आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गुप्तचर यंत्रणा लपून छपून अनेक ऑपरेशन्स करतात, आपण बऱ्याचदा या ऑपरेशन्सच्या बाबतीत अनभिज्ञ असतो. ते दरवेळी यशस्वी होतात असं नाही. कुठलीही गुप्तचर संस्था आपल्या ऑपरेशन्सची जाहीर कबुली देत नाही. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ने देखील असंच एक ऑपरेशन केलं होतं ज्याचं नाव होतं गंगा हायजॅकींग.
१९७१ साली इंडियन एयरलाईन्सच्या गंगा ह्या विमानाला हायजॅक करण्यात आले. पण हे हायजॅकिंग कुठल्या दहशतवादी संघटनेने नाहीतर रॉने स्वतः केले होते. १९७१ च्या युद्धामध्ये या एका ऑपरेशनने पाकिस्तानी सैन्याची दाणादाण उडवली होती. याची कथा फारच रंजक आहे.
३० जानेवारी १९७१ ला जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने इंडियन एयरलाईन्सचे गंगा हे विमान उड्डाण घेणार इतक्यात अचानक विमानात बसलेल्या १७ वर्षांच्या हाशिम कुरेशीने पायलटच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली.
विमानात २७ प्रवासी होते. लोकांना काही लक्षात येण्याअगोदरच १९ वर्षांच्या अश्रफ कुरेशीने कॉकपिटमध्ये प्रवेश केला. त्याच्या हातात ग्रेनेड होते. प्रवाशांना विमान हायजॅक झाल्याची कल्पना आली होती. इकडे हाशिमने पायलटला विमान पाकिस्तानात नेण्याचे आदेश दिले. पायलटची घाबरगुंडी उडाल्यामुळे निर्देशानुसार त्याने विमान पाकिस्तानला नेले.
परंतु काही वेळातच सर्व प्रवाशांना सुखरूप उतरण्यात आले. नंतर समजलं की त्या मुलांच्या हातात जी बंदूक होती ती लाकडी होती व हातातील ग्रेनेड नकली होता. एकंदरीत हे हायजॅकिंग बनावट होतं आणि भारतीय गुप्तचर संस्थेने ते घडवून आणलं होतं.
२ जानेवारी १९७१ साली अल-फतेह नावाच्या एका आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी काही नव्या आतंकवादी मंडळींना सोबत घेऊन जम्मू-काश्मीर बँकेवर दरोडा टाकला होता. नवखे असल्यामुळे हे आतंकवादी पकडले गेले. पोलिसांनी पकडलं आणि दोन चार दंडे हाणले, तेव्हा त्यांनी सत्य उगळायला सुरुवात केली, मग ‘रॉ’ लक्षात आले की पाकिस्तानात काही खलबतं रचली जात आहेत.
हे लक्षात आल्याबरोबर रॉने १६ वर्षांच्या आपल्या एजंट हाशिम कुरेशीला पाकिस्तानात खबर काढण्यासाठी रवाना केले. पाकिस्तानात त्याची जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंटच्या प्रमुख दहशतवादी मकबूल भट्टशी भेट झाली.
एजंट असला तरी हाशिम एक लहान मुलगाच होता. त्याने ‘रॉ’ला सोडचिठ्ठी देत ‘आयएसआय‘ मध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. आयएसआयने हाशिमला एक महत्वपूर्ण दायित्व सोपवलं, त्यांनी त्याला इंडियन एयरलाईन्सचे विमान हायजॅक करायला सांगितले. ते विमान साधारण नव्हते, त्या विमानाचे पायलट दुसरं तिसरं कोणी नाहीतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी होते.
हायजॅकिंगचे प्रशिक्षण घेऊन हाशिम भारतात परतला. बीएसएफला त्याच्यावर संशय आला होता. चौकशी करण्यात आल्यावर तो मुलगा सर्व काही बोलला. मग काय, रॉने त्यांच्या प्लॅनमध्ये कुठलाच बदल न करता विमानात बदल केला.
त्यानंतरचा पुढील घटनाक्रम अगदी तसाच होता जसा वर नमूद केला आहे. यालाच गंगा हायजॅकिंग मिशन म्हणून ओळखले जाते.
