आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहोत. शॉपिंगपासून रस्ता शोधण्यासाठीही अगदी प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाची मदत गरजेची झाली आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे म्हटले तरी त्या ठिकाणाची सगळी माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळते. अगदी रस्ता शोधण्यासाठीही जीपीएसची मदत घेता येते.
आपल्याला रस्ता दाखवणारी जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नेमकी अस्तित्वात आली तरी कशी? जाणून घेऊया जीपीएसच्या जन्माचा इतिहास या लेखातून.
जीपीएसच्या जन्माचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला १९५७ सालापर्यंत मागे जावे लागेल. १९५७ साली रशियाने स्फुटनिक नावाचा आपला पहिला उपग्रह अंतराळात सोडला. दुसऱ्या महायु*द्धानंतर अमेरिका आणि रशियात शीतयु*द्ध सुरु होते. त्यामुळे रशियाच्या या कामगिरीने अमेरिकेला चांगलाच घाम फुटला. हा उपग्रह तसा कुणासाठीच हानिकारक नव्हता पण अमेरिकेला असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासल्याने त्यांनी या तंत्रज्ञानावर अधिक संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका सॅटेलाइटच्या सहाय्याने दुसऱ्या सॅटेलाइटचा माग काढता येतो हे लक्षात आले. यालाच शास्त्रज्ञांनी डॉप्लर इफेक्ट असे नाव दिले.
अमेरिकेने या डॉप्लर इफेक्टचा वापर आपल्या लष्करासाठी करून घ्यायचे ठरवले. या डॉप्लर इफेक्टनेच जीपीएस तंत्रज्ञानाचा पाया रचला.
१९५९ साली अमेरिकने यासाठी आणखी काही उपग्रह आकाशात सोडले. त्यांनी आधी ६ आणि नंतर १० उपग्रह अवकाशात सोडले. या उपग्रहाद्वारे दिल्या जाणाऱ्या संकेतांचा वापर त्यांनी आधी आपल्या नौदलासाठी केला. या उपग्रहांद्वारे अमेरिकेने पहिल्यांदा नॅव्हिगेशनचा वापर सुरु केला. याच्या सहाय्याने त्यांच्या रस्त्यांवरच्या वाहनांचा, समुद्रातल्या पाणबुड्या आणि आकाशातील विमानांचाही माग काढता येऊ लागला. आकाशातून आपल्याला शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते का यासाठीही अमेरिकेने प्रयोग सुरु केले.
यावर बरीच वर्षे प्रयोग सुरु होते मात्र, १९७४ साली यात पहिल्यांदा यश मिळाले. यासाठी अमेरिकेने एकामागून एक २४ उपग्रह अवकाशात सोडले होते. या २४ उपग्रहांचे काम होते पृथ्वीवर लक्ष ठेवणे.
अमेरिकेने या प्रोजेक्टला नॅवस्टार असे नाव दिले. अमेरिकेचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नॅव्हिगेशन तंत्रावर अमेरिकेने पूर्ण नियंत्रण मिळवले. परंतु, अमेरिकेने हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले केले नव्हते. अमेरिका हे तंत्रज्ञान फक्त आपल्या लष्करासाठीच वापरत असे.
त्यानंतर घडलेल्या एका अपघातामुळे अमेरिकेला चांगलाच हादरा बसला आणि अमेरिकेने हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच सामान्य नागरिकांसाठीही अमेरिकेने हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले नव्हते. मात्र एका अपघातामुळे हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्याची वेळ आली. त्यामुळेच कळू शकले की सर्वसामन्यांसाठी देखील हे तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे.
३ मे १९८३ रोजी अमेरिकेचे एका प्रवासी विमान दक्षिण कोरियाच्या दिशेने जात होते. अमेरिकेकडे जीपीएस तंत्रज्ञान असूनही फक्त लष्करासाठीच हे तंत्रज्ञान वापरण्याच्या अट्टाहासापोटी प्रवासी विमानांत हे तंत्रज्ञान बसवले जात नव्हते. त्याकाळी कंप्युटरच्या मदतीने वैमानिकांना दिशा सापडत असे.
