आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी सर्वश्रुत आहेच. व्यापारी म्हणून भारतामध्ये दाखल झालेल्या इंग्रजांचा मुख्य उद्देश महाराज चांगलाच ओळखून होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांनी इंग्रजांवर चांगलाच वचक ठेवला होता. इंग्रजाशी लढा द्यायचा तर त्यांच्यासारखेच प्रबळ असे आरमार हवे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु करून अगदी इंग्रज, डच लोकांच्या तोडीचे आरमार उभे केले होते. पण कितीही प्रबळ फौज किंवा आरमार असले तरी प्रत्येक लढाई ही जमिनीवर किंवा पाण्यावर लढता येणार नाही हेही ते ओळखून होते. महाराजांनी इंग्रजांना सक्त ताकीद दिलेली होती की त्यांनी मुघलांना तोफा पुरवायच्या नाही. असे असूनसुद्धा इंग्रजांनी मुघलांना तोफा पुरवल्या होत्या. त्यामुळे इंग्रजांना धडा शिकवणे अत्यंत आवश्यक झाले होते. म्हणूनच इंग्रजांची आर्थिक कोंडी करण्यासाठी चालून आलेली एक नामी संधी महाराजांनी सोडली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुंबईच्या इंग्रजांकडून तांबे घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला पैशांच्या ऐवजी एक हुंडी देऊन सांगितले की,
सध्या रायगडावर रोख रक्कम नाही. पण गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडून आम्हांला खंडणी मिळते. तेव्हा तुम्ही हा कागद घ्या आणि गोवळकोंड्याला जाऊन आमच्या कचेरीमध्ये दाखवा. तुम्हाला पैसे मिळून जातील.
आता या माणसाला परस्पर गोवळकोंड्याला जाण्याचा अधिकार नव्हता. या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार मुंबईचा गव्हर्नर – जेराल्ड ऑन्जर याला होता. त्या काळी इस्ट इंडिया कंपनीचा मुंबईचा गव्हर्नर हा सुरत (जी महाराजांनी दोनदा लुटली) च्या कौन्सिलचा देखील अध्यक्ष असे. त्यामुळे बरेचदा त्याचा मुक्काम सुरतेमध्येच असे.
त्यामुळे त्या इंग्रज अधिकाऱ्याने ते कागद सुरत येथे पाठवले. सुरतेहून गव्हर्नरची परवानगी घेऊन एक माणूस हे कागद घेऊन गोवळकोंड्यास गेला. तिथे महाराजांच्या कचेरीमधला माणूस ते कागद बघून म्हणाला, “ हा कागद बघून तुम्हाला पैसे देण्याची परवानगी मला नाही. ज्यांना ही परवानगी आहे ते प्रह्लादजी निराजी काही कामासाठी रायगडावर गेले आहेत. म्हणून एक तर तुम्ही रायगडावर जा किंवा प्रह्लादजी निराजी येईपर्यंत इथे थांबा. ”
हा इंग्रज एक सर्वसाधारण अधिकारी होता. जास्त विचार न करता त्याने ते सगळे कागद आपल्या धोपटीमध्ये टाकले आणि सरळ सुरतेस जाऊन आपल्या साहेबांस सर्व वृत्तांत कळवला. एव्हाना गव्हर्नर मुंबईला परत आला असल्याकारणाने सुरतेच्या अधिकाऱ्यांनी ते सर्व कागद मुंबईला पाठवले.
ते कागद पाहून आणि सर्व वृत्तांत ऐकून गव्हर्नर जाम वैतागला. पण करणार तरी काय? त्याने नारायण शेणवी या दुभाष्याला रायगडावर पाठवण्याचे ठरवले. हा नारायण शेणवी दुभाष्या म्हणून अनेक वेळा रायगडावर जाऊन आलेला होता.
तो मुंबईहून निघून मजल दरमजल करत थेट रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाला. तिथे त्याला कळले की महाराज सध्या गडावर नाहीत. त्याने गावातल्या लोकांजवळ चौकशी केली की कुठे गेले आहेत महाराज? लोकांनी त्याला सरळ सुनावले की महाराज काय आम्हांला सांगून जातात का? त्यावर त्याने विचारले की परत कधी येतील? लोक म्हणाले की तेही सांगून जात नाहीत. ते महाराज आहेत. येतील तेव्हा येतील.
सरतेशेवटी एक शेवटचा प्रयत्न म्हणून नारायण शेणवीने गडावर कोण आहे म्हणून विचारले. तेव्हा गडावर स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे होते. राज्याभिषेकाच्या कार्यक्रमानंतर नंतर मोरोपंत अनेक कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी नारायण शेणवीला महिनाभर गडाच्या पायथ्याशीच थांबवून ठेवले. एका महिन्याने त्याला गडावर बोलावून विचारले की सांगा तुमचे काय काम आहे?
