आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बॉलिवूडचे शो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले मुक्ता आर्टसचे सर्वेसर्वा सुभाष घई आज (२४ जानेवारी २०२३ रोजी ) ७९ वर्षांचे झाले. गेली अनेक दशके उत्तमोत्तम चित्रपट देऊन त्यांनी चित्रपट रसिकांचे मनोरंजन केले आहे. कालिचरण, कर्ज, हिरो, मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, ताल, यादें, इकबाल यांसारखे सुपरहिट चित्रपट सुभाष घईंनीच दिले आहेत.
तुम्हाला माहितेय का?, सुभाष घईंचा पहिला यशस्वी चित्रपट “आराधना” हा होता आणि त्यात त्यांनी एक छोटीशी सहाय्यक भूमिका केली होती.
सूरज सक्सेना म्हणजेच राजेश खन्ना यांच्या मित्राची म्हणजेच “प्रकाश”ची भूमिका साकारणारे दुसरे तिसरे कुणी नसून सुभाष घई होते.
आराधना बरोबरच त्यांनी उमंग नावाच्या चित्रपटात देखील भूमिका केली होती.
सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी नागपूर येथे झाला. सुभाष घईंचे वडील हे दंतवैद्य (डेंटिस्ट) होते आणि ते दिल्ली येथे प्रॅक्टिस करत असत. सुभाष घई यांनी हरियाणामधील रोहतक येथून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
त्यांना लहानपणापासून सिनेमाविषयी आकर्षण होते, आणि त्यातच करियर करण्याची इच्छा होती.
त्यांनी कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर त्यांनी सिनेमाचे तंत्रशुद्ध शिक्षण पुणे येथील विख्यात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून घेतले.
FTII मधून शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांचे नशीब अजमावण्यासाठी मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर प्रत्येक नवोदिताला जसा स्ट्रगल करावा लागतो तसाच स्ट्रगल त्यांनाही करावा लागला.
सिनेमा मेकिंगचे शिक्षण आणि FTII सारख्या ख्यातनाम संस्थेतून मधून मिळवलेली पदवी असून देखील त्यांना सुरुवातीला फिल्म स्टुडिओमध्ये साधा प्रवेशसुद्धा मिळाला नाही.
पण त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि कट थ्रोट स्पर्धेत टिकाव धरणे सोपे जावे म्हणून त्यांनी सेल्फ हेल्पवरील पुस्तकांचे वाचन करणे सुरु केले. डेल कार्नेजी या लेखकाचे “हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्ल्यूएंस पीपल” हे पुस्तक वाचून त्यांना खूप फायदा झाला.
त्यांनी या पुस्तकात दिलेल्या क्लृप्त्यांचा वापर करून सिने इंडस्ट्रीमध्ये शिरण्याचे आणि तिथे स्थान मिळवण्याचे प्रयत्न करणे सुरु केले. त्याच दरम्यान त्यांना युनायटेड प्रोड्युसर्स फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्टची माहिती मिळाली. त्यात त्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेत एकूण पाच हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्यातून फक्त तीन लोकांची निवड करण्यात आली.
ते तीन लोक म्हणजे राजेश खन्ना, धीरज कुमार आणि सुभाष घई होते. या स्पर्धेत विजेते म्हणून निवड झाल्यानंतर राजेश खन्ना ह्यांना लगेच ब्रेक मिळाला. पण सुभाष घई यांना वर्षभराने संधी मिळाली.
सुभाष घई यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याची सुरुवात एक सहाय्यक अभिनेता म्हणून केली. १९६७ साली आलेल्या तकदीर या चित्रपटात त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती.
त्यानंतर त्यांना १९७१ सालच्या आराधना या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९७० सालच्या उमंग तसेच १९७६ सालच्या गुमराह या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती पण हे चित्रपट कधी आले कधी गेले हेच कळले नाही.
त्यांना ॲक्टिंगची आवड असली तरी त्यांनी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आणि १९७६ सालच्या कालिचरणच्या हिट चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित करावा अशी शत्रुघ्न सिन्हा यांची इच्छा होती आणि त्यांनीच निर्मात्यांकडे सुभाष घईंच्या नावाची शिफारस केली होती. १९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनयसम्राट दिलीप कुमार यांच्याबरोबर त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले.
