आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपण जिथे राहतो तो विविध प्रथापरंपरा, इतिहास आणि संस्कृती या सर्वांचा वारसा लाभलेला पुरातन देश आहे. एक असा देश ज्या देशात भिन्न संस्कृती असलेली अनेक राज्य आहेत आणि त्या राज्यात असणारी शहरे व तिथली संस्कृती यांच्याशी आपण सर्व बांधले गेलेलो आहोत.
तर आज आपण अशाच एका शहरातल्या एका जागेबद्दल जाणून घेणार आहोत. एक अशी जागा जिथे रोज २५० ते ३०० प्रेतं जळतात. एक अशी जागा जिथे मरण यावं अशी बहुतांश लोकांनी इच्छा असते’.
उत्तर प्रदेशात असणाऱ्या काशी शहराची भारताची अध्यात्मिक राजधानी अशी ओळख आहे. या शहराला वाराणसी तसेच बनारस म्हणूनसुद्धा ओळखले जाते. प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व विविधतेने पूर्ण असलेल्या या शहरात विविध जातीधर्माचे लोक राहतात. हे शहर जगातील सर्वांत जुन्या असणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
खाद्यपदार्थांची रेलचेल, मऊ तलम रेशमी साड्या, ऐतिहासिक ठिकाणे, संग्रहालये व शहरातून वाहणारी गंगा नदी व त्या नदीवर असणारे घाट. या सगळ्या गोष्टी काशी या शहराला परिपूर्ण बनवतात. अशाच काशीमधील गंगाघाटांपैकी एक असलेल्या मणिकर्णिका घाटाबद्दल बऱ्याच लोकांना खूप प्रश्न असतात पण हा संपूर्ण लेख वाचल्यावर तुमचे हे प्रश्न नक्कीच सुटतील.
गंगेवर असणाऱ्या ८४ मुख्य घाटांपैकी एक असलेला मणिकर्णिका घाट हा हिंदूंची स्मशानभूमी म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहे. काशीमध्ये असलेल्या या घाटावर रोज सरासरी २५० ते ३०० अंत्यसंस्कार होत असतात. विशेष बाब म्हणाल तर ती अशी की इथे कोणाचाच मृत्यू झाल्यावर कोणी अज्जिबात रडत नाही, त्याचं कारण कदाचित अस की काशी मध्ये मृत्यू झाला आणि गंगेच्या काठावर अंत्यसंस्कार झाले की मोक्ष मिळतो अशी हिंदू धर्मियांत समज आहे.
मोक्ष मिळणे म्हणजे काय तर थोडक्यात त्या व्यक्तीला पुढे कुठला जन्म घ्यावा लागत नाही, त्याची जन्म मृत्यू या फेऱ्यातून सुटका होते.
तुम्हाला इथे मोठ्याने हसल्याचे आवाज येतील, तुम्हाला इथे लोक घोळक्याने चहा पिताना दिसतील. कोणी लाकडे खरेदी करत असेल तर कुठे कोणी चिता बांधताना दिसेल. याच घाटावर तुम्हाला अनेक प्रकारच्या व्यक्ती दिसतील. इथे तुम्हाला अंत्यसंस्कार होताना दिसतील. असा हा मनकर्णिका घाट.
मणिकर्णिका घाटाबद्दल स्थानिक सांगतात ती दंतकथा अशी की शंकर व पार्वती तिथे वास्तव्यास होते तेव्हा एकदा पार्वतीला गंगेमध्ये अंघोळ करण्याची इच्छा झाली व शंकरांनी ती पूर्ण केली. पण या दरम्यान पार्वतीच्या कानात असणारं कुंडल हरवलं. त्यावर शंकरांनी ते सात लोकांना शोधण्यास सांगितले तेव्हा एका व्यक्तीला ते सापडूनसुद्धा सापडलं नाही असं त्याने सांगितलं.
ते कळलं तेव्हा महादेवाने त्या व्यक्तीला असा शाप दिला की तू आता इथेच वास्तव्य करशील व हिंदू धर्मियांच्या चितेला अग्नी देण्याचं काम करशील. तेव्हापासून त्या जागेला मनकर्णिका घाट असे नाव पडले व तेव्हापासून डोंब समाज हा काशीमध्ये राहून प्रेतांना अग्नी देण्याचं काम करत आहेत.
आज मणिकर्णिका घाटावर रोज कित्येक अंत्यसंस्कार केले जातात, इथे येणारे शव कधीच थांबत नाहीत. दिवसातले २४ तास व आठवड्याचे ७ दिवस इथे चिता जळत असतात. असं बोललं जातं की महादेवांनी पेटवलेली अग्नी तिथे आजसुद्धा प्रज्वलित आहे व त्याच अग्नीने चितांना अग्निडाग देण्याचं कार्य केलं जातं.
या कार्यासाठी तिथे असणाऱ्या स्थानिक डोंब समाजाला पैसे मिळतात व तेच त्यांच्या जगण्याचं साधन आहे. पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा हे डोंब घराणे आजही वर्षानुवर्षे चालवत आहे.
जगभरातून कित्येक लोक काशीमध्ये केवळ मरण यावं व आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून तिथे येत असतात. तिथे असणाऱ्या प्रत्येकाला काशीत मृत्यू येईलच असं नाही. मग भलेही तो बाहेरचा असो किंवा काशीमधील स्थानिक रहिवासी असो. आपल्याला मृत्यू केव्हा येईल, आपल्याला मोक्ष मिळेल का या गोष्टी शेवटी सर्वस्वी तुमच्या कर्मांवर निर्भर असत असं म्हटलं जातं.
सध्याचे मणिकर्णिका घाटावर डोंब राजा असलेले जगदीश चौधरी सांगतात की स्मशान ही जीवनातली शेवटची जागा आहे तर मृत्यू हे शेवटचं सत्य. पण माणूस आपल्या अहंकारी स्वभावामुळे जगताना हे विसरून जातो व आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकत नाही. जेव्हा तो जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात येतो तेव्हा त्याला त्या गोष्टीची समज येते व तो मोक्ष मिळावा या करीता पुण्यकर्म करू लागतो.
मृत्यू म्हणजे काय किंवा मृत्यू कसा असतो ते डोळ्यासमोर पाहण्यासाठी एक अद्भुत अनुभव देणारा काशी या शहरातला हा गंगाघाटांपैकी एक मणिकर्णिका घाट आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्यावी असा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.