आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य संग्रामात आणि आधुनिक भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले होते. पुढे त्यांची मुलगी इंदिरा आणि नातू राजीव गांधी यांनी देखील पंतप्रधानपदाचा कारभार बघत असताना देशाच्या विकासात मोठे योगदान दिले.
आज नेहरू-गांधी घराणे हे वादाचा आणि राजकारणाचा विषय बनले असले तरी या घराण्याने देशासाठी मोठे योगदान दिले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू यांनी खऱ्या अर्थाने राजकीय पटलावर या घराण्याला आणायचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जितके योगदान पंडित जवाहरलाल नेहरूंचे होते तितकेच त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे देखील आहे.
आज आपण पंडित मोतीलाल नेहरूंच्या चरित्रावर दृष्टीक्षेप टाकूयात.
पंडित मोतीलाल नेहरू यांची भारताच्या काही मोठ्या वकिलांमध्ये गणना होत असे, ते वकील म्हणून खूप पैसे आकारायचे, यातून त्यांनी प्रचंड धन-दौलत कमावली होती.
त्यांचे राहणीमान हे अत्यंत राजेशाही थाटाचे होते. पण जसे त्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरले तसे त्यांनी आपले आरामदायी आयुष्य त्यागले व आपली बहुतांश संपत्ती काँग्रेसला दान केली.
भारताचे पूर्व न्यायाधीश पी. सदाशिवम यांनी इंडियन लॉ जर्नलमध्ये लिहिलं होतं की मोतीलाल नेहरू हे एक विलक्षण वकील होते, ते त्याकाळच्या सर्वांत धनी लोकांपैकी एक होते.
ब्रिटिश न्यायाधीश त्यांचा वाक्यु*ध्दाचे आणि खटले लढवण्याचा शिताफीचे फार चाहते होते. यामुळे त्यांना फार लवकर मोठी सफलता मिळवता आली. ग्रेट ब्रिटनच्या प्रिव्ही कॉन्सिलमध्ये वकिली करणाऱ्या काही मोजक्या वकिलांपैकी ते एक होते.
मोतीलाल नेहरूंच्या वडिलांचे ते लहान असताना निधन झाले, त्यानंतर त्यांचे थोरले बंधू नंदलाल नेहरू यांनी त्यांचा सांभाळ केला. नंदलाल सदर दिवाणी अदालत, आग्रा येथे वकील होते. जेव्हा इंग्रजांनी आग्रा कोर्ट प्रयागराजला नेले, त्यावेळी नंदलाल आपल्या परिवारासह प्रयागराजला येऊन निवास करू लागले.
नंदलाल यांनी आपल्या लहान भावाला चांगले शिक्षण दिले आणि पुढे वकिलीच्या शिक्षणासाठी कॅम्ब्रिज विद्यापीठात रवाना केले.
उंचपुरे आणि धारदार वाचा असलेले मोतीलाल नेहरू सहजरित्या लोकांवर आपली छाप सोडत. ते कॅम्ब्रिज विद्यापीठातून चांगल्या मार्क्सनी पास झाले. पुढे ते भारतात परतले आणि त्यांनी वाराणसी येथे वकिली सुरू केली.
मोतीलाल नेहरू त्यावेळीच्या काही निवडक बॅरिस्टर्सपैकी एक होते.
१८८८ साली त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात वकिली सुरू केली. सुरुवातीला त्यांच्यासाठी सर्वकाही सोपं नव्हतं, त्यांचे मोठे बंधू नंदलाल देखील काही दिवसात जग सोडून गेले, त्यामुळे परिवाराचा संपूर्ण बोजा मोतीलाल नेहरूंवर आला.
खरंतर त्या काळात भारतीय वकिलांना ब्रिटिश न्यायाधीश तुच्छतेने वागवायचे पण मोतीलाल नेहरूंनी मात्र त्यांना भुरळ घातली होती. मोतीलाल नेहरूंना पहिल्या खटल्याचे पाच रुपये मिळाले. मग ते यशाच्या शिड्या चढत गेले, पण त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. त्यांना एकेका खटल्याचे हजार रुपये मिळू लागले होते.
त्यांच्या मुलीने, कृष्णा हथीसिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकात सांगितले आहे की मोतीलाल नेहरूंची कायद्यावरील पकड मजबूत होती. ते फार मेहनती होते, त्यामुळे त्यांनी मोठी कमाई केली होती.
वारसाहक्क संबंधी कायद्याचे त्यांचे ज्ञान प्रचंड होते. लाखन रियासतीच्या उत्तराधिकारासंबंधित खटल्यात त्यांनी प्रचंड कमाई केली होती.
त्यांना देशभरातुन मोठ मोठे राजे, महाराजे, जमीनदार आणि श्रीमंत व्यक्तींचे खटले येऊ लागले. ते काही काळातच भारतातील गर्भश्रीमंत वकिलांच्या यादीत जाऊन बसले.
