाबतचा हळवा कोपरा तिच्या नजरेच्या कोपऱ्यातून ते तिच्या प्रत्येक धडपडीतून आपल्याला जाणवत रहातो. त्याच्या मृत्यूनंतर ती तो विषय तिथेचं सोडून द्यायचा, अशा सर्वसामान्य भूमिकेने वागत नाही.
ती त्याच्या घराचा शोध घेते. त्याच्या घरी आर्थिक मदत करू पाहते. सरकारी नोकरी मिळवते. पियुषच्या घरी जावून येते. त्याच्या बापाच्या दु:खाचा, रागाचा सामना करते.
पियुषने दिलेलं गिफ्ट गंगाकिनारी विसर्जित करून शेवटचा हुंदका देते… आणि येथून पुन्हा तिच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरूवात होते… ही देवीच्या भूमिकेतील रिचा चड्डा मनावर शेवटपर्यंत अधिराज्य करते.
ती परिस्थितीपासून दूर पळ काढणं शिकवतं नाही… भिडणं शिकवते… चूका मान्य करून पुढची वाट तुडवणं जाणते. तिने सक्षमपणे ही भूमिका पेलली त्यामुळे चित्रपटाला एक वेगळाचं आयाम प्राप्त झालाय.
बनारस घाटावर राहणाऱा डोम हा मागास समाज. माणसांच्या अंत्यविधीला जगण्यासाठीचा सोहळा समजून विकलं जाणारं तिथलं मर्तीकीचं सामानं. जगण्यासाठी मरणाच्या विधींची बनवलेली ही बाजारपेठ.
छोट्या मुलांकडून नदीच्या प्रवाहातून नाणी सापडून घेवून, त्यावर लावला जाणारा सट्टा.. इथल्या मुलांच्या बालपणाचं चित्र स्पष्ट करुन जातो. याच भागात राहून सिव्हील इंजिनियंरिंगचं शिक्षण घेणारा, दिपक.
विकी कौशलने साकारलेली दिपकची भूमिका प्रभावी ठरते. आपल्याला आवडलेल्या मुलीचं नाव शोधून काढायला मित्राद्वारे, फेसबुकच्या माध्यमातून केलेला प्रयत्न.. नंतर मेसेंजरच्या माध्यमातून मैत्रीत्वाची प्रथम पायरी साध्य करणं.. नंतरच्या सातत्याने होणाऱ्या भेटीगाठी. या दरम्यान बहरणारं प्रेम.
“माझे आईबाबा जुन्या विचारांचे आहेत, ते तुला स्विकारणार नाहीत. पण पळून जावं लागलं तर पळून येईल. तू मात्र शिक. जॉब मिळव. सेटल हो.”
असं कळकळीनं सांगणारी, परंपरेने दिलेले उच्चनिच्चतेचे जातीय साखळदंड तोडून मुक्तपणे आपल्या प्रेमाला न्याय देण्याचं स्वप्न पाहणारी शालू. पिलग्राम ट्रिपच्या दरम्यान बस अपघातात झालेला तिचा मृत्यू. नंतर या अपघातात मरण पावलेल्या सगळ्यांचा एकत्रितपणे याच बनारस घाटावर केलं जाणारं अंतिम क्रियाकर्म.
झोपलेल्या दिपकला प्रेतं जाळण्यासाठी उठवणारा बाप… या प्रेतांना ज्वाला देताना, एक आपलासा वाटणारा हात… त्या हातातील आपल्या प्रियसीसारखी अंगठी..
ही आपली शालू नाही…या खात्रीसाठी तोंडावरचं कापड काढल्यानंतर विस्तव बनून जाळणारं वास्तव… रात्रभर तिच्या जळणाऱ्या प्रेताला राखणदारी करणारा प्रियकर… ढासाळलेल्या अवस्थेत, आपल्या आत दाबून ठेवलेल्या दु:खाला वाट मोकळी करून देण्यासाठी मित्रांच्या कुशीत ढसाढसा रडणारा दिपकचा सिन काळजाला चर्रर्र करतो.
‘साला..ये दु:ख काहे खतम नही होता…’ ही एक लाईन नायकाच्या मनातील ठसठसणारं दु:ख प्रभावीपणे मांडून जाते… आयुष्य संपल्यासारखी परिस्थिती तयार झाल्यावर विमनस्क झालेला नायक, पुढे ढासळलेल्या घराला सावरण्यासाठी स्वत:ला सावरण्याचा त्याचा प्रवास..आणि शेवट, सगळं मनाला स्पर्शून जाणारं….
एका पायरीवर बसवून समता शिकवणारं… जळून भग्न झालेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना बाजूला सारत, पुन्हा एकदा आयुष्याचा प्रवास करायला प्रवृत्त करणारं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.