आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलमांची आज जयंती, थोर संशोधक तंत्रज्ञ तसेच भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून जनमानसांत लोकप्रिय असे ते व्यक्तिमत्व होते. २०१५ साली आयआयएम शिलॉँग येथे एका कार्यक्रमाला उद्बोधन करत असतांना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांचं वेगळं रूप बघायला मिळत असतं.
अब्दुल कलामांचा जन्म हा रामेश्वरम् जवळील धनुषकोडीच्या एका मच्छीमार तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांनी बालपण अगदी गरिबीत व्यतीत केलं, पुढे शिक्षणाच्या बळावर ते संशोधक बनले.
त्यांनी अग्निबाणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावला. अब्दुल कलामांनी अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि आयुध निर्माणीतही (ARDE – Armament Research and Development Establishment) दीर्घकाळ संशोधन केलं.
त्यांच्या या क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे १९९७ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने आणि भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने अर्थात भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं. २००२ साली त्यांची भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्ती करण्यात आली. २००७ साली अब्दुल कलाम यांनी आपला राष्ट्रपती पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
या पाच वर्षांच्या काळात त्यांची प्रतिमा ही ‘लोकांचे राष्ट्रपती’ (पीपल्स प्रेसिडेंट) म्हणून आकारास आली आणि आपल्या विविध दूरदृष्टीच्या कल्पनांनी सदैव राष्ट्रातील जनतेला प्रोत्साहित करत अब्दुल कलामांनी भारतीय जनतेच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. आपल्या साधी राहणी, उच्च विचारसरणी व अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्वाने त्यांनी देशातील तरुणाईला एक आदर्श घालून दिला होता.
पण अब्दुल कलामांच्या या संपूर्ण प्रवासावर दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येईल की त्यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी काहीही संबंध नव्हता, तरी त्यांच्या गळ्यात राष्ट्रपतीपदाची माळ कशी पडली?
त्यांना भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी मिळाली होती. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी विचारांचा मानला जातो. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार होते. मग डॉ अब्दुल कलामांना राष्ट्रपती कसे बनवण्यात आले, या मागे पण एक रोचक कथा आहे.
२००२ साली डॉ. कलाम चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. निरनिराळ्या विषयांवर तरुणांशी संवाद साधायला त्यांना आवडत असे. तरुणांचे विचार जाणून घेऊन, त्यावर चिंतन करून त्यांनी ‘मिशन २०२०’ या नावाने एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची निर्मिती केली होती.
भारताला २०२० पर्यंत परमवैभव कसं प्राप्त करून देता येईल, यासाठी ते प्रयत्नशील होते. तरुणांना ते निरनिराळ्या क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्यासाठी आणि संशोधनाच्या माध्यमामतून राष्ट्र-उत्थानासाठी प्रेरणा देत होते.
त्यावेळी भारताच्या SVL-3 यानाला आणि अग्नि ५ क्षेपणास्त्राला मिळालेल्या यशामुळे ते खुश होते. तसेच भारताने परमाणू सिद्धता दाखवून देऊन जगभरात भारत एक महासत्ता म्हणून २०२० पर्यंत उदयास येईल असा आशावाद ते बाळगून होते.
एक दिवस त्यांना फोन आला, फोन उचलणाऱ्या व्यक्तीने अब्दुल कलमांना सांगितले की ‘देशाचे पंतप्रधान तुमच्याशी बोलू इच्छित आहेत..!’, अब्दुल कलामांनी फोन हातात घेतला व संवादाला सुरुवात केली.
तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी अब्दुल कलामांना त्यांच्या तब्येतीची आणि कामा संदर्भातील विचारपूस केली. मग ते डॉ. कलामांना म्हणाले ‘मी आताच आमच्या सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर आलो आहे आणि एकमताने तुम्हाला एनडीएकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मी तुमच्याकडून फक्त यासाठी होकाराची अपेक्षा ठेवतो आहे, नकाराची नाही, अशी आग्रही सूचना देखील वाजपेयींनी डॉ. कलमांना केली.
डॉ. कलामांनी वाजपेयींकडे २ तासाची मुदत मागून घेतली आणि त्यांनी आपल्या ३० मित्र व नातलगांना, जे विविध क्षेत्रात कार्यरत होते, त्यांचा सल्ला घेतला. कलाम म्हणतात की ज्यावेळी त्यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली गेली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर व्हिजन २०२० चं भव्यरूप तरळत होतं.
त्यांना राष्ट्रपती झाल्यावर अजून मोठ्या स्तरावर आपलं व्हिजन आपल्याला लोकांपुढे ठेवता येईल ही भावना मनात येत होती. त्यांनी दोन तासांनी वाजपेयींना फोन केला आणि त्यांची मंजुरी कळवली सोबतच त्यांनी वाजपेयींना विनंती केली की मला ‘सर्वपक्षीयांचा’ उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवायची आहे. वाजपेयींनी कलमांना तसे आश्वासन दिले. वाजपेयींनी तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधींशी या विषयावर चर्चा देखील केली.
सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने १७ जून २००२ रोजी अब्दुल कलमांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला आपले समर्थन दिले. देशभरातील डावे पक्ष वगळता सर्वच पक्षांनी अब्दुल कलामांना समर्थन दिले होते. सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
अब्दुल कलाम पुढे दिल्लीला निवासाला आले, त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक भेटीचे कक्ष तयार करून घेतले. तेथे असंख्य लोक त्यांच्या भेटीला येत असत. त्यांची सर्वात पहिली भेट घेतली ती प्रमोद महाजनांनी, मग त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आणि इतर दलाच्या नेत्यांचा रतीब त्यांच्याकडे सुरू झाला तो कायमचाच.
अब्दुल कलामांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काळात त्यांना गुजरात दं*गली विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हटलं की संविधानाच्या चौकटीत माझ्या अधिकारांचा मला जो वापर करता येईल तो मी निश्चितपणे करेल.
२५ जुलै रोजी त्यांची राष्ट्रपतीपदी निवड निश्चित झाली आणि त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यावर अब्दुल कलामांनी ठेवलेल्या जेवणाला त्यांनी फक्त चाळीस स्वकीयांना आमंत्रित केले होते. ज्यात त्यांचे विविध क्षेत्रातील विश्वासू सहकारी, त्यांचे शिक्षक, त्यांचे विद्यार्थी आणि परिवारातील सदस्य यांचा समावेश होता.
डॉ. अब्दुल कलामांची राष्ट्रपतीपदाची कारकीर्द ही आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांनी त्याकाळात जनतेला दिलेले संदेश आणि युवकांना दिलेलं व्हिजन, यामुळे ते सर्वांच्या आजही स्मरणात आहेत. डॉ. कलाम खऱ्या अर्थाने ‘पीपल्स प्रेसिडेंट’ होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.