आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्षभरातच १९४८ मध्ये तब्बल बारा वर्षांनी ऑलम्पिकचे सामने आयोजित झाले होते. त्यावेळी भारताचा हॉकीमध्ये चांगलाच दबदबा होता. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात भारताने भल्याभल्यांना धूळ चारली होती. परंतु देशाची फाळणी झाल्यानंतर आणि ध्यानचंद रिटायर झाल्यानंतर आपल्या हॉकी संघाची अवस्था बिकट झाली होती.
म्हणूनच या वर्षीच्या ऑलम्पिकसाठी आपला संघ पाठवायचा की नाही इथपासून चर्चा सुरु होती. परंतु तत्कालीन हॉकी संघाचे मॅनेजर ए सी चटर्जी यांच्या प्रयत्नामुळे भारताने आपला संघ पाठवायची तयारी केली.
त्यावर्षीच्या ऑलम्पिकसाठी निवडलेल्या हॉकी संघाचे कर्णधार किसनलाल होते. ज्यांनी देशाला पहिल्यांदा हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं आणि इतिहास घडवला होता.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रतिस्पर्धी संघ होता इंग्लंडचा. या सामन्यात भारतीय संघ इंग्रजांविरुद्ध अनवाणी पायाने खेळूनसुद्धा जिंकला होता.
किशनलाल यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१७ रोजी मध्यप्रदेशच्या महू इथे झाला. ते अवघे ३ वर्षांचे असताना त्यांना शाळेत दाखल करण्यात आलं.
किशनलाल यांना तेव्हापासूनच खेळाची प्रचंड आवड निर्माण झाली. जेव्हा किशनलाल शाळेत शिकत होते तेव्हा त्यांचं स्वप्न होतं की त्यांना इंग्लंडच्या राजासोबत जेवण करायचं. आणि हे स्वप्न पुढे जाऊन त्यांनी आपल्या कष्टाने सत्यात उतरवलं सुद्धा.
सुरवातीला किशनलाल यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती. ते उत्तम पोलो खेळायचे. कालांतराने हीच आवड त्यांना हॉकीकडे घेऊन आली. १४ वर्षांचे असताना किशनलाल यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली. जसंंजसं ते हा खेळ खेळू लागले तसं त्यांना यातले बारकावे माहिती होत गेले आणि ते एक उत्तम खेळाडू झाले.
लवकरच त्यांना आपल्या चांगल्या खेळामुळे क्लबमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. हे केवळ त्यांच्या कष्टांमुळे साध्य झालं होतं. क्लबकडून खेळायला सुरुवात केल्यावर २ वर्षातच त्यांना महू हिरोज क्लबची जबाबदारी देण्यात आली.
यानंतर त्यांनी महू हिरोजचं कर्णधार म्हणून नेतृत्व केलं. ते इंदौरच्या कल्याणमल मिल्सच्या संघासाठीसुद्धा खेळले या सगळ्या क्लब्स कडून खेळताना त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत आपल्या खेळाची छाप सोडली.
१९३७ साली भगवंत क्लबचे कर्णधार एम एन जुत्शी यांनी त्यांच्यातील गुण ओळखले व त्यांनी किशनलाल यांना टिकमगडच्या भगवंत कपच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली. किसनलाल यांचा खेळ मोठ्या मोठ्या खेळाडूंना आपले कौतुक करण्यास भाग पडावे असा होता. त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा होती.
१९४१ मध्ये किशनलाल यांना पश्चिम रेल्वेकडून खेळण्याची संधी मिळाली. ही संधी म्हणजे किशनलाल यांच्यासाठी आपल्या पुढच्या भवितव्याचा रस्ता होता. इथे दमदार कामगिरी केल्याने १९४७ पर्यंत सगळे मोठे खेळाडू आता त्यांना ओळखू लागले होते.
ही तीच वेळ होती जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. ऑलम्पिक स्पर्धेच्या तारखासुद्धा जाहीर झाल्या होत्या. १९४८ साली जवळपास १२ वर्षांनी ऑलम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. कारण दुसरे महायुद्ध आणि आणखी काही कारणांमुळे गेल्या काही वर्षात ऑलम्पिक स्पर्धा घेण्यातच आली नव्हती.
या ऑलम्पिकच्या आधी भारताने सलग तीन वेळेस गोल्ड मेडल पटकावलं होतं पण ते ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली होते.
ही पहिली वेळ होती जेव्हा भारतीय संघ आपल्या देशासाठी ऑलम्पिक खेळण्यास जाणार होता. आणि याच कारणामुळे संघासोबतच देशवासीयांनासुद्धा खूप आनंद झाला होता. असिस्टंट मॅनेजर चटर्जी यांनी भारतीय संघाची खूप मस्त बांधणी केली. त्यांनी भारताच्या कित्येक राज्यांतून खेळाडू शोधून काढले.
पण पुढे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची फाळणी झाली. आणि याच फाळणीमुळे भारतीय संघसुद्धा कोलमडला. कितीतरी भारतीय खेळाडू पाकिस्तानी संघाचे खेळाडू झाले.
भारतीय हॉकी संघाचे आधार असणाऱ्या मेजर ध्यानचंद यांनी तर तेव्हा निवृत्ती घेतली होती. मग हे वातावरण पाहून ऑलम्पिक आयोजकांनी भारत व पाकिस्तान या दोन देशांना मिळून एक संघ पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला. पण हा प्रस्ताव दोन्ही देशांना मान्य नव्हता.
या घटनेनंतर पुन्हा भारतीय संघाची बांधणी करण्यात आली. यावेळी किशनलाल यांना कर्णधार करण्यात आलं होतं तर के डी सिंग बाबू याना उपकर्णधारपद देण्यात आलं होतं. कर्णधार किशनलाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळायला जात होता.
