आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
आपण नेहमी वृत्तपत्रात बातमी वाचत असतो की तमिळनाडूच्या मच्छीमारांना बऱ्याचदा श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात येते. बऱ्याचदा असं ही होतं की श्रीलंकेचे मच्छीमार भारताच्या हद्दीत घुसतात आणि त्यांना भारतीय नौदलाकडून अटक करण्यात येते.
हे सर्व घडून येतं ते श्रीलंका आणि भारताच्या मध्यभागी असलेल्या रामसेतूच्या परिसरातील समुद्रात!
यामुळे बऱ्याचदा भारताचे व श्रीलंकेचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. यात बऱ्याचदा भारतीय मच्छीमार व श्रीलंकेच्या नौदलाच्या चकमकी घडून येतात आणि मच्छीमारांचा जीव जातो.
अनेक भारतीय मच्छीमार वर्षानुवर्षे श्रीलंकेच्या जेलमध्ये शिक्षा भोगत बसतात आणि अनेक श्रीलंकेचे नाविक भारताच्या जेलमध्ये! मुळात तसं बघता ही समस्या इतकी गंभीर वाटत नसली तरी त्यामुळे आजवर बळी गेलेल्या लोकांची संख्या शेकडोच्या घरात असून, अनेक कुटुंबांची या समस्येमुळे राखरांगोळी झाली आहे.
दोन्ही बाजूच्या नाविक व मच्छीमार लोकांना याचा मोठा फटका बसला असून त्यांची आर्थिक स्थिती यामुळे खालावली आहे.
समुद्रात कुठलीही दृश्य सीमा नसल्याने, कुठल्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाला मर्यादा नसतात, समुद्रात फक्त काही विशेष रिजन्स असतात जे दोन देशांच्या सागरी सीमांना एकमेकांपासून वेगळं करतात.
त्या दरम्यानच्या प्रदेशाला जमिनीवरच्या ‘नो मॅन्स लँड’च्या धर्तीवर तो एक ‘नो फिशिंग झोन’ असतो. यात दोन्ही देशांना आपले जहाज आणण्यास मनाई असते.
प्रत्येक देशाची सागरी सीमा ही युनायटेड नेशन्सच्या मानांकनाच्या आधारावर ठरवली जात असते. यानुसार 200 सागरी मैलापर्यंत (200 nautical miles) प्रत्येक देशाला आपल्या आर्थिक क्षेत्राचा विकास करता येतो आणि त्या भागात मच्छिमारी करता येत असते.
अशा ह्या सागरी सीमा प्रत्येक देशात असतात. तशा श्रीलंका भारतादरम्यान आहेत. यावर वेळोवेळी दोन्ही देशांचे नौदल पहारा देत असते.
मग एक प्रश्न निर्माण होतो की जर सागरी सीमा ह्या आधीच निर्धारीत असतांना दोन्ही देशात या सागरी हद्दीतील घुसखोरीची प्रकरणं नेमकी का होतात ? यामागे एक मोठा इतिहास आहे तो आपण जाणून घेऊया..
१९६० साली, भारत सरकारने सागरी खाद्यसंपत्ती अर्थात सी फूडची निर्यात सुरू केली. या उद्योगाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी मच्छिमारांना मोठ्या प्रमाणवर सबसिडी देण्यास सुरुवात केली.
याचा परिणाम असा झाला की तमिळनाडूतील या मासळीच्या व्यापारावर मोठं भांडवल उभं केलं, यातून तमिळनाडूचे मच्छीमार श्रीमंत होऊ लागले. त्यावेळी भारत व श्रीलंकेच्या दरम्यान सागरी सीमांचे सुव्यवस्थित आरेखन झालेले नव्हते.
१९७० साली, भारत व श्रीलंकेने आपल्या सागरी सीमा सुनिश्चित केल्या. १९७४ ते १९७६ च्या काळात आपल्यातला सीमा करार केला, यानुसार आपल्या सागरी सीमा त्यांनी पाल्कची सामुद्रधुनी, मन्नारचे आखात व बंगालची खाडी या भागात सुनिश्चित केल्या.
ह्यावेळी भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी होत्या आणि श्रीलंकेचं नेतृत्व श्रीमावो बंदरनायके यांच्याकडे होतं.
यावेळी तमिळनाडूतील राजकारण्यांनी पाल्कच्या सामुद्रधुनीतलं काचाथिवुचं बेट श्रीलंकेला देण्याचा भारताच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला होता कारण यासाठी त्यांना विश्वासात घेण्याचा विचार भारत सरकारने केला नव्हता. तेव्हापासून या बेटाच्या सार्वभौमत्वावरून मोठ्याप्रमाणावर वाद सुरू आहेत.
सागरी हद्दी ठरल्यानंतर आठ वर्षांनी श्रीलंकेत गृहयुद्धाला सुरुवात झाली. तमिळ लिब्रेशन आर्मी अर्थात लिट्टे या तमिळ वंशाच्या विद्रोही गटाने श्रीलंकेच्या सरकारविरोधात १९८३ साली बंड पुकारले. या गृहयुध्दाच्या काळात उत्तर श्रीलंकेच्या भागातील मच्छीमार लोकांनी मासेमारी थांबवली होती.
