आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
३१ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या तरुणाने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. गांधी ह*त्येनंतर त्यांच्या ह*त्येच्या कटात प्रमुख आरोपी नथुराम गोडसेला १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली होती. आजही गांधींचे ज्यावेळी नाव घेतले जाते त्यावेळी त्यांचा सोबत गांधींची ह*त्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नाव देखील चर्चेत येते.
एकप्रकारे गांधी ह*त्येमुळे नथुराम गोडसे हा देखील इतिहासात अजरामर झाला आहे. पण गांधी ह*त्येच्या आरोपात फक्त नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा देण्यात आली नव्हती, त्याच्याबरोबर नारायण आपटे या त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
नथुराम गोडसेने जरी गांधीवर गोळ्या झाडणाऱ्या बंदुकीचा चाप ओढला होता तरी त्या मागे अनेक अदृश्य हात होते. त्यात एक हात होता या नारायण आपटे नावाच्या तरुणाचा, लोकांना नथुरामबद्दल जितकी माहिती असते, त्या तुलनेत फार कमी माहिती नारायण आपटेबद्दल असते. म्हणून या लेखात आपण नारायण आपटे कोण होता, त्याने गांधी ह*त्येत सहभाग का घेतला या इतिहासावर प्रकाश टाकणार आहोत.
गांधी ह*त्येच्या कटाचा निकाल न्यायालयाने १० फेब्रुवारी १९४९ ला दिला, यात ९ संशयित आरोपींची सुटका करण्यात आली, या नऊ आरोपींपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
पण नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर गोपाळ गोडसे या नथुरामच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९६६ साली सरकारने पुन्हा एकदा गांधी ह*त्येचा तपासाचे आदेश दिले यासाठी त्यांनी जस्टीस जेएल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. या समितीने तयार केलेल्या अहवालात नारायण आपटेबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. यात असं देखील म्हणण्यात आलं आहे की नारायण आपटे हा ब्रिटिश काळात रॉयल इंडियन एअर फोर्सचा कर्मचारी होता.
पण यावर जेव्हा मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना अभिनव भारत या संस्थेकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी असंख्य जुने दस्तावेज तपासण्यात आले यात कुठेही नारायण आपटे भारतीय वायुदलात होता असे आढळून आले नाही.
पुढे अभिनव भारतने असा दावा केला की नारायण आपटे हा ब्रिटिश गुप्तचर संस्था १३६ चा सदस्य होता. ज्यावेळी नथुराम गोडसेने गांधींना तीन गोळ्या मारल्या त्यावेळी देखील गांधी जिवंत होते. परंतु त्यांच्यावर चौथी गोळी चालवली गेली, ती नारायण आपटेकडून होती आणि त्याला असे करण्यास कॉंग्रेसमधल्या गांधी विरोधकांनी पैसे दिल्याचा अजब दावा देखील करण्यात आला होता.
तो एक गुप्तचर होता आणि त्याला गांधी ह*त्येची सुपारी देण्यात आल्याची कुजबुज आजही लोक करत असतात. पण यात तथ्य आहे, असा अजून कुठलाच पुरावा उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे ही एक कॉन्स्पिरसी थिअरीच आहे.
नारायण आपटेबद्दल जितकी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे त्यानुसार नारायण आपटे हा एक आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला माणूस होता, त्याने मुंबई विद्यापीठातुन विज्ञान विषयात पदवी घेतली होती. त्याने त्यानंतर अनेक कामं केली, काही काळ अध्यापनाचे काम देखील केले होते. तो पुण्यातील एका संस्कृत भाषा प्रभूतींच्या घरात जन्माला आला होता.
अहमदनगर येथे १९३९ साली अध्यापनाचे काम करत असताना तो हिंदू महासभेच्या संपर्कात आला, तो तत्कालीन हिंदू महासभा अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषणाने प्रभावित झाला होता.
पुढे तो पुण्याला परतला आणि त्याने लग्न केले, त्याची पत्नी देखील एका उच्चभ्रू घरातील कन्या होती, पुढे त्याला मुलगा झाला.
पुण्यात त्याची ओळख नथुराम गोडसे या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याशी झाली. त्यांनी दोघांनी एकत्र येऊन ‘अग्रणी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र प्रखर हिंदुत्ववादी मांडणीसाठी ओळखले जात होते, यात प्रामुख्याने काँग्रेस आणि मुस्लिम लीगवर प्रचंड टीका केली जायची.
परंतु या वृत्तपत्राचा खप इतका नव्हता, त्यामुळे हा तोट्याचा व्यवसाय बनला होता. आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने ते वृत्तपत्र बंद करण्याच्या विचारापर्यंत येऊन पोहचले असताना सावरकरांनी त्या वृत्तपत्राला आर्थिक मदत देऊ केली आणि ते वृत्तपत्र तगले.
पुढे भविष्यात सावरकरांनी या वृत्तपत्रासाठी अनेकदा निधी दिला. पण सरकारने देश स्वतंत्र झाल्यावर त्या वृत्तपत्रावर बंदी आणली होती.
नारायण आपटे सावरकरांचा मोठा अनुयायी होता, सावरकरांनी ब्रिटिश सैन्यात सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तो रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये गेला होता, असे मानले जाते. नारायण आपटे ज्यावेळी गांधी ह*त्येनंतर जेलमध्ये होता, त्यावेळी त्याने हिंदुराष्ट्राच्या सैद्धांतिक रचनेवर एक पुस्तक देखील लिहले होते.
१५ नोव्हेंबर १९४९ ला नथुराम गोडसेप्रमाणे नारायण आपटे देखील हसत हसत फासावर गेला होता, त्याला देखील नथुराम प्रमाणे अखंड हिंदुस्थान बघण्याची तीव्र इच्छा होती. फाशी जाण्याचा वेळी एकीकडे नथुराम अखंड भारताचे नारे देत होता तर दुसरीकडे आपटे देखील त्याच्या पाठोपाठ अखंड हिंदुस्थानाचा जयजयकार करत होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.