आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
२०१८ साली उत्तर प्रदेशच्या पोलीसांनी सरकारविरोधात निदर्शने करण्याचे योजले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी सरकारविरोधात आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने घडवून आणलेल्या एन्काऊंटरच्या विरोधात कारवाई करण्याचे सरकारने आदेश दिल्याने पोलीस सरकारच्या विरोधात उतरले होते. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला होता.
सतत गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेला उत्तर प्रदेशचा भाग भारताचे क्राईम सेंटर म्हणून ओळखला जातो. इथे पोलीस, नेते आणि गुंड यांच्यातील संघर्ष वेळोवेळी चव्हाट्यावर येत असतात. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी देखील बऱ्याचदा कायदा धाब्यावर बसवला आहे.
एकदा तर उत्तर प्रदेशातील पोलीस दलाने आपल्या सरकारच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले होते. हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड होते. एवढेच नाही तर, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारला लष्कराला पाचारण करावे लागले होते.
१९७३ साली पोलीस दलाच्या PAC अर्थात प्रोव्हेंशियल आर्मड कॉम्टेबुलरी विभागाच्या जवानांनी ‘मे १९७३’ मध्ये बंडाचे अस्त्र उगारले होते. या बंडाला ‘PAC बगावत’ म्हणून ओळखले जाते. या बंडामुळे उत्तर प्रदेशात गावोगावी पोलीस दल कोलमडून पडण्याचा धोका निर्माण झाला होता. हे बंड मोडून काढण्यासाठी प्रशासनाला पाच दिवसांचा कालावधी लागला होता. हा बंड दाबण्यासाठी मिलिटरी व इतर राज्यातील पोलीस दलाचे सहाय्य घेण्यात आले होते.
एमबी चंदे यांनी आपल्या ‘पोलीस इन इंडिया’ या १९९७च्या पुस्तकात या बंडाचे पूर्ण वर्णन केले आहे. पुस्तकात लिहिले आहे की आर्मीने काही दिवसांतच PACच्या उत्तर प्रदेशातील सर्व ठाण्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. हे बंड मोडून काढायला गेलेल्या आर्मीची त्या PAC च्या जवनांशी चकमक झाली होती, या चकमकीत ३० पोलीस मारले गेले होते.
शेकडो PAC जवानांना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या ६५ केसेसखाली ७९५ पोलिसांवर खटले चालवले गेले होते. १४८ पोलीस जवानांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली गेली होती. काहींना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली गेली होती.
सेनेच्या जवानांवर गोळीबार करणाऱ्या ५०० पोलिस अधिकाऱ्यांची व जवानांची नोकरी या घटनेमुळे गेली होती. अजून १००० जणांची नोकरी जाणार होती पण संविधानातील कलम ३११ मध्ये अशा कृतिसाठी नोकरीवरून काढण्या ऐवजी पदोन्नती रोखणे अथवा पदावनती करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याने त्यांना नोकरीवरून न काढता त्यांच्या पदाची पातळी घसरवण्यात आली.
उत्तर प्रदेशातील पोलिसांनी बंड का पुकारले होते?
PAC विभागाच्या पोलीस जवानांमध्ये असंतोष खदखदत होता. PAC मधे ऑफिसरच्या पोस्टिंगसाठी अत्यंत चुकीच्या व भ्रष्ट पद्धतीचा वापर केला जात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. PAC मधील जवानांना अधिकारी आपल्या पर्सनल कामासाठी वापरत व त्यांना नोकरासारखी वागणूक देत याचा त्या जवानांना राग आला होता.
PAC बटालियनची निर्मिती चुकीच्या आधारावर झाल्याने त्यात सुसूत्रता नव्हती. राजकीय नेत्यांनी देखील PAC जवानांच्या तोंडाला वेळोवेळी पाने पुसल्याने जवान अधिकच नाराज होत गेले.
राजकीय नेत्यांप्रमाणे पोलीस सचिवालय देखील PAC च्या पोलीस कर्मचारी वर्गाकडे दुर्लक्ष करत होते. PAC च्या पोलीस कर्मचाऱ्यांना साध्या सोयी सुविधा पुरवण्यात देखील पोलीस विभागाकडून व प्रशासनाकडून दिरंगाई केली जात होती. त्यांच्या कल्याणासाठी कुठल्याच निर्वाह भत्त्याची अथवा योजनेची आखणी सरकारने केली नव्हती.
इतक्या मोठ्या समस्या व असंतोषामुळे या PAC पोलिस अधिकाऱ्यांनी बंड पुकारले होते. राजकीय अनास्था व प्रशासकीय दुरावस्था ही तितक्याच प्रमाणात या बंडाला कारणीभूत ठरली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.