आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
विज्ञान हे माणसाला मिळालेलं एक वरदान आहे. जीवन सोपे करणारे यंत्राविष्कार असोत, वा आरोग्यशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण शास्त्र असो, माणसाने सर्वक्षेत्रात भरारी घेतली आहे. विज्ञानाच्या सहाय्याने आज चक्क ‘ह्रदय’ सुद्धा नवीन बसवल्या जाऊ शकते. पण ते म्हणतात ना ‘अती तिथे माती’, गरजेपेक्षा एखाद्या गोष्टीच्या आहारी गेलं की नुकसान हे निश्चितच असतं.
त्याचप्रमाणे, गैरसोय होऊ नये म्हणुन लावलेल्या शोधांची जेव्हा उपभोगाच्या वस्तु म्हणुन किंवा विज्ञानाला निव्वळ ‘अर्थार्जनाचे’ साधन म्हणुन जेव्हा दोघांची गल्लत होते, तेव्हा विज्ञान देखील ‘अर्थशून्य’ होते आणि विज्ञानाचा शाप होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. जीवनाच्या प्रत्येक घटकात विज्ञानाचे अस्तित्व आहेच. आपले शरीर असो, पर्यावरण असो, किंवा आपली भूक भागवण्यासाठी उगवलेले अन्न-धान्य असो, सगळी विज्ञानाचीच कृपा.
आज बहुतांश लोकांच्या तक्रारी असतात की भेसळयुक्त अन्नच बाजारात उपलब्ध आहे. भाज्या, फळे, कडधान्य, मसाले सगळेच दुय्यम दर्जाचे आहे, मग माणसाने निरोगी रहावे तरी कसे? भाज्यांना कीड लागू नये व वेगाने वाढ होऊन, उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी भाज्यांवर अनेक प्रकारची कीटकनाशके, खतं, फवारे, इत्यादींचा वापर होतो. एखाद्या पदार्थाने कीटकांचा नाश होतो, तर ते पदार्थ वापरून उगवलेल्या भाज्या माणसासाठी किती घातक ठरू शकतात याची आपल्याला कल्पना सुध्दा नसते. आपल्याच घरात आपल्या आजी आजोबांना बघितलं, की एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतो की, ‘आपण एवढे ८०-८५ वर्षे जगू का? तर उत्तर एकच असतं की ‘नाही’ शुध्द अन्न, ज्याला ‘पूर्णब्रम्ह’ म्हणतात ते कधी आपल्याला लाभलंच नाही आहे.
या सगळ्या चिंता प्रश्नांचं निरसन केलं ते, ‘मानपूरा, अलवर (राजस्थान) येथील ‘श्री हुकूमचंद पाटीदार’ यांनी. ‘नेकि कर, दरिया मे डाल’ या तत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या हुकूमचंदजींना याच वर्षी, मार्च महिन्यात ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवांकीत करण्यात आले आहे. पर्यावरणदक्ष व समाज कर्तव्याप्रति जागरूक असलेले हुकूमचंद हे एका शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे त्यांच्या भविष्याची नाळ ही शेती सोबत कायमची जोडली गेली.
दुसऱ्याचे पोट भरणारा शेतकरी स्वतःचेच पोट भरण्यात असमर्थ ठरतोय हे त्यांना बघवत नव्हते. व यामुळे ते सतत काळजीत असत. २००४ साला पर्यंत इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनी ही ‘आर्टिफिशियल खतं‘ वापरून शेती केली. पण ‘आपल्या शेतातील धान्य खाऊन आजू बाजुच्या परिसरातील मोर व इतर पक्षी मरत आहेत व तेच धन्य खाऊन आपल्या गायी सुद्धा आजारी पडल्या, तर या धान्यात किती विष असेल’ हा विचार त्यांना हैराण करु लगला.
