आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
भारतात लोकांमध्ये एक मानसिकता असते, त्या मानसिकतेनुसार एखादा व्यक्तिच्या वर्णावरून त्या व्यक्तीला हिणवले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा शरीराचा वर्ण हा गव्हाळ अथवा सावळा असेल तर त्या व्यक्तीला काळा म्हणून सर्रास चिडवले जाते. जर कोणी कृष्णवर्णीय असेल त्याला तर ह्या अदृश्य भेदभावाचा मोठा सामना करावा लागत असतो.
अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे वर्णभेदाला कुठलीही राजकीय अथवा सामाजिक पार्श्वभूमी नसली तरी तो पाळला जात असतो, याची वाच्यता मात्र होत नसते.
भारत हा विषुववृत्तीय प्रदेशातील देश असल्याने येथील बहुतांश लोक हे मध्यम वर्णाचे अर्थात सावळ्या वर्णाचे आहेत.
भारतात लोकांच्या वर्णात देखील बराच फरक असून याचाच फायदा परदेशी कंपन्या घेत असतात. भारतात सुंदरता म्हणजे गोरेपण असं समीकरण बनलं आहे.
सुंदर व्यक्ती ही नेहमी गोरी असते असे लोकांच्या मनावर रुजवले जात असते. चित्रापासून चित्रपटापर्यंत ही मानसिकता रुजवणायत येत आहे. यामुळेच भारतात सुंदरतेसाठी वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे.
सौंदर्य प्रसाधनं हे ह्या प्रवृत्तीला हवा देण्यात मोठी भूमिका बजावत आहे. शेकडो वर्षांपासून लोक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत आहेत. पण ही सौंदर्य प्रसाधनं भारतीय लोकांच्या मनावर तेव्हा परिणाम करू लागली ज्यावेळी भारतात भांडवलीकरणाचे युग अवतरले.
ह्या युगात सौंदर्य प्रसाधनांच्या या जाहिरातींनी लोकांच्या मनावर कृष्णवर्णीय असणं हे वाईट असतं हे बिंबवायला सुरुवात केली.
त्यामुळे भारतीय समाजात अस्तित्वात नसलेल्या वर्णभेदाच्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. सोबतच याला जातीपातीची हलकी किनार देखील लाभली आहे.
आज देशभरात सुरु असलेल्या फेयरनेस क्रीम अथवा रंग उजळण्याचा जाहिरातींमुळे भारतीय लोकांच्या मनात वर्णद्वेषाची भावना उभी राहण्यास हातभार लागतो आहे.
ह्या वर्णद्वेषावर मोठ्या कंपन्या आपल्या पोळ्या भाजत आहेत. आज मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक फेयरन्स क्रीमच्या आणि अँटी एजिंग क्रीमच्या जाहिरातीत गौरवर्णाचा गौरव करून कृष्णवर्णीय हे कुरुप असल्याचे लोकांच्या मनात इतके बिंबवण्यात आले आहे की समाजात त्यामुळे विषमता निर्माण झाली आहे.
भारतीय संस्कृती ही कधीच वर्णभेदावर आधारलेली नव्हती. भगवान शंकर, श्रीराम, श्रीकृष्ण हे हिंदूंचे परमपूज्य दैवतं ही कृष्णवर्णीय आहेत. ह्यावरून सरळ लक्षात येत आहे की आपल्या देशात अस्तित्वात नसलेला एक विचार आपल्यात रुजवला जात होता.
पण ह्या द्वेषपूर्ण विखाराला वेळीच आवर घालण्यासाठी अनेक पुढे सरसावले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या संबंधी तक्रार दाखल केली.
वर्णद्वेषाने पिडीत असणाऱ्या अनेक लोकांनी देखील ह्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.
अखेरीस गेल्या सात वर्षांपासून भारतात हा जो काही वर्णद्वेष रुजवला जात आहे, त्याविरोधात भाजपा सरकारनेच भूमिका घेतली असून, आरोग्य आणि कुटुंब विकास मंत्रालयाने ह्यावर एक विधेयक तयार केलं आहे.
