आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“कोडनडेरा मडप्पा करिअप्पा” अर्थातच “के. एम. करिअप्पा” यांच्याबद्दल सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही. यांच्याबद्दल माहिती काढताना खूप सारे लेख आणि मुलाखती वाचल्या. त्या प्रत्येक लेखात आणि मुलाखतीत एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवत होती की, करिअप्पा हे भारतीय सैन्यातील सर्वांत प्रतिभावान व्यक्तिमत्त्व नक्कीच होते, पण त्याचबरोबर एक माणूस म्हणूनही खूप महान होते.
दिलेला शब्द पाळणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण. त्यामुळेच आजही भारतीय लष्करात त्यांना मानाचं स्थान आहे. ते स्थान फक्त “स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख” किंवा भारतीय लष्करातील सर्वोच्च गौरव “फील्ड मार्शल” मिळवणारे फक्त दुसरे भारतीय आहेत म्हणून नाहीये, तर सगळ्यात जास्त माणुसकी असणारे लष्करप्रमुख म्हणून आहे. गरज पडेल तिथे त्यांनी साहस नक्कीच दाखवलं पण कायम त्यांच्या ट्रूप मध्ये जाऊन सर्वांशी वैयक्तिक संवाद साधणारे करिअप्पा सर्वांच्या लक्षात कायम राहतात.
त्यांच्याबद्दल प्रत्येक सैनिकाच्या मनात कायम आदर आहे. त्यामुळेच मध्यंतरी भारताचे माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी करिअप्पा यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न” देण्याची शिफारस केली होती. (आजपर्यंत कुठल्याही सैनिकाला भारतरत्न दिला गेलेला नाही.)
भारतीय सैन्याला खऱ्या अर्थाने कोणी भारतीय बनवलं असेल तर ते फक्त फिल्ड मार्शल करिअप्पा यांनीच. सरळमार्गी असणारे करिअप्पा, ‘भारतीय सैन्य हे कोणापेक्षा अजिबात कमी नाहीये”, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी थेट त्यांच्या वरिष्ठांची आज्ञा सुद्धा मोडली होती. चला तर मग जाणून घेऊया या साहसी विराबद्दल.
के.एम.करिअप्पा यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ रोजी कर्नाटकातील कुर्ग येथे झाला. करिअप्पा हे सहा भावंडांपैकी एक. अतिशय सुंदर अशा कुर्गमधून अनेकांनी लष्करासाठी योगदान दिलं आहे. त्यामुळे लहानपणापासूनच सैनिकांच्या योगदानाच्या कथा ऐकून करिअप्पा मोठे झाले. या साहसी कथा ऐकून त्यांनी ठरवलं होतं की त्यांना सुद्धा मोठेपणी लष्करी अधिकारी व्हायचं आहे.
मडीकेरीमधील सेंट्रल हायस्कुलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर, पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी मद्रासमधील प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना त्यांना कळलं की भारतीय सैन्यात अधिकाऱ्यांची भरती होणार आहे आणि त्यांना त्याचं प्रशिक्षण भारतातच देणार आहेत. इंदौरमध्ये खरोखरच असं कॅडेट कॉलेज सुरू झालंय याची खात्री पटल्यावर करिअप्पा यांनीसुद्धा त्यासाठी अर्ज केला. एकूण आलेल्या ७० अर्जापैकी ४२ जणांना प्रवेश मिळाला. त्यामध्ये एक करिअप्पासुद्धा होते.
पहिल्यापासूनच अत्यंत कष्टाळू आणि कुशाग्र असणाऱ्या करिअप्पांनी काही दिवसांतच बॅचमध्ये आपली छाप सोडायाला सुरुवात केली. सैनिकी रणनीती, लढाईची रणनीती आणि प्रशासकीय कौशल्य या विषयांमध्ये त्यांची कामगिरी कायम उत्कृष्ट होती. यामुळेच त्यांचे वरीष्ठ कायम त्यांच्या कामगिरीमुळे प्रभावित होत.
त्यांची अशीच यशस्वी कामगिरी बघून पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सॅन्डहर्स्ट येथील “रॉयल मिलिटरी कॉलेज” या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये पाठवले.
तिथेसुद्धा करिअप्पा यांनी आपल्या कामगिरीत खंड पडू दिला नाही. १९१९ साली करिअप्पा यांना “सेकंड लेफ्टनंट” बनवण्यात आलं. त्यांची पहिली पोस्टिंग “कार्नाटिक इंफंट्री”च्या दुसऱ्या बटालियन मध्ये झाली. त्यानंतर “नेपिअर्स रायफल्स”मध्ये आणि शेवटी “राजपूत लाईट इंफंट्री”मध्ये झाली आणि तीच त्यांची कायमची रेजिमेंट झाली.