हे विषारी धान्य बाजारात पुरवून आपण पाप करत आहोत ही भावना त्यांच्या मनात ठाण मांडू लागली. त्याच वेळी ‘नैसर्गिक शेती’ ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. सुरुवातीला कुटुंबियांनी अशाप्रकारचा कुठलाही प्रयोग करण्यास त्यांना सख्त मनाईच केली. पण हुकूमचंदजींनी भरपूर प्रयत्न करून त्यांचे मन अखेर वळवलेच. एकूण ४० एक्कर जमिनीपैकी एक छोटासा भाग त्यांच्या मुलांनी त्यांना प्रयोगासाठी दिला.
प्रयोगाच्या पहिल्याच वर्षी त्यांचे पिक खराब झाले व उत्पन्नात २० टक्के घट झाली. पण अपयश आले असून सुध्दा त्यांनी हायब्रीड बियाणे वापरण्यास विरोध केला. न थकता त्यांनी आपले ‘ नैसर्गिक’ खत बनवण्यास सुरुवात केली. मिळालेल्या जमिनीचे त्यांनी तीन भाग केले. एका भागात ‘कॉमपोस्ट खत’, दुसऱ्या भागात ‘ जीवामृत’ व एका भागात ‘हरित खत’ बनवण्यास सुरुवात केली. एक बाजू खणून, त्यांनी त्या खड्ड्यात, त्यांच्याच शेतातील ४० प्रकारची गळलेली पाने गोळा केली.
त्या पानांमध्ये गौमूत्र, गायीचे शेण, तूप, दही, ताक, हळद व बेसन मिसळून त्यांनी ‘ जीवामृत’ तयार केले. या मिश्रणामुळे ‘फरमेंटेशन प्रक्रिया’ जलद होते व ‘न्युट्रींएन्ट्स, विटामिन आणि कार्बन’ व्यवस्थित प्रमाणात टिकून राहते.
हे खत त्यांनी एका बाजूच्या मातीत मिसळले व त्या मातीत पेरणी केली. याच बरोबर उरलेल्या मोठ्या भागात त्यांनी ‘जैविकखत’ हे गांडूळ वापरून बनवले व उगवलेल्या पिकांवर ते खत वापरले. त्यांच्या या प्रयोगानंतर उत्पन्नात १२०% वाढ झाली. कापणी केल्यावर रोपांचे अवशेष जाळण्याऐवजी ते तसेच ठेवले. ज्यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो व मातीची धूप होत नाही. त्यांचा हा उपक्रम बघण्यासाठी जर्मनी, जपान, अमेरिका, अशा विविध देशांमधून ग्राहक व विद्यार्थी येऊ लगले.
त्यांची दोन्ही मुलं कॉम्प्युटर या विषयात पदवीधर आहेत. त्यांनी हुकूमचंदजींची ‘डिजिटल मार्केटिंगशी’ ओळख करून दिली. शहरी भागातील, व इतर देशांमधील परिस्थितीने समृद्ध ग्राहकांना हेरून त्यांनी आपला माल बाजार भावापेक्षा दुप्पट किंमतीने विकला. इथून त्यांचा नफा होऊ लगला. २८ देशांत आज त्यांचा माल निर्यात केल्या जातो व वर्षाला किमान २० लाख रुपयांचा नफा त्यांना या नैसर्गिक शेतीतून होतो.
केंद्रीय सरकारने २२ राज्यांत पाटीदारांची ‘ नैसर्गिक शेतीची’ संकल्पना राबवली व यात जवळपास ४००० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. आमिर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात देखिल हुकूमचंदजींना आमंत्रित करण्यात आले होते. भविष्याला दृष्टीस ठेऊन आपण आपल्या योजना आखायला हव्यात.पर्यावरण पूरक पद्धतींचा वापर करून शेती व्हायला हवी, त्याशिवाय पर्यावरणाचे प्रदूषण कमी होऊ शकत नाही.
अशा हुकूमचंद पाटीदारांसारखे शेतकरी संपूर्ण जगात जर रुजले तर मनुष्य आपले आयुष्य आरोग्य घेऊन जगेल यांत शंका नाही!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.