ह्या विधेयकात अशा प्रकारच्या जाहिरातींचा समावेश जहिरात नियमन कायदा १९५४ ह्यात करण्यात येणार असून यामुळे अशा जहिराती टाकणाऱ्या लोकांवर भारत सरकार कारवाई करणार आहे. ह्यात ५ वर्ष तुरुंगवास नाहीतर ५० हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
ह्यात स्त्रीचे वंध्यत्व ठळकपणे सांगणाऱ्या, लैंगिक उद्युक्त करणाऱ्या जाहिरातींचा देखील समावेश करण्यात आला आहे.
ह्या नवीन विधेयकानुसार कुठल्याही आजार, शरीरिक व्यंग यांच्या आधारवर जाहिरात निर्मिती करण्यात आल्यास ह्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. ७८ प्रकारचे विविध आजारांवर दिल्या जाणऱ्या चमत्कारिक औषध आणि त्याच्या परिणामांवरील जाहिरातींचा समावेश ह्यात करण्यात आला आहे.
जर संबंधित आजारांवर खात्रीशीर योग्य उपचार अशा अर्थाने एखाद्या भ्रामक जाहिरातीची निर्मिती करण्यात आली तर त्याचं मोठा परिणाम होऊ शकतो.
आज देशातील प्रसार माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर अशा जाहिराती दाखवल्या जात असून मोठ्या प्रमाणात लोकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे.
स्त्रियांना सात दिवसांत गोरं करणाऱ्या, स्त्री पुरुषाच्या लैंगिकतेवर उपाचार म्हणून सांगितल्या जाणऱ्या असंख्य जाहिराती ह्या भ्रामक स्वरूपाच्या असून याचा खूप मोठा परिणाम लोकांच्या एकूण मानसिकतेवर होतो आहे.
ह्या जाहिरातींमुळे संबंधित उत्पादनाचा खप वाढत असला तरी समाजात एक विषमतेची भावना निर्माण होत असून सोबतच त्या उत्पादनामुळे अपेक्षित फरक पडला नाही म्हणून लोकांची उघड फसवणूक देखील चालू आहे.
आज ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने हा सुधारित अध्यादेश आणला आहे.
अनेक सामजिक संस्था ह्या विरोधात मोठ्या प्रमाणात लढा देत असून आज त्या सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना देखील यश मिळालं आहे. काही जहिराती तर इतक्या टोकाला जाऊन बनवल्या असतात की त्यांचा वैयक्तिक परिणाम लोकांना भोगावा लागत असतो.
एड्स ह्या अत्यंत गंभीर अशा आजारामुळे मोठा परिणाम लोकांच्या आयुष्यावर होत असतो, त्यावर अत्यंत विनोदी जाहिरातींची निर्मिती मागे करण्यात आली होती आणि अनेक जाहिराती आशा देखील होत्या ज्यामुळे एड्सच्या रुग्णांबद्दल समाजमनात अस्पृश्यतेची भावना निर्माण झाली होती.
चंदू ब्रदर्स नावाच्या जुळ्या भावंडाच्या आईवडीलांना एड्स म्हणून दोघी भावांच्या प्रती एड्स ग्रस्त म्हणून करण्यात आलेला व्यवहार ही त्याचीचं निष्पत्ती होती.
अखेरीस सरकारला आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून एड्स विषयक भ्रम दूर करावे लागले होते.
आज ह्या जाहिरातींच्या वावटळामुळे उडणाऱ्या भ्रमाच्या धुळीमुळे देशातील परिस्थिती खूप खराब होत असून त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी केलेले हे उपाय फार गरजेचे होते. हे विधेयक लवकरात लवकर संसदेत पारित होऊन देशातील जनतेची ह्या फसवणुकीपासून सुटका व्हावी हीच माफक अपेक्षा आज आपण बाळगू शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.