आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताबाहेरून याठिकाणी आलेले मुघल आपला सत्ता विस्तार करत होते, त्यावेळी भारतातील अनेक पराक्रमी राजांनी त्यांच्याशी शर्थीने झुंज दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरू गोबिंद सिंह हे अशाच पराक्रमी राजांपैकी होते. त्यांनी मोठ्या शर्थीने अकबर, शहाजहान आणि औरंगजेब या मुघल बादशाहांच्या अवाढव्य सैन्याशी मोठा निकराचा लढा देऊन आपले राज्य निर्माण केले होते आणि टिकवले होते.
या पराक्रमी राजांत एक राणी देखील होती जिने मोठ्या शर्थीने मुघलांचा सामना केला होता. त्या काळच्या पितृसत्ताक व्यवस्थेला देखील छेद देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते.
तिचे नाव होते दुर्गावती.
महाराणी दुर्गावती यांनी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ५१ वेळा तिच्या राज्यावर चालून आलेल्या मुघली आक्रमणाचा सडेतोड प्रतिकार केला होता. त्यांनी अत्यंत कुशलतेने आपल्या राज्याचा आणि आपल्या प्रजेचा सांभाळ केला होता.
५ ऑक्टोबर १५२४ रोजी उत्तर प्रदेशातील बांदा येथील कालीनजारच्या कीर्तपाल सिंह नावाच्या चंदेल गुर्जर राजाच्या घरी त्यांचा जन्म झाला.
मोहम्मद घोरी या अत्यंत क्रूर आक्रमकाचा पाडाव करणाऱ्या शूरवीर विद्याधर राजाच्या कुळात त्यांचा जन्म झाला होता. तिला लहानपणापासूनच शौर्याचा वारसा मिळाला होता आणि एखाद्या रजपूत कन्येसारखेच तिचे संगोपन करण्यात आले होते. त्या काळात कुठल्याही महिलेला अशक्य अशा शिकारीच्या, धनुर्विद्येच्या कलेत ती पारंगत होती आणि तिला शास्त्राचे भरपूर ज्ञान देखील होते.
गोंड राजा दलपत शहाच्या शौर्यगाथा ऐकून आणि त्याने मुघलांच्या विरोधात उभारलेल्या लढ्याने दुर्गावती प्रभावित झाल्या होत्या. पण त्यांच्या गुरूने लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला की तो एक गोंड आणि खालच्या जातीचा आहे. त्यावेळी त्याला उत्तर देताना दुर्गावती म्हणाल्या होत्या की तो जरी गोंड असला तरी त्याचे कार्य हे क्षत्रियांपेक्षा कुठेही कमी नाही.
गोंड राजाशी संधान बांधून गुर्जर-गोंड युती करून मुघलांना शह देण्याचा मानस दुर्गावती यांचा होता. केवळ अठराव्या वर्षी त्यांनी हा पुढचा विचार केला होता.
दलपत शहा हा एक पराक्रमी राजा होता, ज्याच्यापासून मुघल देखील फटकून राहत होते. तो ज्या प्रदेशावर राज्य करत होता तो प्रदेश मुघलांसाठी दक्षिणेचे प्रवेशद्वार होता, यामुळे त्याच्यात आणि मुघलांमध्ये नेहमी चकमकी होत असत. दुर्गावती यांनी त्याच्याशी असलेला लग्नाचा मानस उघड केला तेव्हा त्याच्या आईने आणि तिच्या राजपूत नातेवाईकांनी तीव्र विरोध केला पण दुर्गावती मागे हटल्या नाहीत.
पुढे त्यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांनी आपल्या गुर्जर शालिवाहन बापाला या विवाहासाठी तयार केले. १५४२ साली दलपत शहा आणि दुर्गावती यांचा विवाह झाला आणि चंदेल गुर्जर आणि गोंड साम्राज्य एकत्र आलं.
१५५० साली दलपत शहाचे निधन झाले. दुर्गावती यांच्यावर भल्या मोठ्या साम्राज्याचा भर येऊन पडला. तिचा लहान मुलगा आणि साम्राज्याचा वारस वीर नारायण हा वयाने लहान असल्यामुळे त्यांना साम्राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. आधार कायस्थ आणि मन ठाकूर या दोन निष्ठावान मंत्र्यांच्या सहाय्याने दुर्गावती आपल्या साम्राज्याचा गाडा हाकत होती.