करिअप्पा आपल्या कारकिर्दीत एक एक यशाची पायरी चढत होते. लहानपणी लष्करी अधिकारी बनण्याचं स्वप्न पुढे जाऊन त्यांचं ध्येय झालं होतं. याच ध्येयपूर्तीसाठी त्यांची कुठल्याही प्रकारचे कष्ट करण्याची तयारी होती. अगदी चिकाटीने ते आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी दिवसेंदिवस पुढे सरसावत होते. त्यांच्या कष्टामुळे १९३३ साली ते “QUETTA Staff College”ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. ते पहिले भारतीय अधिकारी होते ज्यांनी ही परीक्षा पास केली होती. तसेच Quetta Staff College मध्ये प्रवेश घेणारे ते पहिलेच भारतीय लष्करी अधिकारी बनले.
१९४२ साली तर करिअप्पा यांनी इतिहास रचला. त्यांना एक सैन्याच्या तुकडीची कमांड देण्यात आली. त्यांच्या अधिपत्याखाली किती तरी ब्रिटिश अधिकारी आता काम करत होते. एक भारतीय अधिकारी कित्येक ब्रिटिश अधिकाऱ्यांना आज्ञा देतोय, हा कित्येक भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण होता. पण या गोष्टीने भारावून न जाता करिअप्पा आपल्या कामाशी एकरूप राहिले. चार वर्षानंतर १९४६ साली करिअप्पा यांची पदोन्नती होऊन ते आता ब्रिगेडियर झाले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच काळात कर्नल अयुब खान, जे नंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले (१९६२-६९) त्यांनीसुद्धा करिअप्पा यांच्या अधिपत्याखाली काम केले. (म्हणजे विचार करा पाकिस्तानचे राष्ट्रपती एके काळी आपल्या भारताच्या लष्करप्रमुखांच्या खाली काम करत होते आणि आज जे पाकिस्तानचे प्रधानमंत्री आहेत, ते एकेकाळी सचिन तेंडुलकरने मारलेला बॉल आणण्यासाठी पळायचे. यामुळेच तर म्हणतात “सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा।”)
करिअप्पा यांच्या ब्रिटिश इंडियन आर्मीच्या कारकिर्दीत त्यांनी INA म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मीच्या कैद्यांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचं खूप कौतुक झालं होतं. एकदा त्यांनी या कैद्यांच्या एका शिबिराला भेट दिली होती. तिथे त्या कैद्यांसाठी असलेली राहायची परिस्थिती आणि कैद्यांचे हाल पाहून त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी ताबडतोब ब्रिटिश जनरलला पत्र लिहून कैद्यांची राहण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली.
करिअप्पा यांचं म्हणणं होतं की जे कैदी अपराधी नसतानासुद्धा इथे विनाकारण पकडून बंदिस्त केले आहेत, त्यांना सोडून दिलं पाहिजे कारण यांच्याबद्दल भारतीय जनतेच्या मनात सद्भावना आहे आणि उद्या जाऊन ते चांगल्या प्रकारे देशाचं नेतृत्व करू शकतील. त्यांच्या या पत्रामुळे ब्रिटिशांनी INA च्या बहुतेक कैद्यांना मुक्त केलं. (त्यामध्ये कर्नल प्रेमकुमार सेहगल, गुरुबक्षसिंग ढिल्लो इ. चा समावेश होता.) १९४७ साली १५० वर्ष चाललेल्या अखंड लढ्यानंतर भारताला स्वतंत्र मिळालं. तोपर्यंत करिअप्पा यांनी इराक, सिरीया, इराण आणि बर्मामध्ये पराक्रम गाजवून खूप नाम कमावलं होतं.
त्यांच्या दुसऱ्या महायु*द्धातील बर्मामध्ये गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांना प्रतिष्ठित असा “Order of British Empire” (OBE) ने गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यानंतर भारताचे लष्करप्रमुख कोण यासाठी नेहरूंनी एक बैठक बोलावली होती, त्यामध्ये सुरक्षामंत्री बलदेव सिंग, लेफ्टनंट जनरल नाथुसिंग राठोड आणि लेफ्टनंट जनरल के.एम.करिअप्पा हेसुद्धा उपस्थित होते. नेहरू यांनी त्यांचं मत मांडलं, “भारताला बुचहार्ट नंतर नवीन लष्करप्रमुखाची गरज आहे. माझं म्हणणं आहे की, नवीन लष्करप्रमुख हा सुद्धा ब्रिटीशच हवा, कारण आपल्याकडे त्यांच्याएवढा अनुभव नाहीये आणि तेवढा सक्षम अधिकारी सुद्धा नाहीये.“
हे ऐकताच नाथुसिंग हे जागेवर उभे राहिले आणि त्यांनी आपलं मत मांडण्याची विनंती केली, “सर, तसं पहायला गेलं तर आपल्याकडे राष्ट्राचे नेतृत्व करण्याचा सुद्धा अनुभव नाहीये. मग आपण एखाद्या ब्रिटीशरला का नाही देशाचा पंतप्रधान बनवत?” हे ऐकताच पूर्ण बैठक शांत झाली. नेहरूसुद्धा अनुत्तरित झाले. सुरक्षामंत्री बलदेव सिंग यांनी “मग तुम्ही बनता का लष्करप्रमुख?” असा सवाल केला. पण नाथुसिंग हे अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांनी अतिशय शांतपणे ती आलेली संधी नाकारली आणि सांगितलं, “माझे वरिष्ठ- जनरल के.एम.करिअप्पा हे या कामासाठी अतिशय योग्य निवड आहेत.” मग काय १५ जानेवारी १९४९ ला के.एम.करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले.
