आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
‘बटरफ्लाय इफेक्ट’.
बटरफ्लाय इफेक्ट ही संकल्पना भौतिकशास्त्रात अतिशय प्रसिध्द आहे. या संकल्पनेनुसार फुलपाखराच्या पंख फडकावण्याच्या एका छोट्याशा कृतीने जगात त्सुनामी निर्माण होऊ शकते, ज्वालामुखीचे उद्रेक होऊ शकतात. थोडक्यात आत्ता क्षुल्लक वाटणारी एखादी घटना पुढे जाऊन खुप जास्त मोठा परिणाम घडवून आणु शकते. असंच काहीसं आपल्या स्वत:च्या जिवंत असण्यामागेही असावं, भुतकाळात जास्त महत्त्व नसलेलं परंतु वर्तमानकाळाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेलं.
आज आपण अशाच एका घटनेची आणि त्या घटनेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या एका व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत.
घटनेचा कालावधी आहे इ.स. १९६२. क्यूबन क्षेपणास्त्रीय संकट अमेरिकेवर कोसळले होते. त्याच वेळी एक रशियन पाणबुडी कॅरिबियन समुद्रात अमेरिकन नौदलाच्या नजरेस पडली. त्यावेळी अमेरिकन राष्ट्रपती केनेडींनी क्यूबावर पुर्ण निर्बंध घातले होते. कोणतीही सागरी वाहतुक त्यावेळी निर्बंधित होती.
ही रशियन पाणबुडी समुद्रात लपुन अमेरिकन नौदल पाणबुडीच्या शोधात पाण्यात हल्ले करत होते. पण या पाणबुडीमधे आण्विक क्षेपणास्त्रे होती याची पुसटशीही कल्पना अमेरीकेच्या नौदलास नव्हती.
आण्विक हल्ला करण्याची तयारी ‘व्हॅलेंटाईन सेव्हित्स्की’ नावाच्या कमांडरने केली होती. त्याने आण्विक क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी तयार करण्याचे आदेश दिले. त्याच्या दुसऱ्या कमांडरनेही या आदेशास दुजोरा दिला. अकरा अमेरिकन नौका त्यावेळी या आण्विक हल्ल्याच्या निशाण्यावर होत्या. या आण्विक क्षेपणास्त्रात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉंबएवढी शक्ती होती.
हळूहळू तणाव वाढत होता. पाणबुडीत तापमान १०० अंशांच्याही पुढे गेले होते. एसीने काम करायचे केव्हाच बंद केले होते. पाणबुडी वर काढण्याशिवाय दुसरा पर्याय कॅप्टनला दिसत नव्हता. इथेच आपला शेवट होणार असे सगळ्यांना वाटत होते. अमेरिकन नौदल सतत हल्ले करत होतेच. ग्रेनेडपेक्षाही जास्त क्षमतेचे बॉम्ब पाणबुडीच्या वेगवेगळ्या भागांवर फेकले जात होते. अशा वेळी सोव्हियत पाणबुडीच्या कॅप्टनने युध्द सुरू झाले असल्याचा अंदाज लावला आणि आता हे आण्विक क्षेपणास्त्र सोडल्याशिवाय काहीही पर्याय नाही असे सांगितले.
यावेळी जर सेव्हित्स्कीने हा आण्विक हल्ला केला असता तर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून आण्विक हल्लाच केला असता. याने खुप मोठ्या युद्धाची पर्यायाने विध्वंसाची सुरुवात केली असती असे तज्ज्ञ आजही सांगतात. असे काही झाले नाही त्याचे कारण होते एक समजदार, शांत स्वभाव असलेल्या व्यक्तीमुळे.
या व्यक्तीचे नाव होते- वासीली अलेक्झांड्रोविच आर्खिपोव.
त्यावेळी आर्खिपोवचे वय होते ३४ वर्ष. दिसायला आकर्षक असलेला आर्खिपोव सेव्हित्स्कीच्या समांतर हुद्द्यावर काम करत होता. कॅरिबियन समुद्रात उतरलेल्या ३ पाणबुड्यांपैकी एकाचा कमांडर असलेला आर्खिपोव अगदी शांत होता. या दुर्घटनेला थांबवण्यात त्याचे असलेले योगदान आता काळाच्या ओघात विसरले गेले असले तरीही तो या घटनेच्या केंद्रस्थानी होता असे त्याचे काही सहकारी आणि त्याची बायको सांगते.
