आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
२०१४मधे दिल्ली विद्यापीठातले अपंग प्राध्यापक साईबाबा यांना नक्षलवाद्यांच्या कृत्यात सहभागी असण्याच्या आरोपावरून कोर्टाने कठोर शिक्षा सुनावली. तेव्हा पहिल्यांदाच माझ्यासारख्या कित्येक लोकांना अर्बन नक्षल ही संज्ञा माहीत झाली. अगदी आपल्यात राहणारे, सुज्ञानी वाटणारे लोकही अशा मार्गाने क्रांतीच्या नावाखाली कायदा हातात घेतात, जीवितहानी घडवतात ही गोष्ट खूपच धक्कादायक होती. पण नंतरच्या काळात या खऱ्या केसेससोबतच खोट्या केसेसमधे अडकलेल्या निष्पाप लोकांच्या व्यथाही समजल्या.
शीतल साठे, सचिन माळी या दाम्पत्याची कथाही अशीच साशंक आहे. जे सचिन वाझे नाव सध्या बातम्यात खूप गाजतंय, त्या पोलीस अधिकाऱ्याला ज्या केसमधे सस्पेंड करण्यात आलं ती केसही अशीच आहे. ख्वाजा युनूस नेमका दहशतवादी होता की नव्हता हे सिद्ध होण्याच्या आधीच सचिन वाझे यांनी त्याची हत्या केली असं काहीसं चित्र तपासाअंती दिसतंय. त्याची आई अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
राजकुमार रावच्या शाहिद सिनेमातही अशा बऱ्याच खऱ्या केसेस आहेत. या आणि अशा कित्येक घटनांमुळे नेमकं आपण कुठली बाजू घ्यावी हे कळतच नाही. कधी वाटतं की या सगळ्या संशयितांची तमा न बाळगता त्यांना शिक्षा व्हावी तर कधी निरपराध लोकांना झालेली शिक्षा बघून आपण सगळ्यांना एकाच तराजून तोलतो याबद्दल गिल्ट मनात येतं. काय खरं माहीत नाही. पण या सगळ्यात न्यायव्यवस्थेचं अपुरेपण, त्यांची अकार्यक्षमता मात्र दोन्ही बाजू मान्य करावीच लागेल.
बस्स!हीच लाईन पकडून चैतन्य ताम्हाणेने आपल्या “कोर्ट” सिनेमाचा पाया रचला. भारतीय सिनेमाच्या इतिहासातला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त यश मिळवलेला सिनेमा म्हणून कोर्टकडे बघितलं जातं.
भारतातल्या जवळपास सगळ्याच समीक्षकांना आणि कलाकारांना हा सिनेमा खूप अंगांनी चौकटी मोडणारा वाटला. पण ज्या मराठी लोकांवरून प्रेरणा घेऊन ही कथा मराठी भाषेत बनवली गेली होती, त्यांनी मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. का?
जास्तीत जास्त लोकांची प्रतिक्रिया “अरे कहना क्या चाहते हो?” अशीच होती. कारण यात कोणी जिंकत नाही, कोणी हरत नाही. यात पार्श्ववंसंगीतही नाही, यातल्या पात्रांबद्दल काही तरी वाटेल अशी मुभा कॅमेरा देत नाही, भावनिक तर नाहीच आणि माहिती पटही नाही.
एका मुलाखतीत लेखक-दिग्दर्शकाला मुलाखतकार खूप खोदून विचारते की नेमकं काय म्हणायचं होतं? तू कुठली बाजू घेतोस? पण चैतन्य नम्रपणे सांगतो की प्रत्येकाचं आकलन वेगळं असू शकेल, आणि मला माझं आकलन सांगून त्यांना चुकीचं ठरवायचं नाही.
एखाद्या लेखकाने काहीतरी लिहिण्यासाठी समाजाचं कलात्मक निरीक्षण करावं तसं या सिनेमातला घटनाक्रम खूप सध्या पद्धतीने आणि नैसर्गिक गतीने पुढे जात असतो. या कथेत मारुती कांबळे नावाच्या लोककलाकाराच्या गीताला ऐकून एक स्वच्छता कामगार गटारात आत्महत्या करतो अशी कोर्ट केस असते. पोलिसांची बाजू धरून ठेवणारी स्पष्टवक्ती वकील, खोट्या केसेस मोफत लढणारा एक सामाजिक कार्यकर्ता वकील आणि जेष्ठ न्यायाधीश या मुख्य पात्रांनी ही कथा रंगवली आहे.