त्यांचे राहणीमान देखील युरोपियन थाटाचे होते. कोट, पॅन्ट, घड्याळ, आलिशान घर आणि श्रीमंतीचे प्रदर्शन, ही त्यांची जीवनपध्दती होती. १८८९ साली त्यांनी सतत इंग्लंडचे दौरे केले, तिथे ते पंचतारांकित हॉटेल्समध्ये निवास करायचे.
मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद हाय कोर्टात एका वर्षात २० हजार रुपये कमावले होते. त्यातूनच त्यांनी स्वराज भवन विकत घेतले.
१९०० साली मोतीलाल नेहरूंनी प्रयागराजमधील महमूद मंजिल हा आलिशान महाल विकत घेतला. यासाठी त्यांनी २० हजार रुपये किंमत मोजली होती, पुढे त्यांनी याचे रूपांतर स्वराज भवनात केले. या भवनात ४२ खोल्या होत्या, त्यांनी हे भवन १९२० साली कॉंग्रेसला दान केले.
१९३० साली त्यांनी सिव्हिल लाईन भागात अजून एक संपत्ती विकत घेतली, त्याला त्यांनी आनंद भवन हे नाव दिले. या घराची सजावट करण्यात त्यांना अनेक वर्ष खर्च करावे लागले. या घरात अनेक मौल्यवान वस्तू होत्या आणि फर्निचर होते.
या घराचं सामान खरेदी करायला मोतीलाल नेहरूंनी चीन व युरोपचे अनेक दौरे केले होते. १९७० साली इंदिरा गांधींनी हे घर देशाच्या नावे केलं होतं.
असं म्हणतात की, मोतीलाल नेहरू इतके गर्भश्रीमंत होते की त्यांच्या कपड्यांची शिलाई लंडनमध्ये होत असे तर त्यांना धुण्यासाठी विशिष्ट पद्धत असल्याने ते धुण्यासाठी युरोपला जायचे !
पण पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंनी याचे खंडन केले होते. मोतीलाल नेहरूंची मुलगी कृष्णा यांनी लिहिले होते की त्यांचा परिवार त्यावेळी पाश्चिमात्त्य पद्धतीचे जीवन जगायचा, भारतात कोणी असं जीवन जगत नव्हतं, डायनिंग टेबल आणि त्यावरील आकर्षक महागडी चिनी मातीचे भांडे हे त्याकाळी फार श्रीमंतीचे लक्षण मानले जात होते.
त्यांच्या घरात इंग्रजी बाया कामाला होत्या, अशी नोंद देखील कृष्णा यांनी केली आहे. मोतीलाल नेहरूंच्या घरात इंग्रजी ट्यूटर मुलांना शिकवायचे.
पंडित जवाहरलाल नेहरू पुढे इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले त्यावेळी तिथे फार आलिशान घरात राहायचे, त्यांचं राहणीमान पण उच्च होते. त्यांना कॉलेजला जाण्यासाठी मोठी गाडी होती.
जेव्हा त्यांनी तिथे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी मोतीलाल नेहरू आपल्या परिवाराला घेऊन त्यांच्याबरोबर इंग्लंडमध्ये पाच महिने राहिले होते.
मोतीलाल नेहरू १९०० साली भारतातील सर्वांत गर्भश्रीमंत वकील बनले होते. त्यावेळी त्यांनी अमाप धनदौलत तर कमावलीच शिवाय आपल्या मुलाला देखील याच मार्गाने पैसे कमावण्याचा सूचना केल्या होत्या.
प्रयागराजमधील पहिली विदेशी गाडी नेहरू परिवाराच्या मालकीची होती. त्यांचा दर्जा इतका वरचा होता की ब्रिटिश चीफ जस्टीस त्यांना अभिवादन करायचा!
एवढे आलिशान आयुष्य जगणारे मोतीलाल नेहरू पुढे गांधींच्या संपर्कात आले आणि १९२० मध्ये त्यांनी गांधींच्या तत्त्वावर आपल्या शानदार जीवनाला त्यागून साधारण आयुष्य जगायला सुरूवात केली. घरातील जेवणापासून राहणीमानापर्यंत सर्वच साधेपणाचे होते. इतकं असून देखील ते १९०० नंतर काही दशके सर्वात श्रीमंत वकीलाचे पद बळकावून होते.
गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी संपत्ती त्यागली, संपत्ती काँग्रेसला दान केली. असं म्हणतात जेव्हा काँग्रेस अडचणीत यायची त्यावेळी मोतीलाल नेहरूच काँग्रेसला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे.
मोतीलाल नेहरूंनी दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. १९३१ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्याप्रमाणे त्यांच्या परिवाराने देखील देशासाठी भविष्यात मोठा त्याग व बलिदान दिले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.