आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताच्या बांगलादेशमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण झाल्यावर लाखोच्या संख्येने निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात येणाऱ्या या लोंढ्याला रोखणे तर शक्य नव्हते आणि त्यांचा भार सोसणेही शक्य नव्हते.
पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमधील या बेबंदशाहीमुळे भारतावर थेट परिणाम होत होता. तेंव्हा भारतच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानच्या या प्रश्नात हस्तक्षेप करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्याचा ठाम निर्धार केला. यासाठी त्या वरचेवर आपल्या सैन्याला तयार राहण्याचे संकेत देऊ लागल्या. त्यांचे मनोबल वाढवू लागल्या.
सैनिकी छावण्यांना भेट देऊन त्यांना सूचक शब्दात संकेत देऊ लागल्या.
शेवटी १९७१ सालच्या डिसेंबर मध्ये इंदिरा गांधीनी आपल्या सैन्याला पूर्व पाकिस्तानात घुसण्याचे आदेश दिले. इंदिराजींनी जेंव्हा या प्रश्नाला हात घातला तेंव्हा देशातील विरोधी पक्षांनी देखील त्यांना पाठींबा दर्शवला. सर्व पक्ष इंदिराजींच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण, त्या दबावालाही इंदिराजी बळी पडल्या नाहीत. त्यांनी अमेरिकेलाही ठणकावून सांगितले या समस्येत आता भारताने हस्तक्षेप करण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणी डोक्यावरून चालले आहे.
अमेरिकेने चिथावणी देऊनही पूर्व पाकिस्तानात आपले सैन्य तर पाठवलेच पण तिथे विजयही मिळवला. पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली तेंव्हाच या युद्धाला पूर्णविराम देण्यात आला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी जेंव्हा भारतीय फौजासमोर पाकिस्तानी सैन्याने समर्पण केले तेंव्हा एका नव्या देशाचा जन्म झाला होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात इंदिराजींचे अगदी अभूतपूर्व असे आणि हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले.
या दिवशी संपूर्ण देश इंदिरा गांधींचे कौतुक करत होता. इंदिरा गांधीमध्ये भारतीय जनतेला दुर्गेचे रूप दिसत होते. लोकसभेत जेंव्हा त्यांचे आगमन झाले तेंव्हा सर्व पक्षीय सदस्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
इतकेच नाही तर ‘जय बांगला, जय इंदिरा गांधी’ अशा घोषणा देखील दिल्या. इतक्या एकजूटतेने पंतप्रधानांचे असे स्वागत करण्याची ही पहिलीच घटना असेल. विरोधी पक्ष देखील इंदिराजींच्या धाडसाचे कौतुक करत होते.
संपूर्ण देशाला इंदिराजींच्या या कामगिरीचा अभिमान वाटत होता. विशेष म्हणजे अमेरिकेची चिथावणी धुडकावून भारताने दाखवलेले हे धाडस सर्वांना अचंबित करणारे होते. संपूर्ण जगात भारताची मान उंचावली.
या विजयानंतर जेंव्हा लोकसभेचे कामकाज सुरु झाले तेंव्हा संसदेतील वातावरण अक्षरश: जल्लोषाने भारावून गेले होते. सर्व पक्षीय सदस्यांनी जोरजोरात ‘जय बंगला, जय इंदिरा गांधी’ अशा घोषणा लावल्या. राज्यसभेतील सदस्यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
ज्या विरोधी पक्षाला हरवून केवळ आठच महिन्यापूर्वी इंदिराजी देशाच्या पंतप्रधान बनल्या होत्या. तोच विरोधी पक्ष त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत होता. याच काळात कॉंग्रेसमध्ये फुट पडली होती. त्यांची प्रतिमा एक कमकुवत पंतप्रधान अशी बनली होती.
१८ डिसेंबर १९७१ रोजी हिंदुस्तान टाइम्सने छापलेल्या बातमीत म्हटले होते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डीएमके, जनसंघचे नेते पितांबर दास आणि कॉंग्रेस(ओ)चे मोरारजी देसाई या सर्व नेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींचे कौतुक केले आहे. या सगळ्यापासून फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तेवढा बाजूला पडला होता.
