आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाकण्यात आलेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल होतं.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील सोरपतावाडी ह्या गावाने लॉकडाऊन आणि सरकारी सूचनांचे व्यवस्थित पालन करत कोरोनाविरोधातील लढ्याचा एक आदर्श घालून दिला आहे. ह्यात गावचे सरपंच सुदर्शन चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मोठा वाटा आहे.
जेव्हा कोरोनाचा धोका जाणवू लागला त्यावेळी सोरतापवाडी गावात ३ हजार माहिती पत्रकांचे वाटप ग्रामपंचायतीच्या मार्फत घरोघरी करण्यात आले. या माध्यमातून लोकांना कोरोना विषाणू म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यापासून कशाप्रकारे बचाव करता येईल याची संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेत देण्यात आली.
पुण्यात जेव्हा कोरोना विषाणूची बाधा असलेला पहिला रुग्ण आढळून आला त्यावेळी सोरपतवाडी गावात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सोडियम हायपोक्लोराइड ह्या जंतूनाशकाची फवारणी गावात करण्यात आली. यासाठी ट्रॅक्टर, हॅण्डपंप इत्यादी उपकरणांचा वापर करण्यात आला.
भविष्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
इन्फ्रारेड थर्मामीटरच्या मदतीने लोकांच्या शरीराच्या तापमानाची नोंद करण्यात आली. ज्या लोकांना सर्दी, ताप, खोकला होता, अशा लोकांची एक यादी करून ती प्राथमिक आरोग्य केंद्राला सुपूर्द करण्यात आली.
इतकंच नाही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात घरपोच किराणामाल पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.
जे लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडत होते, त्यांच्यासाठी गावातील ९ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशनची निर्मिती करण्यात आली. हे हॅण्डवॉश स्टेशन गावातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आले.
सोलापूर हायवेला लागूनच गाव असल्यामुळे अनेक बाहेर गावचे लोक गावात येत होते. त्यांच्यासाठी गावाच्या दोन एन्ट्री पॉईंटवर सॅनिटायझर टनेल्सची निर्मिती करण्यात आली, जेणेकरून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होऊनच तो गावात प्रवेश करेल.
गावातील घरोघरी शिधा वाटप करण्यात आले पण गावात बाहेर गावचे कामगार, मजूर यांची संख्या देखील मोठी होती. ह्या लोकांना देखील ग्रामस्थांच्या साहाय्याने धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तब्बल १३०० किट्सचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील महिलांना प्रत्येकी ५ सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.
शिधा आणि धान्य वाटपात पारदर्शकता असावी यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. प्रत्येक ग्राहकाच्या वाट्याला जितकं धान्य मंजूर करण्यात आलं होतं तितक्या धान्याचे यशस्वी वाटप करण्यात आले.
रेशन खरेदीसाठी आलेल्या ९०० लोकांच्या मोबाईलमध्ये सरकारच्या सूचनेप्रमाणे आरोग्य सेतू आणि ई नाम ऍप डाउनलोड करून घेण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या आवाहनानुसार गावातील अनेक दानशूर लोकांनी गरिबांच्या सेवेसाठी गहू तांदूळ यांचे दान केले.
गावातील तब्बल २१ लोकांना सरकारच्या सुचनेनुसार क्वारंटाईन करण्यात आले होते.
हे लोक परगावाहून आणि परदेशातून गावात आले होते. सरकारच्या सुचनेनुसार गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि लॉजमध्ये चार संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले.
अपंग कल्याण निधीच्या माध्यमातून गावातील तीस कुटुंबाना तीन महिन्यांच्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या असक्षम लोकांना दिवसातून दोनवेळा जेवण देण्याची व्यवस्था देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सोरतापवाडी गावात अनेक परप्रांतीय आहेत. अनेकांकडे रेशन कार्ड्स नाहीत. अशा १३० कुटुंबांची यादी करण्यात आली. त्या कुटुंबाना जिल्हा परिषदेच्या शरद भोजन योजनेअंतर्गत पोस्टल नोंदणीद्वारे धान्य वाटप करण्यात आले. गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि कोणीही विनाकारण घराबाहेर फिरत नाहीये ना यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.
गावाच्या ग्रामपंचायतीच्या सेवेत असलेल्या
कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुरक्षित असावे यासाठी प्रत्येकाला मास्क, दोन सॅनिटायझर आणि हॅण्ड ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.
गावचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी सांगितले की शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन आम्ही केले असून यासाठी उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सोरतापवाडी गावच्या नागरिकांचे लॉकडाऊन यशस्वी करण्यात विशेष सहकार्य लाभले आहे.
पुढील काही दिवसांत गावाचे व्यवहार कसे पूर्ववत करता येतील याकडे आमचे लक्ष असणार आहे, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
सोरतापवाडी गावाने कुठल्याही संकटाचा नियोजनबद्धरित्या कसा सामना केला जाऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. यासाठी ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.