१९४७ साली जेव्हा पाकिस्तानी आदिवासी लष्कर काश्मिरात घुसखोरी करत होते, त्यावेळी करिअप्पा हे काश्मिरातील भारतीय लष्कराचा कारभार पाहत होते. त्यांच्या सक्षम नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराला सीमेपलीकडे हाकलून लावले. झोजी ला, पुंछ, द्रास आणि कारगिल पुन्हा ताब्यात घेण्यात आले. पण करिअप्पा हे एवढ्यावरच खुश नव्हते.
त्यांना संवेदनशील असणाऱ्या भागात आक्रमण करून ते भाग पुन्हा ताब्यात घ्यायचे होते. त्यांच्या वरिष्ठांनी मात्र या रणनीतीला साफ नामंजूर केले. पण ऐकतील ते करिअप्पा कसले. त्यांनी सरळ त्यांच्या वरिष्ठांचा आदेश नाकारला आणि त्या भागांत आक्रमण करून ते ताब्यात घेतले. याच लढाईत त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवणारा क्षण त्यांच्या साथीदारांनी अनुभवला.
युद्धामुळे काश्मिरात अन्नाचा खूप तुटवडा होता. काही गावं तर खूप दिवसांपासून उपाशी होते. उरीच्या पलीकडे घुसखोरांचा पाठलाग करताना बारामुल्ला प्रदेशात काही गावकऱ्यांनी करिअप्पा यांना अडवलं आणि त्यांची सगळी व्यथा सांगितली. पण आत्ता तर ते त्यांच्या कर्तव्याला बाजूला करू शकत नव्हते. त्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं की लवकरच तुमची सगळी सोय केली जाईल आणि करिअप्पा पुन्हा त्या घुसखोरांचा पाठलाग करु लागले.
दुसऱ्याच दिवशी करिअप्पा यांनी दिलेला शब्द पाळला. पीठ , तांदूळ आणि मिठाची रसद त्यांनी गावापर्यंत पोहोचवली. फक्त एकाच गावात नाही, तर जेवढ्या गावांमध्ये अन्नाचा तुटवडा होता त्या प्रत्येक गावात त्यांनी मदत पोहोचवली. दिलेला शब्द पाळणे हा त्यांचा गुणच होता. त्या दिवशी प्रत्येकाला करिअप्पा यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले . पण “आधी कर्तव्य आणि मग बाकी सगळं” हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळलं.
अजून एका ठिकाणी करिअप्पा हे किती कर्तव्यदक्ष अधिकारी होते याचा प्रत्यय येतो. करिअप्पा यांचे चिरंजीव फ्लाईट लेफ्टनंट के. सी. नंदा (ज्यांना नंतर “एअर मार्शल” म्हणून गौरवण्यात आलं) यांना युद्धकैदी म्हणून पाकिस्तानने पकडले होते. त्यांचं विमान पाकिस्तानी सीमेच्या आत पाडण्यात आलं होतं. त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती होते अयुब खान. हो, तेच अयुब खान ज्यांनी करिअप्पा यांच्या आज्ञेखाली काम केलं होतं. खान यांच्या मनात करिअप्पा यांच्याबद्दल खूप आदर होता.
जेव्हा त्यांना कळलं की करिअप्पा यांच्या मुलाला पकडण्यात आलं आहे. त्यांनी त्वरित करिअप्पा यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांच्या मुलाला ते सोडून देऊ इच्छित आहेत हे सांगितलं. कुठल्याही बापाने लगेच ते मान्यही केलं असतं. पण करिअप्पा कोणी सामान्य बाप नव्हते. ते प्रथम माजी भारतीय लष्करप्रमुख होते आणि नंतर बाप. त्यांनी लगेच खान यांना सांगितलं, “ते सगळे यु*द्धकैदी माझे मुलं आहेत. सोडायचं असेल तर सगळ्यांना सोड, फक्त एकालाच नाही. माझा मुलगा म्हणून त्याला कुठलीही विशेष सुविधा देऊ नका. तो आता माझा नाही भारतमातेचा मुलगा आहे.” असे होते करिअप्पा. कायम आधी देशाचा विचार करणारे.
त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेमुळे १९८६ साली त्यांना सर्वोच्च लष्करी पुरस्कार “फिल्ड मार्शल” ने गौरविण्यात आले. सॅम माणेकशॉनंतर हा गौरव मिळवणारे करिअप्पा हे दुसरेच भारतीय आहेत. अधिकारी म्हणून करिअप्पा कायमच तत्पर होते, पण एक माणूस म्हणूनसुद्धा करिअप्पा खूप महान होते. १५ मे, १९९३ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आपल्या कर्तव्यातून मुक्त झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी कुर्गला राहायला गेले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुठलाही माणूस त्यांना भेटायला जाऊ शकत होता. अशा या थोर सेनानीला माझं शतशः नमन. जय हिंद!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.