भारत सरकार आणि रॉ आजही असं कुठलं ऑपरेशन केलं होतं याचं सत्य स्वीकारत नाही. परंतु रॉचे माजी अधिकारी आर के यादव यांनी आपल्या ‘मिशन R&AW’मध्ये या घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. हाशिम कुरेशी यांनी यासाठी यादव यांच्या विरोधात कोर्टात खटला देखील दाखल केला आहे.
हे विमान श्रीनगरला न उतरता लाहोरला गेले. आयएसआयला वाटलं की राजीव गांधी विमान घेऊन स्वतः लाहोरला आले आहेत. हाशिम कुरेशीच्या कर्तृत्वावर पाकिस्तानी खुश झाले. पण हायजॅकिंग केल्याने भारताने पाकिस्तानला आपल्या हवाई हद्दीतून प्रवेश करण्यास मज्जाव केला. यामुळे जे विमान लाहोरहुन ढाक्याला जात होते, त्याला ५००० किमीचा फेरफटका मारून कोलंबो मार्गे ढाक्याला जावं लागत असे.
जेव्हा पाकिस्तानला विमानात राजीव गांधी सापडले नाहीत, मग इतर भारतीयांना ताब्यात घेऊन काय करणार? त्यामुळे त्यांनी इतर यात्री आणि हाशिमलासुद्धा परत भारतात पाठवले. हाशिमला तिथे ठेवलं असतं तर जगभरात हसं झालं असतं म्हणून त्याची मुक्तता करण्यात आली. आयएसआयची यामुळे मोठी नाचक्की झाली. सगळ्यांना माहिती झालं होतं की हे रॉचं ऑपरेशन आहे.
असं म्हणतात हायजॅकिंगची प्लॅनिंग रॉने आधीच करून ठेवली होती. रॉला माहिती मिळाली होती की १९७० साली पूर्व पाकिस्तानात होणाऱ्या निवडणुकीत जरी शेख मुजीब उर रहमान विजयी जर झाले तरी पाकिस्तानचे सैन्य त्यांना सरकार बनवू देणार नाही. जर असं झालं तर पूर्व पाकिस्तानची स्थिती अजून बिकट झाली असती.
एकीकडे निवडणूकांची तयारी, दुसरीकडे सेना आपल्या तयारीत व्यस्त होती. याचा परिणाम असा झाला की सेनेचं सर्व लक्ष निवडणुकीवरून हटलं आणि हायजॅकींगकडे गेलं.
पाकिस्तानी सेनेला जोपर्यंत हायजॅकिंगचं कोडं उलगडतं तोपर्यंत पूर्व पाकिस्तानात निवडणूक शांतपणे पार पडली. निवडणुकीत शेख मुजीब उर रहमान विजयी झाले. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. हे सर्व घडून गेल्यावर आयएसआयला आणि पाकिस्तानी सेनेला जाग आली. त्यांना रॉचा कट लक्षात आला.
पश्चिम पाकिस्तानातून पूर्व पाकिस्तानात जाणाऱ्या सैनिकांवर यामुळे परिणाम झाला कारण भारतीय हवाई हद्द बंद असल्याने त्यांना द्रविडी प्राणायम करावा लागत होता. यामुळे मुजिबुर रहमान यांचा मार्ग सोपा झाला. झुल्फिकार भुट्टो यांच्या पक्षाचा यात सफाया झाला. मुजिबुर रहमान आता पाकिस्तानचे पंतप्रधान होणार हे आयएसआय आणि सेनेला मंजूर नव्हते. त्यांची गुप्तचर यंत्रणा फोल ठरल्याचे त्यांना जास्त दुःख होते.
एका बंगाली माणसाने आपल्यावर राज्य करावं हे पश्चिमी पाकिस्तानला नामंजूर होतं. त्यामुळे झुल्फिकार भुट्टोने पश्चिम आमची आणि पूर्व तुमची असं म्हणत मुजिबुर रहमान यांचा अधिकार नाकारला!
सत्ता जरी हाती आली नाहीतरी मुजीब बरोबर पूर्व पाकिस्तान भारताच्या शरणी आला. यातूनच १९७१च्या यु*द्धाचे पडघम वाजले आणि पश्चिमी पाकिस्तानचा पराभव होऊन स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. हे सर्व शक्य झालं ते विमान हायजॅक करण्याचा एका पराक्रमामुळे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.