वास्तवाच्या एवढ्या जवळ जाणाऱ्या काही भयंकर दुर्मिळ सिनेमातही याची नोंद केली जावी. यातले कलाकार ना छाती बडवून रडतायत ना पोटतिडकीने संवाद फेकतायत. तुमच्या आमच्यासारखं सामान्य वागणं आणि त्यासाठीचं साजेसं प्रोडक्शन डिजाईन ही “कोर्ट”ची अजून एक विशेष गोष्ट. सगळं कमीत कमी व्यावसायिक कलाकार वापरून खऱ्या लोकेशन्सवरच शूट केलं केलं आहे. याच्या जोडीला अगदी आपण रस्त्याने चालताना आपण काहीही बोलत असलो तरीही जसे सामान्य आवाज कानावर स्पष्टपणे पडत असतात, तसंच इथं साउंड डिजाईन केलं आहे.
दूर असणाऱ्या लोकांच्या रँडम गप्पा, गर्दीचा आवाज, फॅनची करकर, पेपर्सचा आवाज, यात एवढं बारीक काम केलंय की हा आवाज सोडून कुठलं संगीत असावं अशी गरजही वाटत नाही.
यात खूप वाईड लेन्सचा वापर करून जास्तीत जास्त भाग खूप वेळ दाखवला आहे. मूळ सिन झाल्यावरही कॅमेरा बराच काळ तिथेच असतो.
कृत्रिम लाईट वापरून सोय करण्यापेक्षा सामान्यपणे जे जसं डोळ्यांना दिसतं तेवढंच न हलणाऱ्या फ्रेम्सवर दाखवलं गेलंय.
यात येणारे दोन शाहिरी जलसे संभाजी भगत यांचे आहेत. या सगळ्या तांत्रिक बाबींमधलं नावीन्य जरी समजून घेतले तरी या सिनेमाला मिळालेल्या नामवंत बक्षिसांमागचं कारण समजेल. सिनेमा काय सांगतो हा भाग एक क्षण बाजूला ठेवला तरी नेमकं कसं सांगितलंय? हे बघितलं तरी भारावून जाल एवढे बारकावे यात आहेत.
पण नेमकं यात सांगितलंय तरी काय? याचं माझं आकलन समीक्षेत देणं गरजेचं आहे. चित्रपटनिर्माते त्यांचा मुद्दा पटवून द्यायला मुख्य पात्राची कथा जास्त दाखवतात, त्याला जिंकवतात किंवा सहानुभूती द्यायला ते पात्र दिसलं की स्लो मोशन आणि मंद म्युजिक लावतात. जसं की “चक दे”मधलं शेवटचं गाणं. कोर्टमध्ये असं काहीच होत नाही. अगदी कुठल्याच पात्राचा वैयक्तिक दृष्टिकोन आपल्याला कळू नये म्हणून यात क्लोजअप शॉट्स नाहीत, यात जवळपास प्रत्येक सिनेमात न चुकता असणारा शोल्डर शॉट् एकदाही वापरला नाही.
एक पात्र भयंकर एकटेपणाच्या वेदनेतून रडत असतं, तेव्हा कॅमेरा त्याच्या जवळही जात नाही. केस जिंकली किंवा हरली की त्यानंतर यातून निघालेला निष्कर्ष (जो लेखकाला सांगायचा आहे) तोही दाखवला जात नाही ना म्युझिक लावून तशी कुठली दिशा दिली जाते. नारायण कांबळेंची लोककला, गाणे, समाजाला भडकवतात असं म्हणणारी वकील सहपरिवार “मराठी माणूस कोणाचीही आय माय काढु शकतो” असं सांगणाऱ्या प्रक्षोभक नाटकाची मजा घेत असते. तर अगदी स्वतःच्या खिशातले पैसे घालून मारुती कांबळेंसारख्या कित्येकांना वाचवायला धरपडत असणारा वकील मात्र स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात भयंकर एकटा असतो, पारिवारिक सुखांपासून अलिप्त असतो. जणू तो सोडून मजा मारणाऱ्या जगाला त्यांच्या चिंतेच कारण असलेलं सत्य दिसतच नसतं.