या संघात जास्त करून नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली होती तसेच बलबीर सिंग आणि क्लाडियस यांच्यासारखे अनुभवी खेळाडूसुदधा होते. त्याकाळच्या प्रत्येक देशवासियांना हा विश्वास होता की आपला हॉकी दादा म्हणजेच किशनलाल हे नक्की भारतीय संघाला जिंकवून गोल्ड मेडल घेऊन येणार. आणि याचवेळी पूर्ण जल्लोषात ऑलम्पिक खेळण्यासाठी भारतीय संघ लंडनला रवाना झाला.
भारतीय हॉकी संघ आपल्या राष्ट्रीय खेळाला पहिल्यांदाच आपल्या राष्ट्रीय ध्वजाला घेऊन खेळणार होता. किशनलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ही नक्की अभिमानाची बाब होती. आणि या वेळी त्यांना या स्पर्धेत जिंकून इतिहास घडवण्याची संधी होती.
लंडन ऑलम्पिकमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियन संघासोबत झाला आणि या सामन्यात भारताचा ८-० असा विजय झाला. या सामन्यात अनुभव पाठीशी असलेले बलबीरसिंग यांनी एकट्यानेच तब्बल ६ गोल केले होते.
या स्पर्धेत आता पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने किशनलाल यांच्या संघाचा आत्मविश्वास वाढला होता. दुसरा सामना बलाढ्य अशा अर्जेंटिना संघासोबत झाला आणि यात किशनलाल यांनी केलेल्या चमकदार कामगिरीने भारतीय संघाने या सामन्यात ९-१ असा विजय मिळवला.
भारतीय संघ आपले पहिले दोन्ही सामने जिंकला होता. त्यांना आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला होता. या फेरीत भारताची टक्कर झाली ती स्पेनसोबत, आणि हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. तरीसुद्धा भारतीय संघाने मागे न राहता २-० अशा गुणांनी हा सामनादेखील आपल्या खिशात घातला.
किशनलाल यांच्या खेळाडूंच्या दमदार खेळाने आता सगळेच प्रभावित झाले होते. लंडनची मैदाने आता भारतीय समर्थकांच्या नाऱ्याने गुंजत होती. समर्थकांची संख्या वाढतच होती.
या स्पर्धेत भारतीय संघाबरोबरच पाकिस्तानी संघसुद्धा उपांत्यफेरीत पोहचला होता. आता या फेरीत भारताचा सामना हॉलंडच्या बलाढ्य संघासोबत होता तर पाकिस्तानचा सामना इंग्लंड सोबत होता.
हे दोन्ही सामने चांगलेच चुरशीचे होणार हे नक्की होतं. या फेरीत भारताने आपला २-१ ने विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं होतं. तर पाकिस्तानला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.
अंतिम फेरीत भारताचा सामना हा आपल्यावर ज्यांनी इतके दिवस राज्य केलं त्या इंग्लंडसोबत होणार होता. आता प्रत्येक भारतीयाला इंग्लंडला हरवून आपल्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेताना पाहण्याची इच्छा होती.
सामना सुरू झाला. दोन्ही संघ पूर्ण तयारीने सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी गच्च भरलं होतं, आणि नेमका पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या परिणाम थेट भारतीय खेळाडूंच्या खेळावर झाला. त्यांचे पाय घसरू लागले. परिस्थितीचा अंदाज घेऊन किशनलाल यांनी आपल्या संघास अनवाणी पायाने खेळण्याचा सल्ला दिला व सगळे खेळाडू पायात काहीच न घालता मैदानात उतरले. आता फक्त देशातल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या नजरा भारतीय संघ काय करतो याकडे लागल्या होत्या.
हॉकीच्या इतिहासात अस पहिल्यांदा होत होतंं की कोणी अनवाणी पायांनी सामना खेळत होतं.
या सामन्यात आता भारतीय खेळाडूंमध्ये चांगलाच जोश संचारला होता. भारतीय संघ एकापाठोपाठ एक गोल करत होता. या सामन्यात पहिले दोन गोल अनुभवी बलबीरसिंग यांनी केले तर जैनसन आणि तरलोचनसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. आणि अशा प्रकारे भारतीय संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामना ४-० अशा गुणांनी जिंकला होता.
स्वतंत्र भारताचा हा असा पहिला क्षण होता जेव्हा भारतीय संघाने आपल्या राष्ट्रीय झेंड्याला घेऊन खेळताना ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं. संपूर्ण देशभरात जल्लोशाचंं वातावरण होतं, आणि याच वेळेस किशनलाल यांचं लहानपणीचंं इंग्लंडच्या राजसोबत जेवण करण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं होतं.
किशनलाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या गुलामीगिरीचा बदला घेतला होता. किशनलाल यांची ही कामगिरी पाहता त्यांना भारत सरकार ने १९६६ साली पद्मश्री या सन्मानाने सन्मानित केलं.
२२ जून १९८० रोजी तामिळनाडूच्या मद्रास येथे किशनलाल यांची प्राणज्योत मालवली.
अशाप्रकारे किशनलाल यांच्या नेतृत्वात भारतीय संघानंं आपल्यावर राज्य केलेल्या इंग्लंडला हरवलं होत आणि देशाची मान उंचावली होती. असे खेळाडू खूप कमी तयार होतात किशनलालसुद्धा त्यांपैकीच एक. आजही भारतीय हॉकी संघाचा पहिला विजय म्हणलं की किसनलाल यांचं नाव डोळ्यासमोर येतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.