आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
११ जानेवारी २०२० ला जम्मू श्रीनगर हायवेने काश्मीर खोऱ्यातून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनाला चेक नाक्यावर जम्मू-काश्मीर पोलिसांनी अडवले. त्या वाहनात बसलेल्या चार व्यक्तींपैकी एक होता हिजबुल मुझाहिद्दीन ह्या दहशतवादी संघटनेचा एक आतंकवादी ज्याने गेल्या महिन्यात एका परप्रांतीय नागरिकाची हत्या केली होती. दोन होते हिजबुलच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी सर्व्हे करणारे त्यांचे गुप्तहेर आणि चौथा होता जम्मू काश्मीर पोलिसांचा सहाय्यक अधीक्षक दलविंदर सिंह, ज्याला गेल्या वर्षी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एका आय १० गाडीतून दहशतवादी जम्मूच्या दिशेने जात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली, त्यांनी दक्षिण काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सूचित करून हायवेवर सापळा रचून ह्यांना पकडलं. पोलिसांनी पकडलेल्या ह्या चारही जणांवर भारतीय लष्करी कायद्या अंतर्गत देशविरोधी षडयंत्र रचल्याचा आणि शस्त्रास्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यात जो पोलीस अधिकारी आहे त्याचा उल्लेख अफझल गुरु ह्या संसद हल्ल्यातील दहशतवाद्याने देखील केल्याची बाब समोर आली आहे.
२००४ साली अफझल गुरूने तिहार जेलमधून त्याच्या वकिलाला लिहिलेल्या एका पत्रात असा उल्लेख केला आहे की, ह्या दलविंदर सिंहने त्याला दिल्लीला जाण्यास सांगितले होते आणि त्याच्यासाठी राहण्याची व्यवस्था देखील केली होती. जम्मू काश्मीर पोलिसांच्या मते त्यांना अशी माहिती त्यांच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती की, हिजबुलचा एक टॉप कमांडर काश्मीरच्या खोऱ्यातून जम्मूच्या दिशेने निघाला आहे. त्याला पकडण्यासाठीच्या सूचना त्यांना मिळाल्या. त्यासाठी त्यांनी दक्षिण काश्मीरच्या सहाय्यक पोलीस महासंचालकांना सूचना केली. त्यांनी त्यानुरूप सूचना देऊन सापळा रचला होता.
त्यांना वाटलं होतं की फक्त दहशतवादी असतील परंतु जेव्हा जम्मू काश्मीर पोलिसांचा एक अधिकारी निघाला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हा अधिकारी गुरुवारी परदेशातून आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेत होता. त्या अधिकाऱ्यांना काश्मीर पोलीस दला विषयी माहिती या पोलीस अधिकाऱ्याने दिली होती. मागच्या वर्षी काश्मीरच्या ज्या ७६ पोलीस अधिकऱ्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांच्यापैकी एक होता. ह्या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या शौर्यासाठी ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
जेव्हा पोलिसांनी ह्या अधिकाऱ्याला पकडलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या कानशिलात लगावली. एका पोलिस अधिकाऱ्याच्या मते जर ह्या लोकांनी आपली गाडी जवाहर बोगद्याच्या पल्याड नेली असती तर यांना पकडणे अवघड होऊन बसले असते.
प्रथमदर्शनी हे प्रकरण जरी सरळ वाटत असले तरी हे तितकेसे साधे व सरळ नाही. दविंदर सिंह हा ह्या दोन आतंकवाद्यांचा वाहक म्हणून मोर्चा सांभाळत होता. गाडीत जर पोलिसांचाच एखादा पुरस्कार विजेता अधिकारी असेल तर गाडीला अडवलं जाणार नाही अशी त्यांची धारणा होती. पण अखेरीस ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ज्यावेळी ह्या संदर्भात विचारणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की ‘दविंदर सिंहने एक गंभीर गुन्हा केला आहे आणि त्याला त्याची योग्य ती शिक्षा दिली जाणार आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे त्याला वेगळी वागणूक देणार नसून, आम्ही त्याला इतर दहशतवाद्यांप्रमाणेच वागवणार आहोत.’