शेणवीने सर्व वृत्तांत कथन केला की – “तुम्ही आमच्याकडून तांबे घेतले. त्याच्या बदल्यात आम्हांला ही हुंडी दिली. आमचा माणूस गोवळकोंड्याला गेला. तिथे कळले की प्रह्लादजी निराजी येथे रायगडावर आलेले आहेत म्हणून पैसे घेण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत.” मोरोपंत म्हणाले, “तुमचे अगदी बरोबर आहे. प्रह्लादजी निराजी येथे आले होते. पण त्यांचे काम संपवून ते आता गोवळकोंड्याला परत गेले आहेत.”
त्यावर शेणवी म्हणाला, “आम्ही काही सारखं सारखं गोवळकोंड्याला जाणार नाही. तुम्ही आम्हांला इथे पैसे देऊन मोकळं करा.” त्यावर मोरोपंत म्हणाले की “ अहो इथे रायगडावर रोख रक्कम नाही म्हणून तर आम्ही तुम्हाला हुंडी दिली ना.”
हो-नाही, हो-नाही च्या भांडणात शेवटी मोरोपंत वादावर पडदा टाकत म्हणाले की “ हे बघा, इंग्रजासोबत आम्हांला आमचे व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत. म्हणून मी आपला एक उपाय सुचवतो. अलिबागला आमची कोठारं आहेत. आमची अष्टागरातली प्रजा आम्हांला कर म्हणून सुपारी, नारळ, तांदूळ देते. तुमच्या तांब्याच्या किंमतीएवढे सुपारी, नारळ, तांदूळ तुम्हाला देण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना सांगतो.”
आता तांब्याच्या ऐवजी काहीही स्वीकारण्याचा अधिकार नारायण शेणवीकडे अर्थातच नव्हता. त्यामुळे तो म्हणाला, “अहो पण तांब्याच्या बदल्यात हे घेण्याचा अधिकार मला नाही. मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारावे लागेल.” मोरोपंतांनी त्याला “सावकाश जा. काही घाई नाही.” असे सांगून रवाना केले.
नारायण शेणवी हात हलवत मुंबईत आला आणि गव्हर्नरला भेटला. त्याने सर्व वृत्तांत कथन केला – “गडावर महाराज नाहीतच. ते कुठे गेले आहेत, कधी येणार आहेत हे कोणालाही माहीत नाही. कोणी काही नीट सांगायला तयार नाही. तिथे त्यांचे ते पंतप्रधान म्हणत आहेत की तांब्याच्या किंमतीएवढे सुपारी, नारळ, तांदूळ अलिबागच्या कोठारामधून घ्या. काय करायचे ते तुम्ही सांगा.”
हा गव्हर्नर जेराल्ड ऑन्जर मुळात अतिशय हुशार होता. त्याने लगेच तर्क लावला की आपल्याला तर एकीकडून हे सांगतील की अलिबागच्या कोठारातून जिन्नस घ्या पण आतून आपल्या लोकांना सांगतील की पुढच्या सुचना येईपर्यंत त्या अलिबागच्या कोठारामध्ये काहीही माल टाकायचा नाही. आणि मग ते तिथे काही मालच नाही या कारणाखाली ते आपल्याला काहीही देणार नाहीत.
त्यामुळे त्याने नारायण शेणवीस सांगितले की ते काही नाही. तु आता परत रायगडावर जा कारण तिथे महाराज परत आलेले आहेत अशी बातमी आताच हाती लागली आहे आणि इतर कोणालाही न भेटता तु फक्त महाराजांनाच भेट आणि पैसे घेऊन परत ये.
सगळा प्रवास करून नारायण शेणवी परत एकदा रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाला. महाराजांनी त्याला परत एक महिना खालीच थांबवून ठेवले आणि मग गडावर बोलावून विचारले की सांगा काय ठरले आहे तुमचे? नारायण शेणवी सर्व वृत्तांत कथन करून म्हणाला, “महाराज, आमचे पैसे देऊन टाका आणि आम्हांला मोकळे करा.” त्यावर महाराज म्हणाले की “अहो इथे रायगडावर रोख पैसे नाहीत, हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे.” पुन्हा हो-नाही, हो-नाही च्या या भांडणात शेवटी महाराज वादावर पडदा टाकत म्हणाले की “ हे बघा, इंग्रजासोबत आम्हांला व्यापारी संबंध कायम ठेवायचे आहेत आणि या राज्याचा राजा म्हणून मी एक उपाय सुचवतो. या तांब्याच्या किंमतीएवढे सोने किंवा चांदी आम्ही तुम्हाला देतो.”
पुन्हा तांब्याच्या ऐवजी हे सोने किंवा चांदी स्वीकारण्याचा अधिकार नारायण शेणवीकडे अर्थातच नव्हता. त्यामुळे तो म्हणाला, “अहो पण तांब्याच्या बदल्यात हे सोने/चांदी घेण्याचा अधिकार मला नाही. मला मुंबईला जाऊन साहेबाला विचारावे लागेल.” महाराजांनी त्याला “काही घाई नाही. तुम्ही अवश्य मुंबईस जाऊन साहेबांना विचारून या” असे सांगून त्याला रवाना केले.
