आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कालपर्यंत ज्याची खिल्ली उडवली आज तो हिरो आहे उद्या पुन्हा तो पायदळी तुडवला जाईल. भारतीय मानसिकता अशीच आहे. असो.
भारत पाकिस्तान दुश्मनीमधील हत्यार आधीही आयएसआय विरुध्द रॉ/आयबी होते, आताही आहे आणि पुढेही राहील. या दोन एजन्सीची युद्धभूमी भारत आणि पाकिस्तान आहेच शिवाय बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, इराण, चीन इत्यादी ठिकाणांहून देखील ते लढलं जातं.
भारतात प्रवेशासाठी कश्मीर, नेपाळ, बांग्लादेशचा वापर पाकिस्तान करतो तर अफगाणिस्तान, नेपाळ, बांग्लादेशातून भारतीय एजंट पाकिस्तानचा रस्ता पकडतात.
शत्रूची बलस्थानं आणि कमजोरी विषयी माहिती जमा करणे, असंतोषाला खतपाणी घालणे, आर्थिक, सैनिकी, शैक्षणिक बलस्थानांवर वार करणे, राजकीय अस्थिरता निर्माण करणे, प्रसारमाध्यमांचा, चित्रपटांचा वापर करून स्वराष्ट्राला पुरक भावना निर्माण करणे, दहशतवादी हल्ले करणे इ. अनेक कामगिऱ्या हे एजंट्स करीत असतात.
गुप्तहेर कुणीही असू शकतं. पत्रकार, नेते, शिक्षक, सैनिक, पोलीस, उपयोगी पडेल असा कोणीही. कित्येकदा आपण परराष्ट्रासाठी हेरगिरी करतो आहे याची कल्पना देखील संबंधित माणसाला नसते कारण त्याचा हॅन्डलर स्थानिक माणुस असु शकतो.
भारत, पाकिस्तानला, मुख्यतः आर्थिक आणि राजकीय स्तरावर सपशेल हरलेल्या पाकिस्तानला समोरासमोरील युद्ध परवडणारे नसल्यामुळे याप्रकारे एकमेकांना रक्तबंबाळ केले जाते.
रॉ आणि आयएसआयची तुलना केली तर आयएसआयचे पारडे इतिहासात जड होते. ते असण्याचे कारण म्हणजे उत्पन्नाचे सोर्स आणि स्वायत्त्तता यांमधील फरक. मध्यंतरी मी एक अहवाल वाचला होता त्या अहवालानुसार पाकिस्तानी सैन्याकडे आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्वतःच्या मालकीच्या मोठमोठ्या उद्योग कंपन्या आहेत, त्याशिवाय पाकिस्तानी आर्मी प्रामुख्याने जमिनींचे व्यवहार करते. आर्थिक मंदीमुळे मध्यंतरी पाकिस्तानी आर्मीने ताब्यात असलेल्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली आहे.
‘Military Inc: Inside Pakistan’s Military Economy’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक पाकिस्तानी पत्रकार आणि लेखिका आयेशा सिद्दीकी यांनी लिहिले असून त्यात त्यांनी पाकिस्तानी आर्मी आणि त्यांच्याशी निगडित ‘डीएचएकडे (डिफेन्स हौसिंग एजन्सी)’ देशातील एकूण जमिनीपैकी १२ टक्के भूभाग असल्याचे उघड केले आहे. यातील बहुतांश भूभाग हा पाकिस्तानी सैन्यातील उच्चपदस्थ लोकांकडे असून या जागा त्यांनी देशाच्या जनतेला बंदुकीचा धाक दाखवून बळकावल्या आहेत असे अनेक खुलासे आयेशा सिद्दीकींनी केले आहेत. संरक्षण आणि युद्ध सोडल्यास पाकिस्तानी आर्मी सर्व काही करते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जमिनी बळकावण्यात पराक्रम करणारं सैन्य मात्र अवघ्या १६ दिवसांत शरणागती पत्करत!
भारतीय लष्कर आणि रॉ आर्थिक बाबतीत सरकारवर अवलंबून आहे. आयएसआय पाकिस्तानी लोकनियुक्त सरकारला उत्तरदायी नाही तर इकडे ते रॉ बाबत म्हणता येत नाही. आयएसआयने बरीच वर्षे सिआयए बरोबर काम केल्यामुळे तंत्रज्ञान आणि रणनीती याबाबत ते बरीच वर्षे वरचढ होते.
शिवाय दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या धार्मिक माथेफिरूंच्या कच्च्या मालाची कमतरताही तेथे जाणवत नाही. धर्मांधता प्रचंड असल्याने भारतात देखील त्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत नाही.
गेल्या काही वर्षात भारताने/रॉ ने आपल्या रणनितीमध्ये बदल केलेला दिसतो कारण पूर्वी भारतात अमुक ठिकाणी तमुक ठिकाणी दहशतवादी कारवाया होत आणि आयएसआयचे नाव सर्वतोमुखी असायचे पण आता पाकिस्तान भारतीय ‘रॉ’वर आरोप करतो त्याचे कारण पाकिस्तानात वाढलेले दहशतवादी हल्ले हे होय.
आचार्य चाणक्य म्हणतात, तुमच्या राष्ट्रामधे शांती नांदावी असे तुम्हाला वाटत असेल तर शत्रू राष्ट्रामधे कलह माजवा. आयएसआय अंतर्गत समस्यांमध्ये अडकून पडल्यामुळे भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये किती फरक पडला आहे हे आपल्याला दिसतेच.
एक लक्षात घ्या, हजारो किलोमीटरच्या सीमा आणि सव्वाशे कोटी माणसं यांची सुरक्षितता किती अशक्य काम आहे हे तुम्हाला समजू शकते. तरीही मुंबई हल्ल्यानंतर आजवर इतक्या वर्षांत मोठ्या प्रमाणावर भारताच्या अंतर्गत भागात अथवा प्रमुख शहरांत दहशतवादी हल्ला झाला नाही. हे काय जादुटोण्यांमुळे घडलं का?
हे सगळं गुप्तहेर यंत्रणेचं यश आहे, परंतु या आठ-नऊ वर्षांत होऊ शकणाऱ्या कित्येक दहशतवादी कारवाया रात्रीच्या अंधारात मुळापासुन उखडुन टाकल्या गेल्या तरीही त्याच श्रेय त्यांना मिळू शकत नाही. रोखलेल्या शेकडो कारवायांचे श्रेय तर दूरच पण झालेल्या एखाद दुसऱ्या चुकीबाबत त्यांना टिकेचा धनी मात्र व्हावे लागते.
रात्रीच्या अंधारात कुठल्या तरी गटारात शत्रूला झोपवणाऱ्या किंवा दुर्दैवाने त्याच गटारात प्रेत होऊन पडणाऱ्या भारत मातेच्या त्या अनाम वीरपुत्रांना मानाचा मुजरा.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.