आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जीवन खूपच वादळी राहिले. त्यांना एकीकडे दुर्गा, आयर्न लेडी अशा उपाध्याही देण्यात आल्या आणि दुसरीकडे हुकुमशहा, म्हणन दुषणेही लावण्यात आली. त्यांचे खाजगी आणि सार्वजनिक जीवनातही अनेक उलथापालथी घडल्या ज्यावर आजही अनेक मतमतांतरे आहेत.
पंडित नेहरू सतत स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त असल्याने, अनेकदा तुरुंगवासात असल्याने इंदिरांना बालपणी त्यांचा प्रत्यक्ष सहवास खूप कमी लाभला. आई कमला नेहरू यादेखील स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होत्या. स्वतः इंदिरा गांधीही या प्रभावापासून दूर राहू शकल्या नाहीत. त्यांनीही लहानपणीच आपल्यातील नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवली होती.
स्वदेशीच्या प्रसारासाठी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला होता. १९३० साली असहकार आंदोलना दरम्यान त्यांनी मुलांच्या साथीने ‘वानर सेना’सुद्धा उभी केली होती.
१९४२ साली “चले जाओ” आंदोलनात सहभाग नोंदवून त्यांनी देखील तुरुंगवास भोगला होता.
स्वातंत्र्य चळवळीचे आणि देशसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने पुढील जीवनातही त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले. खरेतर या सगळ्या धामधूमीपासून दूर एक साधेसुधे आयुष्य जगण्याची इंदिराजींची खूप इच्छा होती. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
इंदिराजी उच्च शिक्षणासाठी जेंव्हा ब्रिटनला गेल्या तेंव्हा तिथेच त्यांना फिरोज खान भेटले. थोड्याच कालावधीत त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. याच काळात कमला नेहरूंचे, म्हणजेच इंदिरा गांधींच्या आईचे, देहावसान झाल्याने बसलेल्या धक्क्यामुळे त्या फार एकट्या पडल्या होत्या.
अशात फिरोज खान यांची मैत्री या एकाकीपणातून सावरण्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर त्यांनी विवाह बंधनात केले.
वास्तविक नेहरुंना इंदिरा आणि फिरोज खान यांचा विवाह अजिबात मान्य नव्हता. फिरोज खानबद्दल नेहरूंचे मत फारसे चांगले नव्हते. खुद्द महात्मा गांधी देखील या विवाहाच्या विरोधात होते. इंदिरा आणि फिरोज गांधी यांचा विवाह हा आंतरधर्मीय विवाह होता.
फिरोज खान हे पारसी होते, काहींच्या मते ते मुस्लिम होते. या काळात मुळातच सांप्रदायिक द्वेषाने टोक गाठले होते. तेंव्हा पंडित नेहरूंच्या, ज्यांना महात्मा गांधींच्या खालोखाल देशात एक लोकमान्य नेता म्हणून पसंती दिली जात होती, त्यांच्या मुलीने एका गैर हिंदूशी विवाह करणे ही बाब सामान्य जनतेला अजिबात पटत नव्हती.
खुद्द नेहरू आणि गांधीही जनतेच्या मताशी सहमत होते. इंदिरांनी फिरोजशी विवाह करू नये, अशा आशयाची अनेक पत्रं देशाच्या कानाकोपऱ्यातून नेहरूंना येत होते.
शिवाय, या काळात इंदिराजींची तब्येतही नादुरुस्त होती, यामुळेही नेहरूंना इंदिराजींनी आधी स्वतःच्या तब्येतीकडे ध्यान द्यावे लग्नाची घाई करू नये असू वाटत होते. शिवाय, इंदिरा हे त्यांचे एकमेव अपत्य होते.
सगळीकडून विरोध असतानाही इंदिराजी फिरोजशी विवाह करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि २६ मार्च १९४२ रोजी फिरोज गांधी आणि इंदिराजी विवाह बंधनात अडकले. परंतु नेहरू आणि महात्मा गांधी यांनी या विवाहापूर्वी एक अट ठेवली होती.
ती अट अशी होती की, या विवाहानंतर इंदिरा किंवा फिरोज या दोघांपैकी कुणाचेही धर्मांतर होणार नाही.
