आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
क्रिकेट हा कधीकाळी फक्त पुरुषी खेळ समजला जात असे. पण, आज महिलांच्या क्रिकेटलाही तितकेच महत्व आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटीमध्येही आज महिला संघ खेळताना दिसतो. अगदी कोव्हीडच्या काळातही लखनऊच्या अटल बिहारी स्टेडियमवर महिलांच्या टी-ट्वेंटी सामन्याला मिलालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. तब्बल पन्नास वर्षाच्या प्रवासानंतर महिला क्रिकेट पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पोहोचले जिथे त्याचा उगम झाला होता.
पण अगदी पन्नास वर्षांपूर्वीचा विचार केला तर परिस्थिती काय होती? त्याकाळी महिला संघ बनवून त्यांचा सामना भरवेल असा विचारही दुरापास्त होता. पण, त्याकाळी एका व्यक्तीने महिलांच्या क्रिकेटसाठी स्वतःहून पुढाकार घेतला. आपल्या गावात मुलींचे संघ बनवले, त्यांना प्रशिक्षण मिळेल याची तजवीज केली आणि त्यांचे सामनेही भरवले. त्या एका व्यक्तीने जर असा आगळावेगळा विचार करून महिला संघ बनवले नसते तर कदाचित आजही स्त्रियांसाठी क्रिकेटमध्ये करिअर करणे हे एक दिवास्वप्नच ठरले असते.
आजपासून पन्नास वर्षापूवी एक व्यक्ती रिक्षातून हातात माईक घेऊन गावभर आज मुलींच्या क्रिकेटचा सामना होणार आहे, सर्वांनी हजर राहा अशी दवंडी देत फिरत होता. कोण होती ती व्यक्ती?
त्या व्यक्तीचे नाव होते महेंद्र कुमार शर्मा. त्यांनी पन्नास वर्षापूर्वी लखनऊच्या क्वीन्स अँग्लो संस्कृत कॉलेजच्या छोट्याशा मैदानावर एका शनिवारी हा सामना भरवला होता. भारतातील महिला क्रिकेटची ती सुरुवात होती.
शर्मा यांना महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एक संस्था देखील स्थापन करायची होती. त्याचीच सुरुवात त्यांनी एका छोट्या सामन्यापासून केली. रिक्षातून गावभर मुलींच्या क्रिकेट सामन्याची जाहिरात केल्यानंतर त्यांच्या या सामन्यासाठी अवघे २०० प्रेक्षक जमा झाले होते. त्यातही काही जण फक्त या उत्सुकतेपोटी जमा झाले होते की, मुली स्कर्ट घालून हा सामना कसा खेळणार हे त्यांना पाहायचे होते.
या सामन्यासाठी शुभंकर मुखर्जी नावाचा एक मुलगाही असाच प्रेक्षक म्हणून हजर होता. शुभंकरलाही क्रिकेटची आवड होती आणि, तो क्रिकेट खेळाडूही होता. सामन्यासाठी जो स्कोअर बोर्डवर स्कोअर लिहिण्यासाठी ज्या स्कोअररला बोलावले होते तो वेळेत आलाच नाही. मग शुभंकरलाच त्यादिवशी स्कोअररचे काम करावे लागले.
शर्माजींना महिलांच्या क्रिकेटसाठी अजून खूप मोठे काम करायचे होते, पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच महिलांच्या क्रिकेटलाही सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळावी याच उद्देशांनी त्यांनी हा सामना भरवला होता. अर्थात यानंतरही शर्मा यांनी अशा अनेक सामन्यांचे आयोजन केले होते. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच भारतीय महिला क्रिकेट संघाला डायना एडूल्जी, शांता रंगास्वामी आणि सुधा शाह यांसारख्या खेळाडू मिळाल्या आणि संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली.
१९७३ साली त्यांनी सोसायटी कायद्याअंतर्गत महिला क्रिकेट असोसिएशनची (डब्ल्यूसीएआय) स्थापना केली. पुढे २००६ साली ही असोसिएशन बीसीसीआयमधे विलीन करण्यात आली. या संघटनेच्या पहिल्या अध्यक्ष होत्या, बेगम हमिदा हबीबुल्लाह.
१९७३ नंतर भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय स्तरावरील सामने भरवण्यात येऊ लागले.
त्याच वर्षी वाराणसीमध्ये या टूर्नामेंटची दुसरी मॅच झाली, तर तिसरी कलकत्ता येथे झाली.
शर्मा यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी खूप कष्ट घेतले. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आपली लखनऊमधील वडिलार्जित संपत्ती देखील विकली. महिलांच्या क्रिकेटसाठी इतका मोठा त्याग करणारा हा अवलिया आज खूपच दुर्लक्षित राहिला आहे.
आज महिला क्रिकेट ज्या उंचीवर पोहोचले आहे, ते पाहून महेंद्र कुमार शर्मा यांना नक्कीच खूप आनंद वाटला असता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.