मिंट या इंग्रजी वृत्तपत्राने छापलेल्या एका अहवालानुसार, जनसंघचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते, पंतप्रधानांनी शत्रू विरोधात संपूर्ण विजय मिळवायला हवा. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांना आणखी अधिकार हवे असतील तर ते देण्यात यावेत. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. हाच जनसंघ राजकारणात सक्रीय झाल्यावर त्याचे नामकरण भारतीय जनता पक्ष असे करण्यात आले.
युद्धाच्या काळात सीपीआय पक्ष तर कॉंग्रेसच्या पाठीशी होताच. पण इतर प्रादेशिक पक्षांनी ही कॉंग्रेसला पाठींबा दिला.
युद्ध सुरु होताच ३ डिसेंबर १९७१ रोजी आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तेरा दिवस युद्ध चालले. यावेळी विरोधी पक्ष देखील अमेरिका आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा करत होता.
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी केलेल्या भारतविरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेत आणि एस एन मिश्रा यांनी राज्यसभेत याचा निषेध नोंदवला.
लालकृष्ण आडवाणी, बलराज मधोक आणि केदारनाथ सहानी यासारख्या जनसंघाच्या इतर नेत्यांनी अमेरिकी दूतावासासमोर निदर्शने केली. सीपीआय आणि डीएमकेसारख्या प्रादेशिक पक्षांनी देखील अमेरिकेविरोधात करण्यात आलेल्या या निदर्शनात सहभाग घेतला.
याच वेळी विधानसभा निवडणुकाही जवळ आल्या होत्या. मात्र जनसंघचे नेते अटल बिहारी वाजपेयी आणि स्वतंत्र पक्षाचे नेते पी. के. देव यांनी या निवडणुका पुढे ढकलण्यासही हरकत नसल्याचे म्हटले होते.
पंतप्रधानांना जर या निवडणुका पुढे ढकलाव्या वाटत असतील तर त्यांनी पुढील एक वर्षासाठी या निवडणुका पुढे ढकलाव्यात त्याबाबत आमचा कसलाही आक्षेप असणार नाही असेही ते म्हणाले होते. परंतु सीपीएमला मात्र तीन महिन्यात निवडणुका व्हाव्यात असे वाटत होते.
पाकिस्तानी सैन्याने माघार घेतल्यानंतर आणि बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर भारताने युद्धविराम घोषित केला. परंतु अटलजींच्या मते भारताने हे युद्ध पश्चिम पाकिस्तानपर्यंत न्यायला हवे होते. पाकिस्तानची आक्रमकता कायमची ठेचायला हवी होती.
परंतु भारताने हा युद्धविराम घोषित केल्यानंतर संसदेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींचे तोंडभरून कौतुक केले. या लढाईत इंदिराजींनी जी भूमिका बजावली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. संसदेत युद्धाबाबत चर्चा सुरु असताना वाजपेयी यांनी इंदिराजींचे समर्थन केले.
ते म्हणाले, हा वाद वगळता इंदिराजींची भूमिका मात्र कौतुकास्पद होती. या प्रसंगात अक्षरश: त्यांनी दुर्गेची भूमिका निभावली आहे. होय! इंदिराजींना ‘देश की दुर्गा’ ही पदवी देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीच होते.
नंतर मात्र अटलजींनी इंदिराजीबाबत थोडा खेद व्यक्त केला. ‘हार नही मानूंगा – एक अटल जीवन गाथा’ हे त्यांचे जीवन चरित्र लिहिणारे लेखक विजय त्रिवेदी यांच्याजवळ त्यांनी ही खदखद व्यक्त केली होती. या पुस्तकातही त्याचा उल्लेख आलेला आहे.
या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार अटलजींनी डीपीटीला मुलाखत देताना असे व्यक्तव्य केले होते की, “इंदिरानी आपले वडील पंडित नेहरू यांच्याकडून काही गोष्टी शिकून घ्यायला हव्या होत्या. मला अत्यंत खेद होतो की मी त्यांना दुर्गेची उपाधी दिली.”
कदाचित आणीबाणी आणि त्याकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळेही अटलजी असे म्हणाले असतील.
पण, भारत-पाक युद्धात विरोधी पक्षांनीही स्वयंस्फूर्तीने पंतप्रधानाची पाठराखण करण्याचा हा पहिलाच आणि अदभूत प्रसंग होता. त्यानंतर झालेल्या कोणत्याही पंतप्रधानांच्या वाट्याला असा प्रसंग कधीच आला नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.