नारायण कांबळे या त्रासाला न घाबरता लढत असतो, त्याचं पुस्तक कोणी वाचेल की नाही माहीत नाही पण तो लिहीत असतो.
यातले न्यायाधीश संकुचित मानसिकतेचे एक अत्यंत असंवेदनशील आजोबा असतात. आरोप लावणारे आरोपी, समाजासाठी झगडणारे एकटे, लोकांसाठी काम करणारे मदतहीन आणि याचा न्याय देणारे असंवेदनशील – असं हे चक्र कोर्टाच्या खोलीत फुसकं ठरतं. यातल्या कोणालाच आपल्या मनासारखं वागता येत नाही, बरोबर काय आहे हे कळत नाही, आणि यातून कधी न्याय मिळेल हे ही कळत नाही.
आपण कुठे जातोय, यातून काय सिद्ध करायचंय हे माहीत नसताना एक ओळीत पळणाऱ्या मेंढरांसारखं चालणारी ही व्यवस्था निर्मात्यांनी उघडी करून समोर ठेवली आहे. यातून अर्थात आपल्याला कांबळेंसाठी सहवेदना वाटतात, पण पोलीस नेमकं कांबळेंच्याच मागे का पडलेत ? कांबळे खरंच काही न दिसणारा गुन्हा करतोय का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यातून मिळू नये अशी व्यवस्था चैतन्यने करून ठेवली आहे. आणि म्हणून या सगळ्यातून न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था जरी स्पष्ट दिसत असली तरी यातून एक बाजू योग्य दाखवून रेटून सांगण्याचा प्रयत्न निर्माते करत नाही.
एखाद्या विषयावर इतकं सखोल विवेचन करूनही बाजू न घेता आपल्या डोक्यासाठी खाद्य म्हणून एन्ड सोडून द्यावा तसा हा सिनेमा एका रँडम क्षणी संपतो. याचा शेवट “जॉली एल एल बी”प्रमाणे अपेक्षित प्रवाह सोडून काहीतरी सकारात्मक, आशादायी करता आला असता. पण तो चित्रपट होता, चैतन्य ताम्हाणेला जणू वास्तव दाखवायचं होतं. यामुळे एक आदर्श “प्रोपोगंडा सिनेमा” म्हणून कोर्टकडे नेहमी बघितलं जाईल.
हा सिनेमा पहिल्यांदा बघून लगेच मला काय वाटलं हे लिहिण्यापेक्षा मी खूप वेळेस, खूप अंतराने हा सिनेमा बघितला आणि होईल तितकं पूर्वग्रह दूषित मत टाळून काय वाटतं हे शोधलं. विदेशातल्या लोकांना यात काय दिसलं असेल त्याचा विचार केला. या विषयातलं सत्य किंवा या कथेतलं सत्य प्रत्येकाला वाटेल ते असू शकेल पण याची मांडणी अतिउच्च दर्जाची आहे.
कुठलीच बाजू न घेता व्यवस्था उघडी पाडण्याचा हा प्रयत्न दिसायला सहज असला तरी तो असा सहज वाटावा यासाठी चैतन्यने खूप मेहनत घेतली आहे, हे कळतं. त्याने बनवलेली ही त्याची एकच समान पद्धत त्याने कुठल्याही विषयाला लावली तरी सध्या बायोपिकचा पाऊस पडतोय तसा चांगल्या सामाजिक चित्रपटांचा पाऊस पडेल.
सामान्य प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाचं नीट मार्केटिंग झालं असतं तर माझ्या मते फँड्रीसारखा हा सिनेमासुद्धा घरोघरी पोहोचला असता.
जागतिक कीर्तीचे महान दिग्दर्शक अल्फान्सो क्यूरान यांनी चैतन्य ताम्हाणेचा दुसरा सिनेमा – “द डिसीपल” या प्रोजेक्टला पाठबळ दिलंय, आणि हा सिनेमाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव मोठं करतो आहे. शास्त्रीय संगीतावर यात कोर्टप्रमाणेच सविस्तर आणि सखोल कथा बघायला मिळाली. हे दोन्ही चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.