आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात असे एक स्थान आहे ज्याठिकाणी सैनिक पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री अथवा इतर कोणालाच सलाम करत नाही. ह्याठिकाणी भारतातील याठिकाणी आजही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मानवंदना दिली जात नाही फक्त भगवान श्रीरामाला मानवंदना दिली जाते कारण भगवान श्रीराम त्या ठिकाणचे राजे आहेत. हे ठिकाण मध्य प्रदेशात असून, ओरछा असे ह्या ठिकाणाचे नाव आहे.
ओरछा, मध्यप्रदेश येथे राम राज सरकार हे भव्य राम मंदिर आहे.
एका दंतकथेनुसार १४ व्या शतकात जेव्हा मधुकर शहा ह्या राजाचे ओरछाच्या राजपूत साम्राज्यावर शासन होते. मधुकर राजा हा वैष्णवपंथातील सखी परंपरेचा श्रध्दाळू होता. ह्या परंपरेतील लोक हे श्रीकृष्णाचे निस्सिम भक्त असतात. त्यांना वैष्णव संप्रदायात कृष्णप्रेमी म्हणून संबोधले जाते.
ते कृष्णासाठी विविध गीत तसेच नृत्याची देखील रचना करत असतात. एकीकडे राजा श्रीकृष्ण भक्त होता तर त्याची राणी गणेशी कुंवर मात्र भगवान श्रीरामाची मोठी भक्त होती. मधुकर राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले होते.
एकदा राजा मधुकर आणि राणी गणेशीमध्ये वृंदावनला जायचं की अयोध्येला, ह्यावरून वाद निर्माण झाला. राजा त्यावेळी राणीला म्हणाला की मला भगवान श्रीकृष्णाने स्वतः दर्शन दिलं आहे, श्रीराम कुठे आहेत? त्याने आपल्या सैनिकांना राणीला अयोध्येला सोडण्याचे आदेश दिले व राणीला सूचना दिली की जोवर प्रभू श्रीरामाना सोबत आणत नाही तोपर्यंत पुन्हा परत येऊ नको.
राणीने अयोध्येला तब्बल १२ वर्ष घोर तपश्चर्या केली, परंतु प्रभू श्रीरामाने दर्शन दिले नाही. यामुळे व्याकुळ होऊन राणीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व शरयू नदीत राणीने उडी मारली. त्या नदीच्या प्रवाहात राणीला एक मूर्ती सापडली. जी बाल्यावस्थेतील श्रीरामाची होती.
राणीने त्या मूर्तीला हृदयाशी कवटाळले आणि काही क्षणात मूर्ती सजीव होऊन त्या राणीच्या हातात बाल श्रीराम होते. राणीने श्रीरामाला त्यांच्या बरोबरीने ओरछाला येण्यास विनंती केली. त्यावेळी बाल श्रीराम राणीला म्हणाले जर ओरछाचा राजा मला त्याचं सिंहासन देईल तरच मी ओरछाला येईल. मधुकर राजाने श्रीरामांच्या विनंतीला मान देत आपलं सर्वस्व श्रीरामांच्या नावी केलं. एका भव्य दिव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली. राजाने आपल्या मुलाप्रमाणे बाल श्रीरामाचा सांभाळ केला. श्रीराम राणीच्या निवासात वास्तव्यास होते, राणीने श्रीरामाची मोठी काळजी घेतली. तेव्हापासून प्रभू श्रीराम हे ओरछाचे राजे आहेत. आजही त्यांची प्रतिष्ठा राजासारखीच आहे.
इतिहासकारांच्या मते अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचा विनाश ज्यावेळी बाबरच्या हातून चालू होता त्यावेळी त्या मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरातील मूर्त्याना शरयू नदीत सोडून दिले होते, ज्या पुढे जाऊन तीर्थ यात्रेला निघालेल्या महाराणी गणेशीच्या हाती लागल्या. महाराणी गणेशीने त्या मूर्तीची स्थापना सिंहासनावर करून राज्याचा कारभार बघितला होता.
इतिहासकारांच्या मते ओरछाचा राजा हा नेहमी साधनेत मग्न असायचा त्यामुळे त्याचा जागी श्रीरामाला राज सिंहासनावर बसवून राणीने कारभार बघितला. हा तो काळ आहे ज्यावेळी भारतावर मुघलांनी भारतावर आक्रमण केले होते.
प्रभू श्रीराम त्याकाळापासून आजपर्यंत ओरछाचे स्वामी असून त्यांच्या माध्यमातून राज्य कारभार चालवला जातो म्हणूनच त्यांना राम राज सरकार म्हणतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.