विधाता, कर्मा, सौदागर हे त्यापैकी काही चित्रपट होत. सौदागरसाठी सुभाष घई यांना १९९२ साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
त्यांची एक खासियत होती की त्यांनी जे जे चित्रपट दिग्दर्शित केले, त्यात ते काही क्षणांसाठी दर्शन देत असत.
१९८३ साली आलेल्या हिरो चित्रपटातून त्यांनी जॅकी श्रॉफ ह्यांना चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. ह्या चित्रपटांतील गाणी आजही लोकांच्या मनात आहेत. त्यांनीच अनिल कपूर ह्यांच्या करियरचा ग्राफ मेरी जंग ह्या चित्रपटाद्वारे उंचावण्यास मदत केली.
जॅकी श्रॉफ, अनिल कपूर व सुभाष घई ह्यांच्या टीमने कर्मा, राम लखन, त्रिमूर्ती असे सुपरहिट चित्रपट दिले.
त्रिमूर्ती हा चित्रपट मुकुल आनंद ह्यांनी दिग्दर्शित केला होता आणि सुभाष घई हे त्या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांनी जॅकी श्रॉफ, अनिल कपूर ह्यांच्या बरोबर संजय दत्त ह्याचे करियर सुद्धा खलनायक चित्रपटाद्वारे सावरण्यास मदत केली. या चित्रपटातून संजय दत्तला एक नवी ओळख मिळाली.
१९९७ साली आलेल्या परदेस चित्रपटातून त्यांनी महिमा चौधरी आणि अपूर्व अग्निहोत्री या नवोदितांना चित्रपटसृष्टीत आणले.
त्यांचा १९९९ साली आलेला चित्रपट “ताल” हा तर ऐश्वर्या राय आणि त्यातील सुंदर गाण्यांसाठी आजही लोक आवडीने बघतात, त्यातील गाणी ऐकतात. परदेस आणि ताल हे दोन्ही चित्रपट भारतबाहेरसुद्धा प्रदर्शित झाले होते आणि हे दोन्ही चित्रपट सुपर-हिट होते.
पण त्यानंतर आलेले यादें आणि किसना हे दोन्ही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सपशेल पडले. त्यानंतर मात्र सुभाष घई यांनी दिग्दर्शनातून ब्रेक घेतला आणि त्यांनी चित्रपटनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले.
मुक्ता आर्टस्-च्या बॅनर खाली त्यांनी ऐतराझ, इकबाल, ३६ चायना टाऊन, अपना सपना मनी मनी हे चित्रपट निर्माण केले.
त्यांनी माधुरी दीक्षित, महिमा चौधरी, मनीषा कोईराला, मीनाक्षी शेषाद्री , जॅकी श्रॉफ, अनिल कपूर ह्यासारख्या अनेकांना संधी देऊन त्यांचे करियर घडण्यास मोलाचा हातभार लावला.
२००६ साली त्यांनी व्हिसलिंग वुड्स नावाची एक संस्था काढली. या संस्थेत विद्यार्थ्यांना चित्रपटनिर्मिती , दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, अभिनय, ॲनिमेशन ,हे सगळे शिकवण्यात येते.
दिग्दर्शनातून तीन वर्षे ब्रेक घेतल्यानंतर सुभाष घई यांनी २००८ साली ब्लॅक अँड व्हाईट या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले.
त्यानंतर युवराज हा चित्रपट देखील त्यांनी केला. पण हे दोन्हीही चित्रपट फारसे चालले नाहीत. सध्या सुभाष घई हे त्यांच्या संस्थेचे कामकाज बघण्यात त्यांचा सगळा वेळ व्यतीत करत आहेत. इतके सुपरहिट चित्रपट दिलेला हा निर्माता, लेखक, दिग्दर्शक सध्या मात्र चित्रपटनिर्मिती पासून लांब आहे.
त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. मागच्याच वर्षी त्यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानानिमित्त जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
नुकतेच ७९व्या वर्षात पदार्पण केलेल्या सुभाष घईंना चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान आहे. त्यांनी शून्यातून सुरुवात करून स्ट्रगल करून त्यांचे स्थान मिळवले आहे.
ते दिग्दर्शक म्हणून परत कधी चित्रपटरसिकांसाठी नव्या चित्रपटाची भेट आणतात ह्याची त्यांचे चाहते रसिक वाट बघत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.