या काळात श्रीलंकेने देखील आपल्या सागरी सीमेवर आवश्यक लक्ष घातले नाही. याचा परिमाण असा झाला की भारतीय मच्छिमार सीमेपल्याड येऊन मासे पकडू लागले.
मुळात पारंपरिक भारतीय मच्छीमार सीमा ओलांडून जाण्यामागे सर्वात मोठं कारण होतं, ते भारतीय सागरी सीमेत मोठ्या कंपनीच्या माध्यमातून चालवली जाणारी मासेमारी, या कंपन्यांच्या भल्यामोठ्या जहाजांमुळे आणि यंत्रणेमुळे सामान्य तमिळ मच्छीमारांना मासळीचा भारतीय सागरी हद्दीत तुटवडा जाणवू लागला.
यामुळे त्यांनी भारतीय हद्द ओलांडून श्रीलंकेच्या क्षेत्रात मासेमारी करण्यास सुरुवात केली. श्रीलंका तेव्हा गृहयुध्दात व्यस्त असल्याने त्यांना याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.
त्यामुळे ही सीमा ओलांडुन काचाथिवु बेटाच्या परिसरात भारतीय मच्छिमार मासेमारी करत होते.
पण, २००८ साली लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनला ठार करण्यात आल्या नंतर मात्र या भागात शांतता आली, गृहयुद्ध संपले आणि श्रीलंकेचे मच्छिमार समुद्रात उतरले.
जेव्हा त्यांनी मासेमारी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर भारतीय मच्छिमार श्रीलंकेच्या हद्दीत मासेमारी करतांना आढळून आले. यामुळे कलहाला सुरुवात झाली. श्रीलंकेचे नौदल समुद्रात उतरले त्यांनी भारतीय मच्छिमारांना पळवून लावले.
परंतु दिवसेंदिवस भारतीय हद्दीत मासेमारीसाठी बड्या कंपन्यांशी स्पर्धा करणे अवघड झाल्यामुळे या भारतीय मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडन्या वाचून दुसरा पर्याय उरला नाही, त्यामुळे त्यांनी सीमोल्लंघन चालूच ठेवले, यामुळे श्रीलंकेच्या नौदलासोबत त्यांचे वाद कायम राहिले.
२०१२ ते आजतागायत तब्बल १००० मच्छिमार श्रीलंकेच्या कैदेत आहेत, अनेकांची सुटका करण्यात आली असली, तरी अत्यंत वाईट परिणाम त्यांचा आर्थिक स्थितीवर झाला आहे. अनेक जण तर पुन्हा पुन्हा सागरी सीमा ओलांडून तिकडे मासे पकडायला जातात कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय शिल्लक नाही.
याचा जसा परिणाम भारतीय मच्छीमार लोकांच्या आयुष्यावर झाला आहे तसाच तो पलीकडच्या श्रीलंकेच्या मच्छिमार लोकांच्या आयुष्यावर देखील झाला आहे.
भारतीय मच्छिमारांनी काचिथावु द्विपाच्या परिसरात केलेल्या मासेमारीने तिथे मासे मिळत नसल्याची तक्रार लंकेतील मच्छीमार करत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे यामुळे वातावरण अधिक तणावग्रस्त बनले आहे.
खरंतर दोन्ही बाजूचे मच्छीमार हे आप्तेष्ट तमिळ वंशाचे असल्याने त्यांचे आपसांत वैर नव्हते. पण या मासेमारीमुळे दोन्ही भागात वैर निर्माण होत आहे.
या सगळ्या प्रकरणात मच्छिमारांना वाचवण्यासाठी म्हणून भारतीय तमिळ नेत्यांनी एक कायदा केला होता, त्यानुरूप बड्या कंपन्यांना समुद्राच्या तीन मैलापर्यंतच्या भागात मासेमारी निषिद्ध करण्यात आली होती जेणेकरून भारतीय मच्छीमार तिथे मासेमारी करू शकतील परंतु याची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्याने ही गोष्ट चिघळतच गेली.
आज या परिस्थितीसाठी स्थानिक नेते तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरतात ज्यांनी त्यांना विश्वासात न घेता महत्वाचं काचाथीवू द्वीप श्रीलंकेला देऊन टाकलं. त्यांच्या नुसार यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारत एकीकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त सी फूड निर्यात करणारा देश बनत आहे, अश्यावेळी कॉर्पोरेट फिशिंग, स्थानिक मच्छिमार, श्रीलंकेचं नौदल व मच्छिमार तसेच काचीथिवु द्वीप यांच्यात दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा हा संघर्ष भारतासाठी एक नवी डोकेदुखी ठरू शकते.
सध्यस्थितीत जेव्हा चीन हा श्रीलंकेला आपल्या बाजूने वळवून भारताला शह देऊ पाहत आहे, अश्या प्रसंगी भारताने गाफील राहून हा प्रश्न हाताळणे धोक्याचेच आहे. भारत श्रीलंकेचे मैत्रीपूर्ण संबंध बघता, यात होणारा संघर्ष भारताच्या पथ्यावर पडणारा नाही खासकरून हिंदी महासागरात दबदबा निर्माण करून ठेवण्याचा दृष्टीने तर मुळीच नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.