आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भुतकाळ बांधून ठेवता येत नाही असं म्हणतात ते काही पुर्णपणे खरे नाही. परंपरेच्या रुपात भूतकाळ कधी कधी जपता येतो हे नक्कीच. जुन्या कला, परंपरा, खेळ हे आजही भारतातील काही भागांत जपले जातात. जैविक विविधतेप्रमाणेच परंपरेची वैविधताही आता हळूहळू कमी होत चालली आहे. महाराष्ट्रातही अशा काही परंपरा आहेत ज्या आता लोप पावत आहेत. यातीलच एक खेळ कोकणातील सावंतवाडीत अजूनही खेळला जातो. पत्त्यांचा हा खेळ ओळखला जातो तो ‘गंजिफा’ या नावाने.
या खेळाचं एक वैशिष्ट म्हणजे हा खेळ कधीही पैशांवर खेळला जात नाही. पत्त्यांवर असलेल्या विविध देवी-देवतांच्या आकृतींमुळे देव पैशावर तोलता येत नाही असे इथले लोक सांगतात. गंजिफा भारतात आला तो ५०० वर्षांपुर्वी. इंग्रजांच्या शेवटच्या काळात स्वस्त युरोपियन पत्ते आले तोपर्यंत गंजिफा हा राजांच्या खेळामध्ये अगदी मानाचं स्थान पटकावून होता.
सामान्य लोकांच्या स्मृतीतून आणि घरातून गायब झालेला गंजिफा आता ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, म्हैसूर अशा ठिकाणी कमी प्रमाणात का होईना पण आपले अस्तित्व आजही टिकवून आहे.
महाराष्ट्रातील सावंतवाडीत राजमाता भोसले यांच्या नेतृत्वाखाली गंजिफाचे संवर्धन केले जात आहे. १९७० च्या आसपास सावंतवाडीत फक्त एक गंजिफाचे पत्ते बनवणारा कलाकार शिल्लक होता. तोही वर्षातून फक्त एकदाच हे पत्ते बनवून ३० रुपयांना विकत होता. बाकी सगळ्या कलाकारांनी पत्ते बनवणे बंद केले होते. काही जण मोठ्या शहरात स्थलांतरित झाले.
राजघराण्याने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नविन कलाकारांना गंजिफा कार्ड बनवायला शिकवायचं असं ठरवलं आणि सराव सुरू केला. सुरुवातीला पत्त्यांवर असणारी पारंपारिक चित्रकला शिकणे जरा अवघड होते, परंतु आता सावंतवाडीत एकुण ५ चित्रकार आहेत जे गंजिफाचे पत्ते बनवण्यात तरबेज आहेत आणि त्यांनी बनवलेल्या पत्त्यांना आता जगभरात मागणी आहे, असेही राजमाता सांगतात.
गंजिफाचा इतिहास अभ्यासावा तर त्याची सुरुवात नेमकी कुठे झाली याची पुर्ण कल्पना अजून तरी नाही. गंजिफा पहिल्यांदा इतिहासाच्या पानात सापडतो तो चौदाव्या शतकात आधुनिक सिरिया आणि इजिप्त या प्रदेशात.
पर्शियामधेही गंजिफा खेळला जात असल्याचा उल्लेख काही भटक्यांच्या जमातींच्या लेखनात सापडतो.
भारतीय उपखंडातील गंजिफाचा उल्लेख पहिल्यांदा आढळतो तो सोळाव्या शतकाच्या ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये. बाकी खेळांबरोबरच गंजिफासुद्धा वेळ घालवण्यासाठीचा एक खेळ होता असा उल्लेख ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये आढळतो. मुघल गंजिफा हा ९६ पत्त्यांचा खेळ होता. राजदरबाराचे ८ कार्य दर्शवणारे ८ गट या खेळात असायचे.
