आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लहानपणापासून समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला जाणे हा बिचित्रानंद बिस्वाल यांचा दिनक्रम होता. ओडिशाच्या गुंडबाला नामक एका दुर्गम भागातील गावात वास्त्यव्य असून त्यांच्या घरापासून काही अंतरावरच समुद्र किनारा आहे. एकदा असाच फेरफटका मारत असताना त्यांना समुद्रकिनाऱ्यावर तब्बल २००० रिडले जातीचे समुद्री कासव मृतावस्थेत आढळून आले.
या दृश्याने ते हादरून गेले होते. पण त्यानंतर त्यांनी एक उद्दिष्ट मनाशी पक्के केले आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही.
१९९६ पासून बिचित्रानंद बिस्वाल ज्यांना बीची भाई म्हणून देखील ओळखले जाते.
त्यांनी कोट्यवधी कासवांचे प्राण वाचवले आहेत. आपले आयुष्य त्यांच्या रक्षणासाठी अर्पण केले आहे. ते आज आपल्या गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना कासवांच्या रक्षणाचे धडे देत असतात. गेल्या वर्षीच त्यांना प्रतिष्ठित बिजू पटनायक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांच्या प्राणीसंवर्धन क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सध्या धोक्यात असलेले ऑलिव्ह रिडले कासव हे हिंद महासागर आणि प्रशांत महासागराच्या पाण्यात वास्तव्यास आहेत. गुंडबाला हे त्या काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे हे कासव आपले अंडे द्यायला येत असतात, या ठिकाणीच त्यांच्या जीवाला शिकाऱ्यांपासून सर्वांत जास्त धोका आहे.
या भागातील बेकायदेशीर शिकारीमुळे कासवांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे.
जागतिक प्राणी संस्थेने या जातीच्या कासवांना धोक्याच्या यादीत समाविष्ट केले आहे. जर समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक दलाच्या जवानांनी गस्त घातली हा प्रकार सहज थांबवता येऊ शकतो, गावकरी आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जर प्रयत्न झाले तर नक्कीच आपण या जातीच्या कासवांचे संवर्धन करू शकतो, असे मत बिचित्रानंद व्यक्त करतात.
बिचित्रानंद बिस्वास सांगतात की जेव्हा त्यांचे समुद्र किनाऱ्यावर मृतावस्थेत पडलेल्या कासवांवर लक्ष गेले, त्यावेळी त्यांना प्रचंड धक्का बसला होता.
मानवजातीने प्राणीजातीच्या आयुष्यासोबत चालवलेला खेळ बघून त्यांचे मन उद्विग्न झाले होते. त्यात समुद्राच्या होणाऱ्या प्रदुषणाने या परिस्थतीला अजून गंभीर बनवले आहे, असं देखील ते सांगतात. जेव्हा त्यांनी या कामाची सुरुवात केली तेव्हा त्यांनी आधी आपल्या शेजाऱ्यांना समजावून सांगितले, मग त्यांनी आपल्या गावातील लोकांशी संवाद साधून कासवांच्या संवर्धनाबाबत त्यांच्यात जनजागृती निर्माण करायचे कार्य सुरु केले. त्यांना गावातील तरुण मुलांचा या कामी मोठा पाठिंबा मिळाला होता. १९९० च्या दशकात कासवांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या शिकारी थांबवण्यासाठी कुठलेच कडक कायदे अस्तित्वात नव्हते.
मोठ्या प्रमाणावर येथून कासवांचा व्यापार केला जात होता. पण आता संवर्धनाच्या कार्यक्रमामुळे परिस्थिती सुधारली आहे.
बीची भाई हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना कासवांच्या संवर्धन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गावातील महिला देखील या संवर्धन कार्यात सहभागी होतात.
त्याच्या विचाराने प्रेरणा घेऊन त्याच्या गावातील सौम्य रंजन आणि दिलीप कुमार यांनी ओडिशाच्या ८०० किलोमीटरच्या किनाऱ्यावर सायकलवर प्रवास करून कासवांच्या आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती केली आहे.
यामुळे त्यांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली आहे. दोघांनी बीची भाई यांना आपला रोल मॉडेल समजत असल्याची भावना बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या मते बीची भाई यांचा उचित सन्मान त्यांच्या असामान्य कार्यासाठी केला गेला पाहिजे.
अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर देखील बीची भाई थांबले नाहीत.
त्यांच्या फिजियोथेरपीच्या ट्रीटमेंटने ते आज बरे झाले आहेत पण त्यांना आवश्यक असलेली मनाची शांतता मात्र आपल्या प्राणी संवर्धनाच्या कार्यातूनच मिळते. त्यांनी स्वतःला त्या कार्यासाठी वाहून घेतले आहे. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या बाळाला गर्भारपणात संभाळते, अगदी त्याप्रमाणे कासव आपल्या अंड्यातून बाहेर पडेपर्यंत त्यांच्या घरट्यांची काळजी बीची भाई आणि त्यांचे साथीदार घेत असतात.
जुलै ते डिसेंबर या काळात अंड्यातून कासवांचे पिल्लं बाहेर पडतात. ते पिल्लं सागरात जात नाही तोपर्यंत त्यांची काळजी घेण्याचे काम बीची भाई करतात.
त्या कासवांचा सांभाळ करणे हा खूप आनंददायी प्रकार असतो. आम्ही समुद्र किनाऱ्याची साफसफाई देखील करत असतो आणि स्थानिकांच्या मदतीने किनारा खराब होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत असतो, असे बीची भाई आवर्जून सांगतात.
किनाऱ्यावर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे, जर परिसराचे पर्यावरण सुरक्षित राहिले तर इथे मोठ्या प्रमाणावर कासव प्रजनन करायला येतील, असे आवाहन बीची भाई करतात.
बीची भाईंचे कासवांचे संवर्धन हे एकमेव लक्ष नसून ते अनेक आघाड्यांवर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न करत असतात. त्यांनी ओडिसात खारफुटीच्या वनांच्या संरक्षणासाठी सायकल रॅली काढली होती. त्यांनी अनेक सापांना जीवनदान दिलं आहे. सर्पमित्र म्हणून ते आसपासच्या परिसरात कुठे साप निघाला तर त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे काम करतात. आजवर त्यांनी २००० सापांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडले आहे.
स्थानिकांना देखील त्यांच्यावर संपूर्ण विश्वास असून ते देखील साप पकडण्यासाठी त्यांनाच बोलवतात. त्यांनी स्वतःच्या घरात चिमण्यांच्या संवर्धनासाठी कृत्रिम घरांची निर्मिती केली आहे. ज्यात चिमण्या निवासाला येतात.
बीची भाई ह्यांनी फक्त दहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं असून ते आज कासव संवर्धन क्षेत्रातले एक तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
ते अनेक निसर्ग संवर्धन समित्यांचे सभासद असून ते सरकारच्या कासव संवर्धन कार्यक्रमाच्या प्रमुख लोकांच्या टीमचे सदस्य देखील आहेत.
आज ते इतर लोकांना या कार्यासाठी प्रेरित करत असून, अधिकाधिक लोकांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ते करतात. पुढच्या पिढीला हे कासव फक्त चित्रात बघावे लागू नये यासाठी मी शेवटपर्यंत कार्य करेल असे ते म्हणतात आणि जास्तीत जास्त लोकांना या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील करतात.
त्यांच्या या अद्वितीय कार्याला आमचा सलाम !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.