आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कोणे एके काळी वाळवंटात राहणारे हे अरब लोक जगात सर्वांत गरीब समजले जायचे. सौदी अरेबियाचे वाळवंट आणि त्या वाळवंटात शिकार करून उपजीविका करणाऱ्या अरबांच्या सुरस कहाण्या आजही सांगितल्या जातात. अगदी आत्ता-आत्तापर्यंत अरब हे अत्यंत गरिबी आणि हलाखीचे जीवन जगत होते. पण, आज हेच अरब देश जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी काही बनले आहेत. आता हा एवढा कायापालट कुठून झाला? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
वाळवंटात राहणाऱ्या अरबांना पाण्याचीच किंमत जास्ती, त्यामुळे त्याव्यतिरिक्त जमिनीत काय आहे याच्या भानगडीत ते पडले नाही. अमेरिकेच्या काही उद्योजकांना इकडे तेल असल्याची खबर मिळाली आणि तेव्हा सगळ्यांचं लक्ष अरबस्तानाकडे वळलं. सौदी अरेबियामध्ये पहिली तेलाची खाण सापडली आणि या अरबी देशांचे नशीबच पालटले. नंतर अनेक पाश्चात्य कंपन्या तिथे आल्या आणि अरबी देशांची भरभराट सुरू झाली.
आज वाळवंटातले हे शेख जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची मोजदाद करणे कोणालाही शक्य नाही, या लोकांकडे असलेली संपत्ती दर्शवण्यासाठी सांगितले जाते की एखादा शेख त्याच्या रोल्स-रॉइस मध्ये जर सिगरेटची राख चुकून सांडली तर तो दुसरी रोल्स-रॉइस विकत घेतो.
आता शेख म्हटल्यानंतर मुस्लिम देशात राहणारा प्रचंड श्रीमंत अशी मुस्लिम व्यक्ती डोळ्यासमोर येते. पण, शेख ही खरंतर एक मानाची पदवी आहे आणि ती अरब देशात राहणाऱ्या श्रीमंत अन अधिकाराच्या पदावर असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला दिली जाते. आता हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक हिंदू माणूस ही “शेख” पदवी मिरवतो.
ओमानमध्ये राहणारे कनक खिमजिभाई हे जगातील एकमेव हिंदू शेख आहेत ज्यांना शेख ही पदवी ओमानच्या सुलतानाने दिली आहे. यांचे ओमानच्या राजघराण्याबरोबर अत्यंत जवळचे संबंध आहेत.
कनक खिमजी मूळचे गुजरातमधील कच्छ प्रांतात राहणारे. गुजराती माणसाचा मूळ स्वभाव व्यापाराचा असतो. गुजरात सोडून अनेक देशांमध्ये गुजराती लोकांनी आपले बस्तान बसवलेले आहे. ओमानसारख्या अरब देशामध्ये जिथे अल्पसंख्यांक लोकांना फारसे चांगले वागवले जात नाही अशा देशामध्ये जाऊन राहणे, तिथे व्यापार करणे, तिथल्या राजाबरोबर जवळचे संबंध प्रस्थापित करणे आणि तिथल्या राजाकडून शेख अशी मानद पदवी मिळवणे हे सोपे काम नाही पण कनक खिमजिभाई यांनी ते करून दाखवलं.
कनक खिमजी यांचे आजोबा खिमजी रामदास १८७० साली ओमानमध्ये व्यापार करण्यासाठी आले होते. ते भारतातून मीठ-मिरची, मसाल्याचे पदार्थ, सुगंधी वस्तू, रेशीम कापड घेऊन ओमानमध्ये विकत असत आणि ओमानमधील खजूर, लोबान अशा पदार्थांची आयात करून ते पदार्थ भारतात विकत असत. या व्यवसायामध्ये त्यांना चांगला नफा झाला.
त्यांनी स्वतःची रामदास ग्रुप ऑफ कंपनीज नावाची कंपनी ओमानमध्ये स्थापन केली. ही कंपनी पुढे बरीच विस्तारली.
भारतातील वस्तू आयात करून ओमानमधील वस्तू भारतात निर्यात करणे हा या कंपनीचा मुख्य व्यवसाय होता.
हळूहळू या कंपनीने ओमानमध्ये चांगले बस्तान बसवले. कंपनीमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार दिला. खिमजी यांचे त्यावेळच्या सुलतानाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी फायनान्सर म्हणून देखील राजघराण्याला त्यावेळी मदत केलेली होती. हे संबंध मागच्या तीन पिढ्यांपासून अत्यंत सौहार्दपूर्ण राहिलेले आहेत.
आज कनक खिमजी हे या तिसऱ्या पिढीच्या मैत्रीचे साक्षीदार आहेत. ओमानमध्ये त्यांना मोठी प्रतिष्ठा आहे. आज रामदास ग्रुप ऑफ कंपनीने ओमान सकट बाकीच्या गल्फ कंट्रीजमध्ये आपले बस्तान बसवले आहे.
ओमानमधील वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षपदी देखील कनक खिमजी विराजमान आहेत. ओमान देशाचा व्यापार इतर देशांबरोबर कसा वाढला पाहिजे आणि त्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत यासाठी ते ओमानच्या सुलतानाला आणि इतर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.