नारायण शेणवी जसा मुंबईला परत आला तसे गव्हर्नरने ओळखले की याही वेळेस याच्या हाती काहीही लागलेले नाही. त्याने विचारले, “अरे काय झाले तरी काय?” तसा नारायण शेणवी बोलता झाला –
“गडावर महाराज तर आलेले आहेत पण ते सोने किंवा चांदी घ्या म्हणत आहेत. मला कुठे हे ठरवण्याचा अधिकार आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारायला परत आलो. तुम्ही सांगा काय करायचे.”
गव्हर्नर वैतागून म्हणाला, “अरे किती दिवस वाया जात आहेत या सगळ्यामध्ये. खर्च होतोय तो वेगळाच. आता तुम्ही ते जे काय देत आहेत ते ताबडतोब घेउन या. नाहीतर जे मिळतंय तेपण नंतर मिळणार नाही.”
साहेबाचा हुकुम घेऊन शेणवी परत रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाला. महाराजांनी त्याला परत एक दीड महिना खालीच थांबवून ठेवले आणि मग गडावर बोलावून विचारले की सांगा काय ठरले आहे तुमचे? शेणवी म्हणाला, “द्या महाराज, सोने द्या, चांदी द्या, काहीही द्या, पण आम्हांला एकदाचे मोकळं करा.” त्यावर महाराज म्हणाले, “अहो पण एक काय ते नक्की ठरवा. तुम्हाला सोने हवे की चांदी हवी?” शेणवी म्हणाला, “चांदी द्या महाराज.” त्यासरशी महाराजांनी मोरोपंतांना सांगितले की याला त्या तांब्याच्या किंमतीएवढी चांदी देऊन टाका आणि हा व्यवहार मिटला आहे असे याच्याकडून लिहून घ्या.
यानंतर मोरोपंतांनी एक काम अतिशय चोख बजावले ते म्हणजे चांदीची किंमत वाढवणे. त्यांनी शेणवीस सरळ सांगितले की आज चांदीचा भाव २८ रुपये शेर आहे. शेणवीही अभ्यास करूनच गेला होता. तो नाराजीने म्हणाला, “अहो सगळीकडे तर २३ रुपये शेर आहे चांदी.” मोरोपंत शांतपणे म्हणाले, “ इथे कोणालाही विचारा. रायगडावर चांदीचा भाव २८ रुपये शेर आहे.” बर आता २३ की २८ वरून परत मुंबईला जायचं आणि साहेबाच्या शिव्या खायच्या त्यापेक्षा जे काय मिळत आहे ते घेऊन टाकू असा विचार करून शेणवी चढ्या भावाने चांदी घेऊन मुंबईला परत आला.
गव्हर्नर जेराल्ड ऑन्जरने इस्ट इंडिया कंपनीला या संपूर्ण व्यवहाराचा जो अहवाल पाठवला त्यामध्ये त्याने लिहिले आहे –
“आम्ही राजा शिवाजीला तांबे विकले होते. त्या बदल्यात जी हुंडी मिळाली होती तिचा निकाल आज लागला आहे. जी चांदी सगळीकडे २३ रुपये शेराने विकली जाते ती राजा शिवाजीने आम्हांला २८ रुपये शेराने दिली. पण तब्बल दीड वर्ष चाललेले हे प्रकरण एकदाचे निकालात निघालेले आहे आणि या संपूर्ण व्यवहारामध्ये आम्हांला २२.५ टक्के तोटा झाला.”
इस्ट इंडिया कंपनीतर्फे मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेला जेराल्ड ऑन्जर हा अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस होता. मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या जाती-धर्माच्या लोकांना, व्यापारी, कलाकार आणि इतर अनेक प्रकारच्या व्यावसायिकांना स्थिरस्थावर होण्यासाठी त्याने अनेक उत्तम धोरणे राबविले होते. मुंबईसारख्या छोट्याश्या बेटाचा हरप्रकारे विकास करण्यासाठी त्याने भरपूर हातभार लावला होता. या जेराल्ड ऑन्जरने शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल लिहून ठेवले आहे –
जसा ज्युलिअस सीझर म्हणाला – I came! I saw!! I conquered!!! तसेच शिवाजी महाराजांनी इथे केले आहे. “He came! He saw!! He Overcame!!!”
शत्रूच्याही मनात स्वतःबद्दल असा आदरभाव निर्माण करणारा, रणांगणावर आक्रमकतेने तर राजपटलावर कुशलतेने आणि चातुर्याने डावपेच लढवणाऱ्या आपल्या राजाला टीम पोस्टमन तर्फे मानाचा मुजरा!
संदर्भ : ||शिवदशक|| – श्री. निनाद बेडेकर
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.