पण त्यादिवशी अमेरिकेच्या त्या प्रवासी विमानातील कंप्युटर बिघडल्याने वैमानिकाला दिशा ओळखता आली नाही आणि रस्ता भरकटल्याने हे विमान रशियाच्या हद्दीत घुसले. अमेरिका आणि रशिया दरम्यानचे शीतयु*द्ध त्यावेळी टोकाला पोहोचले होते. त्यामुळे चुकून आलेल्या या विमानाची कुठलीही चौकशी न करता रशियाने हे विमान पाडले.
रशियाला वाटले हे विमान हेरगिरी करण्याच्या उद्देशाने आपल्या हद्दीत आले असावे. या विमानात एकूण २६९ प्रवाशी होते. दुर्दैवाने यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेने अमेरिका चांगलीच हादरून गेली आणि तिने हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्याचे ठरवले. अमेरिकेत आजही ३ मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या तंत्रज्ञानाचा वापर नागरी सुरक्षेसाठीही करता येईल का यावर संशोधन करण्याची परवानगी दिली आणि मग या तंत्रज्ञानाचा उपयोग व्यापक स्तरावर करता येईल याचा अभ्यास सुरु झाला. यासाठी अमेरिकन संशोधकांनी प्रचंड मेहनत घेतली.
२६९ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर अमेरिकेने हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी १० वर्षांचा कालावधी जावा लागला शिवाय सर्वांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करायचे तर त्यासाठी या तंत्रज्ञानात आणखी काही आवश्यक बदल करणे गरजेचे होते. ज्याला सुमारे १० अब्ज डॉलर्स इतका खर्च आला.
सर्वसामान्य लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचवण्यासाठी अमेरिकेने १९९५ साली खाजगी कंपन्यांशी करार केला. पुढे २००० साली ही सेवा पूर्णतः मोफत दिली जाऊ लागली.
आज आपण हे तंत्रज्ञान अगदी मोफत वापरतो. कधीही, केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळ याचा उपभोग घेऊ शकतो. पण, या जीपीएससाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असतात.
जीपीएसची सेवा चोवीस तास अखंडित पुरवण्यासाठी अवकाशातील २४ सॅटेलाईट्सशी संपर्क ठेवावा लागतो. यासाठी वर्षाला ७५० मिलियन डॉलर्स इतका खर्च येतो. मग कोण करते हा एवढा भला मोठा खर्च? तर आपल्याला जीपीएस सेवा पुरवणाऱ्या कंपन्या हा खर्च करतात.
कारगिल यु*द्धाच्या वेळी भारताला या तंत्रज्ञानाची खूप गरज होती. पण, अमेरिकेने तेव्हा भारताला हे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला.
त्यावेळी जर अमेरिकेने मदत केली असती तर आपल्या सैन्याची मोठ्या प्रमाणावर झालेली हानी टळली असती. कारण, प्रत्यक्ष यु*द्धाला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने भारतीय भूमीतील अति उंच ठिकाणी कब्जा करून तिथे सुरुंग पेरले होते. ज्याचा शोध घेणे त्याक्षणी खूपच गरजेचे होते. मात्र हे तंत्रज्ञान त्यावेळी भारतीयांना मिळू शकले नाही.
लष्करासाठी म्हणून शोध लावण्यात आलेले हे खास तंत्रज्ञान आज प्रत्येकासाठी खूपच लाभदायक ठरत आहे. भूगर्भातील बदलांचा वेध घेणेही यामुळे आता सहज शक्य झाले आहे. त्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची आधीच माहिती मिळू शकते. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित आणि आर्थिक हानी टाळता येऊ शकते. भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूपच फायदा होत आहे.
जीपीएसच्या या छोट्याशा तंत्राने आपल्या जीवनावर मात्र खूपच खोलवर परिणाम केला आहे हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.