हा विवाह त्यांच्या आश्रमातच झाला पाहिजे, असाही महात्मा गांधींचा आग्रह होता. इंदिरा गांधीच्या विवाहासाठी महात्मा गांधींनी स्वतः आपल्या हाताने विवाह विधी लिहिला. परंतु नेहरुंना हा विधी खूपच लांबलचक वाटला. म्हणून त्यांनी पारसी विवाह पद्धती आणि वैदिक विवाह पद्धती यातील समान रीतीरिवाज घेऊन अत्यंत सध्या पद्धतीने हा विवाह करण्याचे ठरवले.
लग्नापूर्वीच पंडित नेहरूंनी हे पक्के केले होते की काही झाले तरी इंदिराजींचे धर्मपरिवर्तन होणार नाही.
लग्नानंतरही इंदिरा गांधी हिंदूच राहिल्या पाहिजेत यासाठी नेहरूंनी त्याकाळातील प्रख्यात ज्योतिषाचार्य पंडित लक्ष्मीधर शास्त्री यांना सांगून असा विधी तयार करून घेतला ज्यात दोन्ही धर्मातील मूळ रीतीरिवाज असतील.
नेहरूंच्या मते वैदिक धर्म आणि पारसी धर्म यांचा उगम एकाच तत्वज्ञानातून झाला आहे. म्हणून या दोन्ही धर्मातील समान मुल्ये शोधून त्यानुसार लग्नाचे विधी तयार केले जावेत.
लक्ष्मीधर शास्त्री यांना १६ मार्च १९४२ रोजी लिहिलेल्या पत्रात पंडित नेहरू म्हणतात, ”या विवाह सोहळ्यातील एक महत्वाची बाजू म्हणजे हा विवाह एक हिंदू आणि गैर हिंदू यांच्यामध्ये होत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पारसी धर्मातील अनेक लग्न विधी या हिंदू धर्मातील लग्न विधीप्रमाणेच आहेत.
कारण दोन्ही धर्माचा उगम एकाच ठिकाणाहून झाला आहे. तरीही हा विवाह एक हिंदू आणि गैर हिंदू यांच्यातील आहे, हे देखील सत्य आहे. म्हणून लग्नानंतरही वधू-वरांचे धर्म परिवर्तन होणार नाही, याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.
म्हणून या लग्नासाठी असा विधी तयार केला जावा जो हिंदू आणि गैर हिंदू असा दोघांसाठीही अनुकूल असेल. एक गोष्ट ध्यानात घ्या की येत्या काळात देशात जेंव्हा आंतर धर्मीय विवाह होतील तेंव्हा हा विवाह त्यांच्यापुढे एक आदर्श ठरू शकतो.” लग्नानंतर मात्र फिरोझने आपले आडनाव बदलून गांधी असे ठेवले.
म्हणूनच पारसी व्यक्तीशी लग्न करूनही इंदिराजींचे धर्मांतर झाले नाही. ऑपरेशन ब्लू स्टार घडवून आणल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या अंगरक्षकांनीच ३१ ऑक्टोबर १९८४ साली त्यांचा खून केला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा अंत्यविधीही हिंदू रीतीरिवाजानुसारच करण्यात आला.
इंदिरा गांधींचे डॉक्टर के. पी. माथुर यांनी इंदिराजींच्या जीवनावर आधारित “द अनसीन इंदिरा गांधी” असे पुस्तक लिहीले आहे. त्यानुसार पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर इंदिराजी जेंव्हा प्रधानमंत्री निवासात राहण्यासाठी गेल्या तेंव्हा त्यांनी त्या निवासात एक छोटेसे देवघर बनवून घेतले होते. या देवघरात त्या नियमित रित्या पूजापाठ करत आणि चटइवर बसूनच पूजा करत. पंतप्रधानात निवासात त्या होम-हवन देखील करत असत.
त्या नेहमीच स्वतःला हिंदू समजत. त्या मानाने आणि कर्माने हिंदूच होत्या. अनेक लोकांच्या हा गैरसमज आहे की, पारसी व्यक्तीशी विवाह केल्याने इंदिरा गांधींनी पारसी धर्म स्वीकारला होता. परंतु ही ही बाब धांदात खोटी आहे.
धर्मनिरपेक्ष देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर मात्र त्यांनी नेहमीच सर्वधर्मसमभावाचा पक्ष घेतला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.