पर्शियामधे शाह अब्बास दुसरा याने गंजिफा खेळण्यावर निर्बंध घातले. भारतात मात्र हिंदू राजांनी हा खेळ उचलून धरला. त्यात वेगवेगळे प्रयोग करुन आता प्रसिद्ध असलेला गंजिफाचा दशावतार हा प्रकार निर्माण केला. १२० गोलाकार पत्त्यांवर खेळला जाणारा हा एकमेव प्रकार आता भारतात अस्तित्वात आहे.
दशावतार हा गंजिफाचा प्रकार भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे. सावंतवाडी आणि बाकीच्या प्रदेशात हा खेळ भरपूर प्रसिद्ध होता. सावंतवाडीतील भोसले राजे खेम सावंत या खेळाच्या उत्क्रांतीसाठी महत्त्वपुर्ण होते. त्यांनी गोव्यामधून चित्तारी समुदायाच्या कलाकारांना बोलवून घेऊन हे पत्ते बनवून घेतले होते. याच चित्तारी समुदायाचे लोक आजही सावंतवाडीतच राहतात.
दशावतार प्रकारचा गंजिफा हा फक्त एक खेळच नसून जनतेला आपली संस्कृती आणि पुराणातील कथा यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता असे राजमाता सांगतात. दुपारच्या वेळी एकत्र येऊन पत्ते खेळता खेळता मैत्री कशी खुलत जात असे याचे अनुभव त्या आजही अगदी हसत हसत सांगतात.
सावंतवाडीचे कलाकार तेथील राजवाड्यातच काम करतात. सुक्ष्म, रेखीव कलाकृतींनी सजलेले १२० पत्ते बनवायला १५ दिवस ते १ महिना लागतो. लेदर किंवा पाईन वृक्षाच्या पानांवर हे पत्ते बनवले जातात.
पत्त्यांचा रंग कधी लाल, हिरवा, तांबडा, पिवळा किंवा काळा असा असतो. आधी वापरले जात असलेले नैसर्गिक रंग आता वापरले जात नाहीत. रामाचा अवतार बहुतेकदा पिवळ्या रंगाने दर्शवला जातो. नरसिंह अवतार हिरव्या तर भगवान विष्णूचा शेवटचा अवतार कल्की हा काळ्या रंगाने दर्शवला जातो. हा काळा रंग जगाचा अंत दर्शवितो असे सांगितले जाते.
आता जरी फक्त नवीन पत्ते बघायला मिळत असले तरी राजघराण्याच्या संग्रही काही जुने पत्ते आजही बघायला मिळतात. तर काही उत्कृष्ट पत्त्यांचे संग्रह व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात ही बघायला मिळतात. हे जुने पत्ते अगदी सुरेखपणे रंगवलेल्या तीव्र लाल आणि हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवलेले आढळतात. हे जुने पत्त्यांचे संग्रह अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत. पत्त्यांवर वेगवेगळे अवतार, राजदरबारातल्या वेगवेगळ्या घडामोडी तसेच दैनंदिन जीवनातील टिपलेले काही चित्रही सापडतात.
सावंतवाडीत गंजिफा खेळणारे व्यक्ती आता हयात नाहीत. तसेच गंजिफाचा खेळ कधी कधी अतिशय किचकट होऊ शकतो. म्हणून आता गंजिफा खेळणारी लोकं सापडत नाहीत असे राजमाता सांगतात. तसे असले तरी राजवाड्यात बनवल्या जाणाऱ्या गंजिफा पत्त्यांना आजही जगभर मागणी असुन एका समुहाचे ८ हजार रुपये याप्रमाणे हे पत्ते विकले जातात.
समृद्ध परंपरेचा वारसा टिकवणे किती गरजेचे आणि जिकरीचे काम आहे हे गंजिफाच्या आजच्या स्थितीवरुन लक्षात येते. परंतु सांभाळला गेला तर हाच वारसा आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे साधन बनू शकतो याचं उदाहरणही गंजिफाच्या या खेळातुन लक्षात येते..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.