आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कलम ३७० रद्द केल्यानंतर भारताने काश्मीरवर आपली पकड अजून मजबूत केली, यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला असून त्याने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पुन्हा उचलण्याचा धडाका लावला आहे. पण वेळोवेळी भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक प्रयत्नाला हाणून पाडत त्यांना तोंडघशी पाडले आहे.
भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यापासूनच काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांमधील विवादाचाच नाहीतर संघर्षाचा मुद्दा राहिलेला आहे. ही स्थिती निर्माण का झाली आणि हा प्रश्न का चिघळत गेला, याचा इतिहासात डोकावल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.
त्यावेळी भारतातील आणि काश्मीरमधील राजकीय परिस्थिती हा प्रश्न चिघळण्यास कशी कारणीभूत ठरली आणि भारतीय नेत्यांच्या एकंदरीत भूमिका काय होत्या, हे आज आपण जाणून घेऊया…
जर आपण काश्मीर प्रश्नाच्या इतिहासात डोकावून बघितलं तर या विषयात भारताच्या बाजूने मोठी दिरंगाई करण्यात आली होती, असं दिसून येतं.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या बाबतीत फार गाफील राहिले आणि त्यांनी शेख अब्दुल्लावर अंधपणे विश्वास ठेवला ज्यामुळे आज हा प्रश्न अजूनही सुटू शकलेला नाही.
खरंतर त्यावेळी नेहरूंची डिप्लोमॅटिक भूमिका चुकीची नसली तरी अपूर्ण होती, यामूळे हे घडले होते.
ज्यावेळी एकीकडे भारत-पाकिस्तान हे नव्याने निर्माण झालेले दोन देश एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदा युद्ध करत होते तर दुसरीकडे भारताच्या शीर्ष नेतृत्वात पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्यात काश्मीर प्रश्नावर फार टोकाचे मतभेद होते.
‘द इंडिया फॅक्टर’ या पुस्तकानुसार सरदार पटेल यांनी पाकिस्तानचे पूर्व कॅबिनेट मंत्री अब्दुल रब निश्तर यांची भेट घेत त्यांना दरडावून सांगितले होते की ते जुनागड आणि हैद्राबाद नाहीतर काश्मीरवर चर्चा करायला आले आहेत.
याच पुस्तकात पुढे सरदार शौकत हयात यांचा उल्लेख येतो जे पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य होते. ते तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली आणि लॉर्ड माउंटबॅटनमध्ये झालेल्या चर्चेला उपस्थित होते. त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांनी सरदार पटेलांची एक ऑफर लियाकत अलींसमोर ठेवली होती.
या ऑफरनुसार जर पाकिस्तानने हैद्राबाद संस्थानाचा दावा सोडला तर भारत काश्मीर पाकिस्तानला द्यायला तयार झाला होता. लियाकत अली त्यावेळी माउंटबॅटनला म्हणाले की काही पर्वतांसाठी आम्ही एक मोठे राज्य भारताला द्यायला मूर्ख आहोत का?
सरदार पटेलांचे सेक्रेटरी व्ही पी मेनन यांनी आपल्या इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट या पुस्तकात लिहिले आहे की माउंटबॅटन यांनी ज्यावेळी काश्मीर प्रश्नावर महाराज हरीसिंह यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी सरदार पटेल हे काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकण्यास पूर्णपणे अनुकूल आहेत, असे सांगितले.
खरंतर सरदार पटेल हे द्विराष्ट्रवादाच्या सिध्दांताच्या आधारावर काश्मीर पाकिस्तानला देण्यास सर्वर्थाने तयार होते, पण नेहरूंना हे मंजूर नव्हते. नेहरू हे एक काश्मीरी पंडित होते त्यामुळे काश्मीरशी त्यांचे एक घट्ट नाते होते. शिवाय त्यांना काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकणे म्हणजे एकप्रकारे पाकिस्तान पुरस्कृत धार्मिक द्विराष्ट्रवादाच्या मागणीचा स्वीकार करणे होते!
नेहरूंना वाटत होते की काश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य आहे असं म्हणून आपण तिथल्या सेक्युलर आणि काश्मिरी नॅशनलिस्ट जनतेचा अधिकारांचे हनन करत आहोत, त्या लोकांनी ज्या सेक्युलर राष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे त्याचा आपण बळी देत आहोत.
नेहरु हे शेख अब्दुल्ला यांच्या आंदोलनाचे समर्थक होते, तर शेख अब्दुल्ला हे अमेरिका आणि ब्रिटनकडून स्वतंत्र काश्मीरच्या मुद्द्यावर समर्थन मिळण्याची आशा लावून बसले होते.
नेहरूंनी काश्मीर प्रश्नावर शेख अब्दुल्ला यांची भेट घेतली, त्याच वेळी २२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानी लष्कर काश्मीरात घुसले, त्यावेळी हरीसिंहने भारताकडे मदतीची याचना केली पण सुरुवातीला भारताने मदत करायला नकार दिला.
पाच दिवसांनी भारताने सरदार पटेलांच्या आदेशानुसार काश्मीर मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली, ही मोहीम सफल होण्याच्या आतच माउंटबॅटनने हस्तक्षेप करून या भागातील जनतेचे सार्वमत घेण्याची योजना मांडली. २८ ऑक्टोबर १९४७ ला आकाशवाणीवरून या सर्वमताची घोषणा केली.
पुढे भविष्यात १९५० साली सरदार पटेलांचे दुर्दैवी निधन झाले. १९५१मध्ये जम्मू काश्मिरात विधानसभा निवडणुका झाल्या, कलम ३७० अंतर्गत काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला.
पुढे १९५७ ते १९६२ या काळात भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान हा काश्मीरवर अन्याय करत असल्याचे कारण देत, त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित तर केले पण हा प्रश्न पुढे बिघडत गेला, अजूनही भारत-पाकिस्तानमधील हा प्रश्न जसाच्या तसाच आहे.
काश्मीर प्रश्नावर त्यावेळी नेहरू योग्य होते की सरदार पटेल हा वादाचा विषय असला तरी या प्रकरणी दोन्ही नेत्यांच्या विचारसरणीत आणि धोरणात किती फरक होता, याची प्रचिती होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.