अनेक संरक्षण संस्था आता या तपासात सामील झाल्या असून दविंदर सिंहची कसून चौकशी केली जाणार आहे. भारतीय गुपचर संस्था जसे आयबी, रॉ ह्या देखील ह्या प्रकरणाच्या तपास करत आहेत. याबरोबरच जम्मू काश्मीरची सीआयडी देखील ह्या प्रकरणाचा तपास करणार आहे.
आम्ही त्याच्या अतिरेकी संस्थेशी असलेल्या लागेबंधाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होतो, अशी कबुली त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
बाकी ज्या तीन आतंकवाद्यांना पकडण्यात आले आहे त्यांची देखील ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापैकी एकाचे नाव इरफान शफी असून तो दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याविरोधात लोकांच्या मुलांना पाकिस्तानात धर्मशिक्षण घेण्यासाठी पाठवल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव नावेद मुश्ताक असे असून हा हिजबुलचा एक टॉप कमांडर आहे. त्याचा देखील अनेक गुन्ह्यात सहभाग आहे. त्याने १२-१४ लोकांच्या हत्या केल्या असून त्यात काही परप्रांतीय ट्रक वाल्यांचा समावेश आहे. त्याच्याविरोधात १७ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. हा देखील शोपियानचाच रहिवासी आहे.
तिसरा आतंकवादी हा रफी अहमद रथार असून तो देखील हिजबलूचा कमांडर आहे. तो इमाम साहिब बांदीपोरा इथला रहिवासी आहे. हे तिन्ही दहशतवादी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हिटलिस्टवर होते. अखेरीस त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. पण त्यांच्यासोबत दविंदर सिंहची उपस्थिती आश्चर्यकारक होती. दविंदर सिंह हा मूळचा काश्मीरचाच असून, मागे एका लष्करी कारवाईत मारला गेलेल्या बुरहान वाणी आणि त्याचं गाव एकच आहे.
सिंग हा गेली कित्येक वर्ष श्रीनगरच्या इंदिरानगर भागाचा रहिवासी असून जम्मू काश्मीरच्या अँटी हायजॅकिंग पथकाचा तो सदस्य आहे. १९९० साली जम्मू काश्मीर पोलीस दलाच्या काउंटर रिसर्जन्सी टास्क फोर्सचा तो सदस्य होता. १९९४ साली तो स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा सदस्य बनला. २००१ साली चौकशी दरम्यान त्याच्या हातून एक आरोपी मारला गेला, ज्यामुळे काश्मिरात त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे त्याला काश्मीरच्या एका अत्यंत दुर्गम भागात सेवेसाठी पाठवण्यात आले होते. २०१५ साली लोकांकडून गैरमार्गाने पैसे उकळल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करण्यात आला होता.
अफझल गुरूने देखील आपल्या पत्रात दविंदर सिंहने मला दिल्लीत जायला मदत केली होती आणि त्यानेच माझ्यावर दबाव आणल्याचे म्हटले आहे. त्याने दविंदर सिंहच्या नावाचा स्पष्ट शब्दात उल्लेख केला होता. २०१३ साली जेव्हा गुरूला फाशी देण्यात आली त्यावेळी काश्मीरच्या काही संघटनांनी याच्या चौकशीची मागणी देखील केली होती.
दविंदर सिंह हा त्यावेळी सुटला होता. मात्र आता तो पुरता जाळ्यात अडकला आहे. तो कधीपासून आतंकवादी कारवाया करतोय याचा खुलासा आता होणारच आहे. पण इतकी वर्ष पोलिसांच्या नाकाखाली तो आतंकवाद्यांचा सांभाळ करत होता, हे बघून पोलिसांचे धाबे दणाणले आहे.
===
स्रोत:- Scroll.in
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.