सेव्हित्स्कीशी बोलून आर्खिपोवने आण्विक क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याचा त्याचा निर्णय बदलला असे त्यावेळी तिथं असलेल्या बाकीच्या लोकांचे मत होते. हे त्याने कसे केले याबद्दलची अगदी बारीक माहिती कोणाला माहीत नसली तरीही कमांडर असलेल्या आर्खिपोवने हा हल्ला थांबवला असे सगळे जण सांगतात.
रशियन सदस्यांना समुद्राच्या वरती नेमकं काय चालू आहे हे कळत नव्हतं. खरे तर त्यांना सरळ क्युबाला जाण्याचे आदेश होते, परंतु मधेच त्यांना थांबून कॅरिबियन समुद्रात वाट बघण्यास सांगितले गेले. त्यावेळी रशियाने बेटांवर पाणबुड्यांद्वारे क्षेपणास्त्रे आणल्याची बातमी रेडिओ स्टेशन्सवर झळकली, त्याच वेळी क्यूबाने अमेरिकेचे गुप्तचर जहाज उडवून लावल्याची बातमी आली. जेव्हा अमेरिकन नौदलाला पाणबुड्या दिसल्या तेव्हा सेव्हित्स्कीने त्यांना खोल पाण्यात घेऊन जाण्याचे आदेश दिले.
पण त्यांची संपर्कयंत्रणा बिनकामी झाली आणि त्यांचा रशियन यंत्रणेशी काहीही संपर्क झाला नाही आणि म्हणुनच युद्धाची सुरुवात झाली असावी असा अंदाज बांधून त्यांनी आपल्याकडे असणारी आण्विक क्षेपणास्त्रे सज्ज केली.
यावेळी तीन कमांडरमध्ये किती वेळ आणि काय चर्चा झाली हे नक्की माहित नाही. सेव्हित्स्कीच्या मते हल्ला करणे गरजेचे होते. त्याच वेळी अमेरिकन राष्ट्रपती केनेडीसुध्दा संभ्रमात होते.
अमेरिकेने पाणबुडीच्या शोधासाठी केलेले हल्ले युद्धासाठी आहेत असा गैरसमज रशियन करुन घेतील ही त्यांची भिती सेव्हित्स्कीच्या रुपात खरी ठरत होती.
त्याच वेळी उच्चस्तरीय रशियन यंत्रणेला याची काहीच कल्पना नव्हती. पाणबुडीत असलेल्या सैनिकांचे हाल होत होते. वाढलेल्या तापमानाने तर काहींना चक्कर यायला लागली होती. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाणही वाढले होते. इलेक्ट्रिक लाईटचे साठेही संपत चालले होते. परिस्थिती अतिशय बिकट आणि जीवघेणी झाली होती.
अशावेळी आर्खिपोव आणि कॅप्टन यांच्यादरम्यान चर्चा झाली. बिकट वातावरणात झालेली ही चर्चा मोठा अनर्थ टाळण्यासाठी गरजेची होतीच. वातावरण अवघड असुनही आर्खिपोवने आपला संयम राखला. हा युद्धकालीन हमला नसुन केवळ चेतावणी आहे हे त्याने कॅप्टनला समजावून सांगितले.
आर्खिपोवचे ऐकुन कॅप्टनने सज्ज केलेल्या आण्विक क्षेपणास्त्रांना पुन्हा बंद केले आणि समुद्राच्या पृष्ठभागावर पाणबुडी आणली. पाणबुडी दिसताच अमेरिकेने पुढे येऊन चौकशी केली. पाणबुडी तपासली न गेल्याने तिच्यात आण्विक क्षेपणास्त्र होते याचा सुगावा अमेरिकेला त्यावेळी लागला नाही. रशियन्सनी पाणबुडी क्युबाला न नेता पुन्हा उत्तरेकडे आपला मोर्चा वळवला आणि रशियाला पोहचले.
मागे वळून पाहिले तर एवढा मोठा अनर्थ टळला त्याचं कारण होता आर्खिपोव. संयम आणि कणखरता या दोन्ही गुणांचा वापर करून त्याने कॅप्टनचे मतपरिवर्तन घडवून आणले. आर्खिपोवच्या या कृत्याने पुढे जाऊन सगळ्या जगाला त्रासदायक ठरू शकणाऱ्या मोठ्या विध्वंसापासुन हे जग वाचले. म्हणुनच आज मोकळा श्वास घेत असलेले आपण आणि आपल्या आसपासचे बरेच जण यांच्या अस्तित्वाचं मोठं श्रेय प्रमाणात आर्खिपोवला दिलं जातं.
या ऐतिहासिक घटनेत त्याचे असलेले योगदान बघुन कोणीही ही बाब नाकारणार नाही हे नक्कीच..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.