दुर्गावातीने मुघलांशी एक दोन नव्हे तर ५१ यु*द्ध केली व प्रत्येक यु*द्धात त्यांच्या शौर्यासमोर मुघलांना झुकावं लागलं होतं. त्यांनी राजकीय चातुर्य दाखवत आपली राजधानी सातपुडा पर्वतरांगेतील चौरागड येथे नेली. आपल्या पतीप्रमाणे एक कुशल राजकारणी म्हणून दुर्गावती यांनी स्वतःला सिद्ध केले होते.
२० हजार सैनिक, १ हजार हत्ती आशा मोठ्या सैन्याचं नेतृत्व महाराणी दुर्गावती यांनी केलं होतं. सोबतच लोकांना पाणी साठवण्यासाठी असंख्य विहिरी आणि कृत्रिम तलाव जबलपूर नजीकच्या प्रदेशात दुर्गावती यांनी बांधून दिले होते.
त्यांच्या साम्राज्यावर पश्चिमेकडून माळव्याचा सुलतान बाज बहादूर याने आक्रमण केले त्यावेळी त्याच्याशी अत्यंत शर्थीची लढाई लढून महाराणी दुर्गावती यांनी त्याला तह करण्यास भाग पाडले होते. त्याने नंतर कधीच पुन्हा इकडे आक्रमण केले नाही. पूर्वेकडून त्यांच्या साम्राज्यावर चालून येणाऱ्या अफगाणी लोकांना देखील धूळ चारली होती. या अफगाणी सैन्यासमोर मुघल सैन्याने एकेकाळी नांगी टाकल्यामुळे तिच्या पराक्रमाने मुघल सम्राट अकबर प्रचंड प्रभावित झाला होता.
मुघलांचा शूर सेनानी मुनीम खानच्या नेतृत्वाखालील १२ सरदारांचा अवाढव्य सैन्याचा केलेला पराभव मुघलांच्या जिव्हारी लागला.
१५६२ साली माळव्याच्या बाज बहादूरचा पराभव करून अकबराच्या नेतृत्वात मुघलांनी तो प्रदेश बळकावला. अकबराचा सरदार मुजिद खानने रेवावर कब्जा केला आणि गोंडवाना ताब्यात घेण्यासाठी तो पुढे सरसावला. राणी दुर्गावतीला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले पण त्यांनी त्वेषाने मृत्यू पत्करेल पण शरण येणार नाही अशी घोषणा केली. नाराई नावाच्या नर्मदा नदीच्या खोऱ्यात असलेल्या प्रदेशात मुघलांशी युद्ध केले.
त्यांच्यामुळे त्या मोठ्या सैन्याला पळताभुई थोडी झाली. त्यांनी मुघलांना पिटाळून लावले इतकंच नाहीतर रात्री बेरात्री मुघलांच्या चौक्यांवर हल्ले चढवून त्यांना तीनवेळा तह करण्यास भाग पाडले.
एकदा तर त्यांनी सकाळीच आपलं सैन्य मुघलांच्या विरोधात लढाईसाठी उतरवलं. यामुळे त्यांना पराभवाचा सामनासुद्धा करावा लागला. पण अत्यंत बिकट परिस्थितीत त्या आणि त्यांचा मुलगा मुघलांशी झुंजत राहिले पण त्यांची शर्थ जास्त काळ टिकू शकली नाही. डोंगर रांगांमध्ये आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी यु*द्ध करताना बाण लागून त्यांचा २४ जून १९६४ साली तिचा मृत्यू झाला. त्यांच्या हाती स्व-संरक्षणाचा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता.
आज या पराक्रमी महाराणीच्या स्मृतीप्रित्यर्थ जबलपूर येथील विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सोबतच जबलपूर ते जम्मू तावी रेल्वेला देखील दुर्गावती एक्सप्रेस हे नाव देण्यात आलं आहे. याशिवाय कोस्ट गार्डने आपल्या एका पॅट्रोलिंग नौकेला देखील त्यांचं नाव दिलं आहे.
आपल्या पराक्रमाने इतिहासात सुवर्ण पान लिहिणाऱ्या या महाराणी दुर्गावतीचा इतिहास निश्चितच भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.